Solapur : एसटीतून साडेनऊ लाख वारकऱ्यांची वारी;भाविकांच्या संख्येत एक लाखानेे, उत्पन्नात एक कोटीने वाढ

आषाढी यात्रेनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी राज्य परिवहन महामंडळाने यात्राकाळात चार हजार ५०० विशेष बस सोडल्या.
Solapur : एसटीतून साडेनऊ लाख वारकऱ्यांची वारी;भाविकांच्या संख्येत एक लाखानेे, उत्पन्नात एक कोटीने वाढ
Updated on

सोलापूर : आषाढी यात्रेनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी राज्य परिवहन महामंडळाने यात्राकाळात चार हजार ५०० विशेष बस सोडल्या. यात्रेच्या नऊ दिवसांच्या काळात राज्याच्या कानाकोपऱ्यातून तब्बल नऊ लाख ५३ हजार भाविकांनी पंढरपूरला जाण्यासाठी एसटीच्या सेवेचा लाभ घेतला. यातून एसटी महामंडळाला २९ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा भाविकांच्या संख्येत एक लाखाने तर उत्पन्नात एक कोटीने वाढ झाली आहे. पंढरपूर येथे आषाढी एकादशीला राज्यभरातून लाखो भाविक येतात. या वारकऱ्यांसह इतर प्रवाशांना एसटीची प्रवासी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. एकाच गावात ४० पेक्षा जास्त प्रवासी असल्यास थेट गावातून पंढरपूरपर्यंत गट प्रवासी सुविधाही उपलब्ध केली होती. त्याचबरोबर ७५ वर्षावरील ज्येष्ठांना मोफत प्रवास देणारी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना, महिलांसाठी ५० टक्के तिकीट दरात सूट देणारी महिला सन्मान योजनांच्या सवलती कायम ठेवल्या होत्या.

यात्रा काळामध्ये गर्दीचा फायदा घेऊन फुकट प्रवास करणाऱ्यांवर नियंत्रण आणण्यासाठी विविध मार्गांवर १२ ठिकाणी तपासणी नाके, तात्पुरत्या स्वरूपात चार बसस्थानके उभारण्यात आली होती. प्रत्येक ठिकाणी अतिरिक्त तिकीट खिडक्यांचे नियोजन केले होते. महिन्याभरापासून सुरू असलेली यात्रेची लगबग रविवारी (ता.२१) गोपाळ काल्याने संपली. एकादशीपासून नऊ दिवसांच्या कालावधीत एसटीच्या जादा बसचा लाभ राज्यातील ९ लाख ५३ हजार भाविकांनी घेतला.

दीड लाख भाविकांचा रेल्वेप्रवास

आषाढी यात्रा काळात पंढरपूरसाठी सोडलेल्या विशेष रेल्वे आणि नियमित धावणाऱ्या रेल्वेगाड्यांच्या माध्यमातून दहा दिवसांमध्ये एक लाख ६६ हजार वारकऱ्यांनी रेल्वेने प्रवास केला. यातून रेल्वे प्रशासनाला ८७ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत रेल्वेने प्रवास केलेल्या भाविकांची संख्या यंदा ३२ हजारने वाढली.

सोलापूर रेल्वे विभागाने आषाढी यात्रेसाठी येणाऱ्या सर्व भाविकांच्या अडचणींचा विचार करून सूक्ष्म नियोजन केले होते. विविध भागातून पंढरपूरमध्ये येणाऱ्या भाविकांसाठी १२ ते २१ जुलै या दहा दिवसांच्या कालावधीसाठी विशेष २४ रेल्वे गाड्यांची व्यवस्था केली होती. ‘‘भाविकांचा प्रवास शांततेत आणि सुरक्षित व्हावा, यासाठी सोलापूर विभागातील सर्वच विभागांनी विशेष प्रयत्न केले. पंढरपूर स्थानकावर अतिरिक्त सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या. याबाबत अनेक वारकऱ्यांनी समाधानही व्यक्त केले,’’ असे रेल्वेचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक योगेश पाटील यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com