माळीनगर : माळीनगर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी विविध पॅनेलकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू असून, यावेळी येथे तिरंगी सामना रंगण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यंदा येथील निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याचा संभव असून, पॅनेलप्रमुखांना सरपंच व सदस्यपदासाठी उमेदवार देताना कसब पणाला लावावे लागण्याची चिन्हे दिसत आहेत.
या ग्रामपंचायतीसाठी थेट सरपंचपदासह सहा प्रभागांमधून १७ सदस्यांसाठी ५ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. यावेळी तीन हजार ८७४ पुरुष व तीन हजार ६४३ स्त्री असे एकूण सात हजार ५१७ मतदार आहेत. माळशिरस तालुक्याच्या राजकारणाच्या दृष्टीने माळीनगर ग्रामपंचायत महत्त्वपूर्ण मानली जाते.
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने या ग्रामपंचायतीच्या रणसंग्रामास महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे वरिष्ठ पातळीवरून देखील या ग्रामपंचायत निवडणुकीकडे विशेष ‘नजर’ असल्याचे समजते. येत्या सोमवारपासून (१६ ऑक्टोबर) उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ होणार आहे. अर्ज भरण्यासाठी जेमतेमच दिवस शिल्लक राहिल्याने पॅनेलप्रमुख व त्यांच्या सहकाऱ्यांची उमेदवार निवडीसाठी रात्री उशिरापर्यंत खलबते सुरू आहेत.
माळीनगर साखर कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष राजेंद्र गिरमे यांची या ग्रामपंचायतीवर गेली दहा वर्षांपासून एकहाती सत्ता आहे. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखालील माळीनगर ‘विकास’ पॅनेल यंदाच्या निवडणुकीत पुन्हा शड्डू ठोकणार, हे उघड आहे.
माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती सुभाष निंबाळकर हे देखील या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सक्रिय झाल्याचे समजते. जुने ग्रामपंचायत सदस्य व सहकाऱ्यांच्या ते प्रत्यक्ष गाठीभेटी किंवा फोनवरून संपर्क साधत असल्याची चर्चा आहे.
‘सहकार महर्षी’ साखर कारखान्याचे तरुण संचालक विराज निंबाळकर यांनी सुद्धा पॅनेल उभे करण्यासाठी अगोदरपासूनच कंबर कसली आहे. त्यामुळे राजेंद्र गिरमे, सुभाष निंबाळकर व विराज निंबाळकर यांचे तीन पॅनेल एकमेकांच्या आमने-सामने येणार असल्याची कुजबूज गावात ऐकू येत आहे.
मतविभागणी व संघर्ष टाळण्यासाठी निंबाळकरांच्या दोन्ही पॅनेलमध्ये समझोता घडवून आणण्यासाठी तालुक्यातील वरिष्ठ नेत्यांकडून प्रयत्न केले जात असल्याचे सांगण्यात आले. त्यांच्यात समेट झाल्यास दुरंगी अन्यथा तिरंगी लढत अटळ आहे.
सक्षम उमेदवार देण्याचे आव्हान
सरपंच व सदस्यपदाचे उमेदवार निवडताना सर्वच पॅनेलचा कस लागणार आहे. सक्षम, स्वयंपूर्ण, मतदारांची कामे करणारे, संकटकाळी मदतीला धावून येणारे व ग्रामपंचायतीला स्वतःच्या उदरनिर्वाहाचे साधन न बनवणारे उमेदवार असावेत, असा सर्वसामान्य मतदारांचा मतप्रवाह आहे.
या निवडणुकीत गावाच्या विकासासाठी तुम्ही काय केले? यापुढे तुमची भूमिका काय राहणार? अशा प्रश्नांची सरबत्ती प्रचारात मतदारांकडून थेट उमेदवारांना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सरपंचपद इतर मागास प्रवर्गातील महिलेसाठी राखीव असल्याने स्वतंत्रपणे कामकाज करण्याची कुवत, गावाच्या प्रश्नांची जाण व ‘पती’राजावर अवलंबून नसणाऱ्या महिलेस उमेदवारी देण्याचे आव्हान सर्वच पॅनेलपुढे असणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.