डॉ. श्रीरंग देशपांडे
संभाजीनगर येथे महाराष्ट्राच्या उत्तर आणि दक्षिण विभागांचा संगम होतो. भारतीय इतिहासातील अनेक साम्राज्यांचे इतिहास याच भूमीत घडले. या भूमीचे कला, संस्कृती व ज्ञान या क्षेत्रांमधील कार्य महत्त्वाचे आहे.
पहिला मराठी ग्रंथ जन्माला घालणारे आद्य कवी मुकुंदराज हे अंबाजोगाईचे. आजही संगीतातील प्रमाणग्रंथ मानला जाणारा संगीत रत्नाकर घडविणारे पंडित शारंगदेव हे देवगिरीचे. स्थापत्य कलेचे हेमाद्रीपंत, महानुभाव पंथाचे स्वामी चक्रधर, पैठणचे एकनाथ महाराज तसेच अनेक संतांनी पावन केलेली ही भूमी आहे.