Crime : सुखी संसाराला संशयाचे ग्रहण! देहूरोड परिसरात विवाहितेच्या खुनाच्या लागोपाठ दोन घटना

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा छळ करण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. काही प्रकरणे घटस्फोटापर्यंत येऊन पोहोचतात.
husband wife dispute
husband wife disputesakal
Updated on

पिंपरी - पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा छळ करण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. काही प्रकरणे घटस्फोटापर्यंत येऊन पोहोचतात. संशय आणि रागातून पत्नीचा गळा दाबून जीव घेण्यापर्यंत काहींची मजल जात आहे. अशाच प्रकारच्या दोन घटना मागील आठवड्यात देहूरोड परिसरात लागोपाठ घडल्या.

नाते कोणतेही असो, त्यात प्रेम, विश्‍वास, आदर, सुरक्षिततेची भावना असेल; तर ते टिकते आणि त्याचा आनंदही मिळतो. मात्र अलीकडे अनैतिक संबंध व त्यामुळे घडणारे गुन्हे, घटना यांच्यात वाढ होत आहे. त्यामुळे कौटुंबिक व सामाजिक वातावरण तणावग्रस्त व भीतीयुक्त झाले आहे. यावरून सामाजिक नीतिमत्तेची पर्वा नसणे, कौटुंबिक नात्यातील गैरसमज, बेफिकीर वृत्ती, घसरलेली वैचारिक पातळी, परिणामांचे अज्ञान, दूरदृष्टीचा अभाव दिसून येतो. संशयामुळे कितीतरी आयुष्य, संसार अक्षरश: उद्ध्वस्त होत आहेत.

विवाहितेच्या छळासह तिचा जीव घेण्याच्याही घटना घडत आहेत. त्यामुळे समजूतदारपणा खूप महत्त्वाचा आहे.

खुनाच्या घटना

अनैतिक संबंधाच्या संशयावरून दोन विवाहितांचा खून झाल्याच्या घटना मागील आठवड्यात देहूगाव व तळवडे येथे घडल्या. देहूगाव येथील घटनेत प्रतीक्षा जयदीप यादव (वय २१) या विवाहितेचा पतीने गळा दाबून खून केला; तर तळवडे येथील देहू-आळंदी रस्त्यावरील घटनेत राणीदेवी विशालकुमार बहादूर (वय १९) या विवाहितेचा पतीने गळा व नाक-तोंड दाबून खून केला.

पती-पत्नीमध्ये मनमोकळा संवाद हवा. मनातील भावना विश्‍वासाने व्यक्त करता यायला हवी. विश्‍वास, प्रेम, काळजीने एकमेकांना बांधून ठेवा. मात्र विश्‍वास न ठेवता केवळ संशयच असेल तर संशयाचे भूत त्याला विनाशाकडे, गुन्हेगारीकडे वळवते. वेळीच यावर उपाय केले, ठामपणे निर्णय घेतल्यास आयुष्यात आनंदाची भरारी नक्कीच घेऊ शकतो. एकमेकांना समजून घेणे, विश्‍वास ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

- वंदना मांढरे, समुपदेशिका

कारणे

  • भावनिक एकटेपणा

  • सोशल मीडिया, मोबाईलचा वापर, पासवर्ड लपविणे

  • बिघडत असलेले सामाजिक वातावरण

  • जोडीदाराबद्दल पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन

  • विश्‍वासाचा अभाव

  • मोकळा मिळणारा वेळ, ध्येयहीन आयुष्य

  • भूतकाळातील प्रेम न विसरणे

  • टाइमपास, प्रेमातून अनैतिक संबंधात वाढ

  • कामासंबंधी संपर्क, भेटी, अवेळी कॉल करणे यात पारदर्शकता नसल्यास संशय बळावतो

परिणाम

  • अनैतिक संबंध, सततच्या संशयामुळे कौटुंबिक वातावरण बिघडते

  • मुलांच्या भवितव्यावर वैचारिक पातळीवर अनिष्ट परिणाम होतो

  • सामाजिक नीतिमत्ता ढासळते

  • स्वतःबरोबर कुटुंबालाही त्याचे दूरवर परिणाम भोगावे लागतात

  • नात्यातील विश्‍वास, प्रेम, आदर, काळजी नाहीशी होते

उपाय

  • परस्परांशी मनमोकळेपणाने बोला

  • आपल्या मित्र-मैत्रिणीबद्दल एकमेकांना माहिती असू द्या, नात्यामध्ये पारदर्शकता ठेवा

  • संसारात तिसऱ्या व्यक्तीला डोकावू देऊ नका

  • विश्‍वास, प्रेम, काळजीने एकमेकांना बांधून ठेवा

  • स्वतःला कामात व्यस्त ठेवा, ध्यानधारणा, व्यायाम करा, स्वतःचे अवलोकन करा

  • आपले आयुष्य पणाला लावू नका

  • रागाला, भांडणाला आवर घाला

  • वारंवार संशय घेऊ नका; नात्यांना जपण्यासाठी संधी द्या

  • चूक लक्षात आल्यावर स्वतःला सावरा, नव्याने नात्याला फुलवा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.