Sharad Pawar : भाजपकडून सत्ता काढण्याची लोकांची भूमिका; शरद पवार यांचा दावा

‘‘राज्यात फिरताना मोदी सरकार आपल्या हिताचे काम करेल, हे लोकांना पटत नसल्याचे चित्र मला दिसते.
Sharad Pawar
Sharad Pawarsakal
Updated on

सोमेश्वरनगर : ‘‘राज्यात फिरताना मोदी सरकार आपल्या हिताचे काम करेल, हे लोकांना पटत नसल्याचे चित्र मला दिसते. भाजपच्या हातातून सत्ता काढण्याची लोकांची भूमिका आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रात सत्तेत बदल करावाच लागेल. तुमची एकजूट असेल तर आपले सरकार आणू, याची खात्री देतो. त्यानंतर तुमचे दुखणे, तुमचे प्रश्न कसे सुटत नाहीत तेच मी बघतो,’’ असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले.

शरद पवार यांनी मंगळवारी (ता. १८) बारामती तालुक्यातील निंबूत, करंजेपूल, वडगाव निंबाळकर, कोऱ्हाळे खुर्द आदी परिसरात दौरा केला. त्यावेळी करंजेपूल येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने झालेल्या शेतकरी जनसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जगन्नाथ शेवाळे होते. याप्रसंगी एस. एन. जगताप, सतीश खोमणे, प्रवीण गायकवाड, युगेंद्र पवार, बी. एम. गायकवाड, प्रवीण भोसले, प्रदीप कणसे, विलास शेंडकर, बुवासाहेब हुंबरे, नुसरत इनामदार आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले, ‘‘पंतप्रधान व त्यांच्या सहकाऱ्यांपुढे आम्हा त्रयिंचा टिकाव कसा लागेल, अशी लोकांना काळजी होती. पण तुमच्यासारख्या लाखो लोकांनी चोख काम केले. आता जुने काही काढायचे नाही. जे येतील त्यांच्यासोबत आणि जे येणार नाहीत, त्यांच्याशिवाय पुढे जायचे. महाराष्ट्राच्या हितासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करायची.’’ उद्योजक राजेंद्र जगताप यांनी प्रास्ताविकात जिराईत भागाचा पाणीप्रश्न आणि साखर उद्योगाचे प्रश्न सोडवावेत, अशी मागणी केली.

‘तुमच्या किमयेमुळे छप्पन वर्षे संसदीय कामात असणारा मी एकमेव आहे. पण आताच्या निवडणुकीत लोकं बोलत नसल्याचे मी पहिल्यांदाच पाहिले. दहशतीचे वातावरण होते की, काय माहिती नाही. पण लोक शांत होते. मतदान केंद्रात गेल्यावर मात्र बटण कोणते दाबायचे, हे त्यांना सांगावे लागले नाही. यामुळे संपूर्ण हिंदुस्थानात, जगात बारामतीकर किती समंजस आहेत, हा संदेश गेला,’’ असे पवार म्हणाले.

‘लोकसभेप्रमाणे विधानसभेला साथ द्या’

‘संघर्षाच्या स्थितीमध्ये लोकांनी आमच्यावर विश्वास टाकून लोकसभा निवडणुकीत भरघोस मतदान केले. दहा पैकी आठ जागी यश मिळाले. आता लोकांची जबाबदारी संपली, यापुढे आमची जबाबदारी सुरू झाली. देशातील १३० कोटी जनतेला अन्न पुरवणाऱ्या शेतकऱ्यांसाठी काम करणार आहे. यापुढील सर्व निवडणुकीत लक्ष घालून समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहू. राज्यातील सत्ता बदलासाठी सहकार्य करा. ज्या पद्धतीने लोकसभेला मतदान केले, त्याच पद्धतीने विधानसभा निवडणुकीत आम्हाला साथ द्या,’’ असे आवाहन शरद पवार यांनी कोऱ्हाळे खुर्द येथे शेतकरी जनसंवाद कार्यक्रमात केले.

दादा बदलण्याची मागणी

लोकसभा निवडणुकीत शरदचंद्रजी पवार यांच्या विचारांना लोकांनी साथ देऊन मतदान केले. आता लोकांना बदल हवा आहे. बारामती विधानसभेला युगेंद्र पवार यांना उमेदवारी देऊन दादा बदला, असा आग्रह प्रस्ताविक भाषणातून हर्षद खोमणे यांनी केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.