पावसाळी गटारांची स्वच्छता ‘दिखाऊ’

पावसाळी गटारांची स्वच्छता ‘दिखाऊ’

Published on

पुणे, ता. १२ ः अवघ्या एक तासाच्या पावसाने शहराची दाणादाण उडत प्रमुख रस्ते, चौक पाण्याखाली जात आहेत. महापालिका पावसावर याचे खापर फोडून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करत आहे. वारंवार अशा घटना घडत आहेत, अशावेळी पावसाळी गटारांची केवळ दिखाऊ स्वच्छता होऊनही ठेकेदारांना पाठीशी घालणे, अधिकाऱ्यांकडून थातूरमातूर उपाययोजनांचा दावा करणे, बांधकाम व्यावसायिकांच्या दबावाखाली नाले वळविणे, बुजविण्याच्या प्रकाराला संमती दिली जात आहे. या प्रश्‍नांच्या मुळाशी जाऊन कठोर भूमिका घेणार का?, झालेल्या चुका सुधारणा करणार का? असे प्रश्‍न आता उपस्थित होत आहेत.

गेल्या आठवड्यात पुणेकरांनी दोन वेळा शहरात पूरस्थिती अनुभवली. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच अशी स्थिती असेल तर पावसाळ्यात काय होणार? असा प्रश्‍न पुणेकरांना पडत आहे. दरवर्षी महापालिका प्रशासनातर्फे पावसाळ्यापूर्वी नाल्यांची सफाई, पावसाळी गटारांची स्वच्छता केली जाते. त्यासाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय निविदा काढल्या जातात. महापालिकेने निश्‍चित केलेल्या खर्चाच्या तुलनेत राजकीय आश्रय लाभलेले हे ठेकेदार ५०-५५ टक्क्यांपर्यंत कमी दाराने निविदा भरून कामे मिळवत आहेत. कमी खर्चामध्ये काम उरकायचे असल्याने ठेकेदार ठरावीक ठिकाणचे जीपीएस टॅगिंग केलेले काही फोटो प्रशासनाला दाखवून काम पूर्ण केल्याचा दावा करत आहेत. प्रशासन देखील यावर खूष होऊन ८० टक्के, ९० टक्के कामे पूर्ण झाली आहेत असे सांगून स्वतःची सुटका करून घेत आहे. शहरातील पुढारी, अधिकारी आणि ठेकेदार यांच्या साटेलोट्यामुळे पुणेकरांचे जगणे अवघड होत आहे.

नाल्यांमधून निघाले
गादी अन् ड्रम
सिंहगड रस्त्याचे नाले सफाईचे काम मिळालेल्या ठेकेदाराने तब्बल ५३.५३ टक्के कमी दराने निविदा भरून हे काम मिळवले होते. त्यामुळे कामही गुणवत्तापूर्वक झाले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. शनिवारी (ता. ८) मुसळधार पाऊस झाल्यानंतर सिंहगड रस्त्यावरील माणिकबागेत अवघ्या काही वेळात दुकानांमध्ये पाणी शिरले, कंबरेपर्यंत पाणी तुंबल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले. त्यामुळे नाले सफाई झालीच नसल्याचे बिंग फुटले. अखेर जागे झालेल्या महापालिका प्रशासनाने यंत्रणा कामाला लावली. पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था केली. यावेळी नाल्याची तपासणी केली असता त्यामध्ये डांबरचा ड्रम, लाकडी ओंडके, गादी असे अन्य वस्तू बाहेर काढण्यात आल्या. यंदाच्या वर्षी ठेकेदाराने या ठिकाणी नाले सफाई केलेली होती, पण त्यांच्याकडून कलव्हर्ट स्वच्छ केलेले नव्हते. त्यामुळे पाणी तुंबून नागरिकांचे मोठे नुकसान झाल्यानंतर जेसीबी लावून हा कचरा बाहेर काढला.

पावसाळी गटारांची स्वच्छता नाहीच
दरवर्षी पावसाळी गटारांच्या स्वच्छतेकडे प्रशासनाने लक्ष दिलेले नाही. धोकादायक ठिकाणांवरील चेंबर व पावसाळी गटार स्वच्छ केले. पण शहराच्या उर्वरित भागात ही कामे झालेली नाहीत हे ‘सकाळ’ने २० मे रोजी प्रकाशित करून पावसाचे पाणी तुंबण्याचा धोका असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतरही प्रशासनाने पावसाळी गटाराच्या स्वच्छतेची आकडेवारी दर्शवत कामे व्यवस्थित झाली असल्याचा दावा केला आहे. शहरात दोन वेळा पूर येऊन गेला तरीही अजूनही पावसाळी गटार स्वच्छ करणे, चेंबरची माती, कचरा काढून टाकणे, रस्त्यावर पसरलेली खडी काढणे याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे आगामी काळातही जोरदार पाऊस झाल्यावर पुन्हा पाणी तुंबण्याची भीती आहे.

पुणेकरांचे नशीबच
शहरात काही काळ मुसळधार पाऊस पडला की रस्ते पाण्याखाली जातात. तास दीड तास मुसळधार पाऊस पडला तर शहरात कंबरेपर्यंत पाणी तुंबत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण होते. पण सुदैवाने हा जोरदार पाऊस सलग काही तास पडत नसल्याने पुढील अनर्थ टळत आहे. महापालिका प्रशासन या आपत्तीला सामोरे जाण्यासाठी तयार नसले तरी पाऊस थांबल्याने पुढील संकट टळले हे पुणेकरांचे नशीबच म्हणावे अशी स्थिती आहे.

रस्त्यांच्या प्रकारानुसार लांबी (किलोमीटरमध्ये)

डांबरी रस्ता - ९४४.१२
सिमेंट काँक्रिट - २१०.३९
थीन व्हाइट टॅपिंग - १७७.६७
पेव्हर ब्लॉक- २९.५५
मास्टिक ॲस्फाल्ट - १९.८६
अनसिल्ड - १७.१८
समाविष्ट गावातील रस्ते - ६००

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.