Nirmalwari : निर्मलवारीसाठी करा बारकाईने नियोजन; मंत्री गिरीश महाजन यांचा आदेश

पालखी सोहळ्यात वारकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी स्वच्छ, शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासह स्वच्छ, निर्मल व सुरक्षित वारीसाठी बारकाईने नियोजन करा.
Wari
Wariesakal
Updated on

पुणे - पालखी सोहळ्यात वारकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी स्वच्छ, शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासह स्वच्छ, निर्मल व सुरक्षित वारीसाठी बारकाईने नियोजन करा, असा आदेश ग्रामविकास व पंचायतराज मंत्री गिरीश महाजन यांनी बुधवारी दिला.

निर्मलवारी पूर्वतयारी आढावा बैठकीत त्यांनी हे आदेश दिले. यावेळी ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, उपायुक्त समीक्षा चंद्राकार, वर्षा लड्डा-उंटवाल, विजय मुळीक, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, तसेच सातारा, सोलापूर, नाशिक व जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी (दुरदृश्य प्रणालीद्वारे) उपस्थित होते.

महाजन म्हणाले, ‘यावर्षी पालखी सोहळ्यासाठी गतवर्षीपेक्षा अधिकचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. पालखी सोहळ्यासाठीची कामे वेळेत पूर्ण करावीत. प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी, पालखी मार्ग व विसावा स्थानांवर स्वच्छता राखली जाईल याची विशेष खबरदारी घ्यावी.

स्वच्छतेसाठी पुरेशा प्रमाणात फिरती स्वच्छतागृहे आणि अधिक प्रमाणात स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी. पंढरपूर येथे पालखी तळावर पुरेशा प्रमाणात आणि मोठ्या आकाराच्या कचराकुंड्या ठेवाव्यात. पंढरपूर शहरातील वीजपुरवठा अखंडित राहील याची दक्षता घ्यावी.’

प्रधान सचिव डवले यांनी निधी उपलब्धतेबाबत माहिती दिली. पालखी मार्गावरील रस्ते दुरुस्तीच्या कामांचे कार्यादेश तातडीने देऊन कामे सुरू करावीत. पालखी सोहळ्यासंबंधातील कामे वेळेवर पूर्ण होतील यादृष्टीने नियोजन करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. विभागीय आयुक्त पुलकुंडवार यांच्यासह सातारा, सोलापूर, नाशिक व जळगाव मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने केलेल्या पूर्वतयारीची माहिती दिली.

पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची महापालिका प्रशासनाशी चर्चा

संत ज्ञानेश्‍वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मुक्कामावेळी वारकऱ्यांसाठी आवश्‍यक पिण्याचे पाणी, वैद्यकीय साहाय्यता, फिरती शौचालये आणि स्वच्छता अशा सर्व सोई-सुविधा महापालिका प्रशासनाकडून पुरविण्यात येतील, असे आश्‍वासन राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आले.

संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा मुक्काम ३० जून आणि एक जुलै रोजी पुण्यात असणार आहे. पालखी सोहळ्यानिमित्त शहरात येणाऱ्या वारकऱ्यांसाठी कसबा, विश्रामबाग व भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशी मागणी माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी महापालिका प्रशासनाकडे मंगळवारी (ता. १८) केली. अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे व पृथ्वीराज पी. बी. यांच्याकडे त्यांनी मागण्यांचे निवेदन दिले.

यावेळी कसबा मंडल अध्यक्ष राजेंद्र काकडे, माजी नगरसेवक दिलीप काळोखे, तेजेंद्र कोंढरे, योगेश समेळ, राजेश येनपुरे, मनीषा लडकत, गायत्री खडके, उदय लेले आदी उपस्थित होते. यावेळी स्वच्छता मोहीम राबवून संबंधित परिसर स्वच्छ ठेवण्याचे काम केले जाईल तसेच वारकऱ्यांना पाणी पुरवठा, वैद्यकीय साहाय्यता, फिरती शौचालये आणि आवश्‍यक मंडप व्यवस्था दिली जाईल, असे आश्‍वासन बिनवडे यांनी दिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com