सध्या हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये हाॅरर काॅमेडी चित्रपटांचा ट्रेण्ड सुरू आहे. मुंज्या, स्त्री २ या चित्रपटांच्या घवघवीत यशामुळे निर्माते व दिग्दर्शक अशा जाॅनरच्या प्रेमात पडलेले दिसत आहेत. त्यामुळे आता हाॅरर चित्रपटांची निर्मिती वाढलेली दिसत आहे. आता प्रदर्शित झालेल्या ए वेंडिग स्टोरी हा चित्रपट त्याच पठडीतील आहे; परंतु हा चित्रपट बनविताना निर्माते व दिग्दर्शक यांची काहीशी फसगत झालेली दिसत आहे. चित्रपटाची कथा उत्तम असली, तरी पटकथेतील गोंधळामुळे हा चित्रपट भरकटला आहे.
ही कथा आहे भारद्वाज कुटुंबीयांची. त्यांच्या कुटुंबातील तरुण (लक्षवीर सरन) च्या वडिलांचे निधन होते. त्यांचे निधन ज्या वेळेला होते ती वेळ खराब असते. म्हणजे वैदिक शास्त्रानुसार पंचक काळात त्यांचे निधन झालेले असते. त्यामुळे तो काळ अत्यंत अशुभ मानला जातो. त्या काळात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळत नाही. मग त्या व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी आणि हा अशुभ काळ टाळण्यासाठी निधन झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना त्याच मृत व्यक्तीबरोबर पाच पुतळ्यांचे दहन करावे लागते; परंतु परदेशातून शिक्षण घेऊन आलेल्या तरुणला हे काही मान्य नसते.
तो आपल्या वडिलांच्या मृत्यूबरोबर अशा पाच पुतळ्यांचे दहन करण्यास नकार देतो. कारण त्याचा वैदिक शास्त्रावर अजिबात विश्वास नसतो. त्या वेळी त्याचा चुलत भाऊ विक्रम (वैभव तत्त्ववादी) त्याला समजावण्याचा प्रयत्न करतो; परंतु तो कुणाचेही ऐकत नाही. तो सगळे पुतळे तेथून फेकून देतो. मग हळूहळू त्याचा परिणाम त्याच्याच कुटुंबामध्ये दिसू लागतो. एकेक अशुभ घटना घडत जातात. या अशुभ घडना कशा घडतात, हे पडद्यावर पाहिलेले बरे. दिग्दर्शक अभिनव पारीक यांनी ही रहस्यमय आणि रोमांचक अशी कथा या चित्रपटामध्ये मांडलेली आहे. ही कथा विणताना हा चित्रपट थरारक कसा होईल, हे पाहिले आहे.
अभिनेता वैभव तत्त्ववादी, मुक्ती मोहन, अक्षय आनंद, मोनिका चौधरी आदी कलाकारांनी अभिनयाची बाजू उत्तम सांभाळली आहे. मुक्ती मोहन आणि वैभव तत्त्ववादी यांची पडद्यावरील केमिस्ट्री उत्तम जुळलेली आहे. मुक्तीने आपल्या भूमिकेतील बारकावे पडद्यावर छान टिपले आहेत. अक्षय आनंदचे या चित्रपटाद्वारे कमबॅक झाले आहे. त्याने आपली भूमिका समरसून साकारली आहे. कलाकारांच्या उत्तम अभिनयाबरोबरच चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी छान झाली आहे. खरे तर एखादा हाॅरर चित्रपट म्हटला की एक रखरखीत आणि भीतीदायक असा बंगला असतो व तेथेच भयानक अशा रहस्यमय घटना घडत जातात.
परंतु या चित्रपटामध्ये सिनेमॅटोग्राफर सुप्रतिम भोळ यांनी प्रकाश आणि सावलीचा उत्तम मेळ साधून रंगीबेरंगी दिसणारा बंगलादेखील भुताचा असू शकतो, हे छान दर्शविले आहे. अर्थात त्यांनी रहस्यमय वातावरणाची निर्मिती उत्तम केली आहे. एखाद्या हाॅरर चित्रपटासाठी त्याचे पार्श्वसंगीत हा आत्मा असतो; परंतु या चित्रपटामध्ये पार्श्वसंगीत फारसे परिणामकारक झालेले नाही. चित्रपटाचे संगीतही कमजोर आहे. या चित्रपटाच्या कथेचा धागा उत्तम आहे; परंतु पटकथा विणताना काहीशी गडबड झाली आहे. त्यामुळे अपेक्षित परिणाम साधला जात नाही.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.