सोलापूर : उशिरा आलेल्या मान्सूनने यंदा सरासरी गाठलीच नाही. जितका पडला तितक्याच पावसावर मंगळवेढा व सांगोला तालुक्यातील रब्बीची पेरणी पूर्ण झाली असून, इतरत्र सध्या जोरदार लगबग सुरू आहे. सध्या मॉन्सून परतल्याचे चित्र आहे. मात्र, पंधरवाड्यानंतर येणाऱ्या स्वाती नक्षत्राच्या पावसावरच ज्वारीचे भवितव्य आहे.
जिल्ह्यात खरिपाचे पेरणी मोठ्या प्रमाणात होते. तसे पाहता सोलापूर हे ज्वारीचे कोठार असून, एकेकाळी केवळ रब्बीचा जिल्हा अशी सोलापूरची ओळख होती. मात्र, अलीकडे सोयाबीन, तूर, मूग, उडीद या पिकांचे क्षेत्र वाढल्याने खरीप व रब्बी अशी दोन्ही पिके जिल्ह्यात घेतली जात आहेत.
यंदा खरिपाला वेळेवर व पुरेसा पाऊस नसल्याने रब्बीचे क्षेत्र वाढणार आहे. सध्या ज्वारीला साडेपाच ते सहा हजार रुपये क्विंटल इतका विक्रमी दर आहे. मागील अनेक वर्षात पडलेला ज्वारीचा दर सध्या चांगलाच वाढला आहे. यामुळे स्वाती नक्षत्राने साथ दिल्यास शेतकऱ्यांना यंदाची दुष्काळ सदृश स्थितीही इष्टापत्ती ठरू शकते.
मॉन्सून परतला आता फक्त आशा
हवामान खात्याने अधिकृतरित्या मॉन्सून परल्याची घोषणा केली आहे. सध्या शेतकऱ्यांना अजूनही पावसाची आवश्यकता आहे. उजनी धरण अद्याप साठ टक्क्यावरच आहे. प्रत्यक्षात ते १११ टक्के भरत असते. यामुळे ते निम्म्यावरच आहे. इतर प्रकल्पांपैकी एकही प्रकल्प भरलेला नाही. एखाद दुसरी वेळ सोडता जिल्ह्यातील नद्या यंदा प्रवाहितच झालेल्या नाहीत. यामुळे आता सर्व भविष्य नशिबाने होणाऱ्या एखाद-दुसऱ्या पावसावर अवंलबून आहे.
पडतील स्वाती तर पिकातील मोती
मंगळवेढा व सांगोला तालुक्यातील रब्बीची पेरणी उतरा नक्षत्रात तर इतर तालुक्यातील पेरणीही हस्त नक्षत्रात किंवा त्यानंतर केली जाते. मात्र, चित्रा नक्षत्रानंतर म्हणजेच पेरणीनंतर स्वाती नक्षत्रात जर चांगला पाऊस झाला तर कोळपणीच्या पूर्वी ज्वारीला या स्वाती नक्षत्राच्या पावसाचा चांगलाच आधार मिळतो.
यामुळे बागायत ज्वारीप्रमाणे कोरडवाहू ज्वारीदेखील चांगला उतार देऊ शकते. यामुळे ‘पडतील स्वाती तर पिकतील मोती’ अशी म्हण शेतकऱ्यांमध्ये प्रचलित आहे. यंदा अत्यंत कमी पाऊस झालेला असल्याने यंदाच्या रब्बी पिकाचे भवितव्य या स्वाती नक्षत्राच्या हाती आहे.
आकडे बोलतात...
वार्षिक सरासरी पाऊस ५४५ मिलिमीटर
आतापर्यंतचा पाऊस ३६८
भूजल पाणी पातळीतील घट १ मीटर
पूर्ण जिल्ह्याचे ज्वारीचे सरासरी क्षेत्र ७ लाख हेक्टर
यंदाची आजपर्यंतची पेरणी २४ हजार ८८८ हेक्टर
यंदा पावसाचे प्रमाण खूप कमी आहे. यामुळे पेरणीचे क्षेत्र व उत्पादन घटण्याची चिन्हे आहेत. परतीचा पाऊसदेखील अपेक्षेप्रमाणे झालेला नाही. यामुळे रब्बीच्या पिकांची चिंताच आहे.
- दत्तात्रय गवसाने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
पेरणीसाठी शेवट पाऊस किमान १०० मिलिमीटर असणे आवश्यक आहे. सध्या दोनच तालुक्यात पेरणी झाली आहे. उडीद पिकाची राने कांदा पिकाला गुंतली आहेत. सोयाबिन निघताच काही प्रमाणात पेरणी होईल.
- राजकुमार मोरे, उपसंचालक, कृषी
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.