रहस्यामुळे खिळवून ठेवणारा थरारपट

रहस्यामुळे खिळवून ठेवणारा थरारपट
Updated on

प्रत्येक चित्रपटाची एक विशिष्ट जातकुळी असते. थरारपट म्हटलं की, त्यात वेगवेगळे प्रकार येतात. कथेच्या केंद्रस्थानी असलेल्या रहस्यामुळे खिळवून ठेवणारा थरारपट, वेगवान घडामोडींमुळे गुंतवून ठेवणारा थरारपट, राजकीय थरारपट, मानसशास्त्रीय थरारपट, इत्यादी. छत्रपाल निनावे दिग्दर्शित ‘घात’ हा चित्रपट व्यक्तिकेंद्री थरारपट म्हणावा लागेल. एकदा ही जातकुळी समजून घेतली की, चित्रपटकर्त्याला नक्की काय दाखवायचे आहे, हे लक्षात आल्याने अपेक्षाभंग किंवा संभ्रम संभवत नाहीत.

‘घात’बाबत लक्षात घ्यायची गोष्ट म्हणजे कथानकाच्या भोवताली गूढता आणि रहस्य असली तरी हा चित्रपट घटनाप्रधान नाही. मुळात त्यात घटना तशा मोजक्याच घडतात. इथे भर घटनांवर नसून वातावरण आणि व्यक्तींवर आहे.

इथली मांडणी अरेषीय पद्धतीची आहे. कथा ज्या रितीने उलगडते त्यात जमीन, जल आणि जंगल हे तीन मध्यवर्ती घटक आहेत. या तीन घटकांना लागून अनुक्रमे तीन प्रमुख पात्रं पाहायला मिळतात- फाल्गुन (धनंजय मंदावकर), एसीपी नागपुरे (जितेंद्र जोशी) आणि रघुनाथ (मिलिंद शिंदे). यातले फाल्गुन आणि रघुनाथ हे दोघे नक्षलवादी आहेत, तर एसीपी नागपुरे हा रघुनाथच्या मागावर असलेला पोलिस अधिकारी आहे. या तिघांचा नक्की संबंध काय नि त्यानुषंगाने येणारे रहस्य काय आहे, याविषयीची ही कथा आहे. त्या अर्थी ‘घात’चे शीर्षक पुरेसे स्वयंस्पष्ट आहे.

नक्षलवाद आणि पोलिस यांकडे पाहणारे फारसे मराठी चित्रपट (किंवा अगदी हिंदी व इतर भाषिक चित्रपटसुद्धा) जवळपास नसल्यात जमा आहेत. त्यामुळे विषयाचे वेगळेपण, हा एक महत्त्वाचा घटक ‘घात’मध्ये मुळातच अस्तित्त्वात आहे.

सोबतच दिग्दर्शक निनावे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी संपूर्ण चित्रपट ज्या शैलीत हाताळला आहे, तेदेखील मुळातूनच पाहण्यासारखे आहे. जंगल, जमीन आणि जल या घटकांचा दृश्य मांडणीत केलेला वापर, बऱ्याचशा पात्रांचा गूढ वावर, करड्या छटा असलेल्या व्यक्तिरेखा- मग ते पोलिस असोत किंवा नक्षलवादी, मोजक्याच जागी वापरले जाणारे; मात्र उत्कंठावर्धक पार्श्वसंगीत अशा अनेक ठळकपणे लक्षात राहणाऱ्या व आपले वेगळेपण जपणाऱ्या गोष्टी चित्रपटात आहेत.

‘घात’मध्ये नक्षलवादाची राजकीय बाजू पुरेशा प्रमाणात येत नाहीत, हे लक्षात घ्यायला हवे. मुळात दिग्दर्शकाला काळ्याकरड्या छटा असलेला जो व्यक्तिकेंद्री थरार दाखवायचा आहे, त्यात अशा मुद्द्यांना जागा नाही. ती असू शकली असती किंवा असली असती, तर चित्रपट अधिक लक्षणीय व वेगळा होऊ शकला असता; मात्र ही अगदीच वेगळी चर्चा झाली! चित्रपटात जे आहे त्याचा विचार केला, तर ‘घात’मध्ये राजकीय बाजू किंवा रहस्यमय किंवा गूढ चित्रपटांत येते तसे चिंतन पुरेशा प्रमाणात नाही, ही इथली मोठी उणीव आहे.

त्यामुळेच आशयाच्या स्तरावर जो भरीवपणा असावा लागतो, तो इथे येत नाही. नक्षलवादाचे राजकीय अंग दिसत नसेल, तर मग इतर कुठल्यातरी प्रकारचा वैचारिक पाया चित्रपटातील संथ, संयतपणाला भक्कम बनवू शकला असता. ही उणीव सोडल्यास इथे नेटके छायाचित्रण आणि उत्तम अभिनय, तसेच नेहमीच्या मराठीत चित्रपटांत न दिसणारा भौगोलिक प्रदेश आणि कानांवर न पडणारी भाषा अशा काही गोष्टी चित्रपटातून हाती लागतात.

गेल्या काही काळात दृक्-श्राव्य माध्यमाचा पुरेसा विचार करणारे, भाषिक स्तरावर वेगळी मांडणी करणारे चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीत बनू लागले आहेत. त्या दृष्टीने विचार केल्यास ‘घात’ हे गूढ, रहस्यमय थरारपट आणि पोलिस किंवा गुन्हेगारांकडे गंभीर दृष्टिकोनातून पाहणारे चित्रपट या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे. भुक्कड विनोद किंवा नाचगाणी या गोष्टींचा अंतर्भाव नसलेले गंभीर चित्रपटही बनवले जाऊ शकतात, हा ठाम दृष्टिकोन इथल्या चित्रपटकर्त्यांनी बाळगलेला आहे. विशेषतः हा चित्रपट दिग्दर्शक निनावे यांच्या दिग्दर्शकीय पदार्पणाचा चित्रपट असल्याने ही मांडणी अधिकच वाखाणण्याजोगी आहे!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.