विशाखा बाग
प्रत्येक देशाला एक स्वतःची अशी प्रमुख मध्यवर्ती (सेंट्रल) बँक असते, जी बँक त्या देशाची आर्थिक धोरणं, पतधोरण आणि व्याजदर ठरवते.
या मध्यवर्ती बँकेच्या सर्व धोरणांवरच देशाची अर्थव्यवस्था चालत असते. देशातील अगदी सर्वसामान्य माणसांपासून ते मोठ्या उद्योगसमूहांपर्यंत सर्वांवरच या आर्थिक धोरणांचा परिणाम होत असतो.
अर्थव्यवस्थेचा आढावा घेऊन मगच या बँका आपले धोरण ठरवत असतात, जेणेकरून अर्थव्यवस्थेतील प्रत्येक घटकाला येणाऱ्या नव्या आर्थिक धोरणांचा लाभ घेता येईल.
मुख्यतः महागाईचा दर, बेरोजगारीचा दर, मागणी आणि पुरवठा यामध्ये होणारे बदल या सर्वांचा अभ्यास करून व्याजदराची पुनर्निश्चिती करणे आणि अर्थव्यवस्थेचा गाडा पुन्हा रुळावर आणणे यासाठी प्रत्येक मध्यवर्ती बँक दर दोन ते तीन महिन्यांनी आपले धोरण निश्चित करीत असते. व्याजदरनिश्चितीशिवाय सुद्धा अनेक महत्त्वाच्या सरकारी कामांमध्ये मध्यवर्ती बँक महत्त्वाची भूमिका बजावत असते.