Solapur News : ‘विठ्ठल’कडून शिखर बँकेची फसवणूक; गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांना पत्र, ४२० कोटी रुपये कर्ज थकीत

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने राज्य सहकारी बॅंकेची फसवणूक केली
vitthal sugar factory fraud with bank file case letter to police 420 cr loan
vitthal sugar factory fraud with bank file case letter to police 420 cr loan esakal
Updated on

पंढरपूर : तालुक्यातील गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने राज्य सहकारी बॅंकेची फसवणूक केली आहे. त्यामुळे कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील आणि संचालक मंडळाच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी बॅंकेचे प्राधिकृत अधिकारी तथा सहायक व्यवस्थापक कैलास घनवट यांनी पंढरपूर तालुका पोलिस ठाण्याकडे पत्राद्वारे केली आहे.

कारखान्याच्या संचालक मंडळाने महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेकडून (शिखर बॅंक) वेळोवेळी घेतलेल्या कर्जाची परतफेड केली नाही. ३१ डिसेंबर २०२३ अखेर कर्ज रकमेचा भरणा न केलेले २५२ कोटी ४९ लाख आणि पुढील व्याज १७७ कोटी ६८ लाख, अशी ४२० कोटी १७ लाख रुपये रक्कम येणे, असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

श्री. घनवट यांनी पंढरपूर तालुका पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत असे नमूद करण्यात आले आहे की, श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना राज्य बॅंकेची सभासद असून कारखान्याने वेळोवेळी केलेल्या मागणीनुसार बॅंकेने ऊस गाऴप हंगामासाठी,

वीज निर्मितीसाठी तसेच इतर जोड उत्पादनांसाठी (इथेनॉल व आनुषंगिक उत्पादने) कर्ज मंजूर करून उचल दिलेली आहे. कारखान्याने या कर्जाच्या परतफेडीसाठी वेळोवेळी कारखान्याच्या मालकीची स्थावर मालमत्ता बॅंकेस गहाणखताव्दारे लिहून दिलेली आहे.

त्याच बरोबर जंगम मालमत्ता (प्लॅन्ट ॲण्ड मशिनरी) या देखील हायपोथिकेशन करारान्वये ताबे गहाणात आहेत. कारखान्याने कर्ज रकमांची परतफेड न केल्याने कर्ज खाते आरबीआयने घालून दिलेल्या निकषांन्वये अनुत्पादित (एन.पी.ए.) झालेले असल्याने बॅंकेने कारखान्यास रक्कम भरण्याविषयी नोटीस दिली होती.

परंतु, त्यानंतरही कारखान्याच्या संचालक मंडळाने ३१ डिसेंबर २०२३ अखेर कर्ज रकमेचा भरणा न केलेली २५२ कोटी ४९ लाख रुपये आणि पुढील व्याज १७७ कोटी ६८ लाख, अशी एकूण ४२० कोटी १७ लाख रुपये रक्कम येणे आहे.

कारखान्याने उत्पादित केलेल्या साखरेवर बँकेचा प्लेज करारानुसार प्रथम हक्क असल्याने साखर विक्री करण्यापूर्वी बॅंकेस प्रतिक्विंटल ८०० रुपयांप्रमाणे भरणा करणे बंधनकारक होते. हंगाम २०२२-२३ या वर्षात कारखान्याने ७ लाख २६ हजार १४२ मेट्रिक टन ऊस गाळप करून ६ लाख ६४ हजार ४२० क्विंटल साखर उत्पादन केले आहे.

त्यामुळे प्लेज करारानुसार प्रतिक्विंटल ८०० रुपयांप्रमाणे कारखान्याने ५३ कोटी १५ लाख रुपये कर्ज खात्यात भरणे बंधनकारक होते. कारखान्याने २०२२-२३ या वर्षात २९६.९९ लाख युनिटची वीज निर्मिती करून बॅंकेच्या परवानगी शिवाय विक्री केली आणि त्यापोटीची रक्कम कर्ज खात्यात भरणा केली नाही.

कारखान्याने ६४९०.०९ हजार लिटर इथेनॉलची परस्पर विक्री केली. परंतु बॅंक खात्यात भरणा केला नाही. त्यामुळे बॅंकेची फसवणूक झाली असून बॅंकेचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या गंभीर कृत्यास कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांच्यासह २१ संचालक जबाबदार आहेत.

त्यामुळे त्यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधान १८६० मधील कलम ४०६, ४२०, ४२१, ४२२, ४२३, ४२४ व कलम ३४ अन्वये फौजदारी गुन्हा दाखल करून संचालकांना योग्य ती शिक्षा मिळणे आवश्यक आहे, असे तक्रारीत म्हटले आहे.

कारखान्यावर आपण निवडून आल्यानंतर ऊस उत्पादकांची देणी पहिल्यांदा देणे गरजेचे होते. ती देणी दिली. साखर विकून राज्य बँकेकडे सुमारे ३० कोटी रुपये भरले आहेत. यासंदर्भात आपण मुंबईतच आलो असून बॅंकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू आहे. लवकरच मार्ग काढला जाईल.

- अभिजित पाटील, अध्यक्ष, श्री विठ्ठल कारखाना

राज्य सहकारी बॅंकेकडून विठ्ठल कारखान्याच्या संचालक मंडळाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची लेखी मागणी करण्यात आली आहे. या विषयी चौकशी करून योग्य ती कायदेशीर कार्यवाही केली जाईल.

- तय्यब मुजावर, पोलिस निरीक्षक, तालुका पोलिस ठाणे, पंढरपूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.