ITMS System : पुणे-सातारा महामार्गही होणार ‘इंटेलिजंट’; ‘आयटीएमएस’ यंत्रणा करणार कार्यान्वित

देशातील व्यग्र मार्गांपैकी एक असलेल्या पुणे-सातारा महामार्गावर ‘आयटीएमएस’ (इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम) यंत्रणा बसविण्यात येणार आहे.
ITMS System
ITMS Systemsakal
Updated on

- प्रसाद कानडे

पुणे - देशातील व्यग्र मार्गांपैकी एक असलेल्या पुणे-सातारा महामार्गावर ‘आयटीएमएस’ (इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम) यंत्रणा बसविण्यात येणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तसा प्रस्तावही दिला आहे. राज्याच्या परिवहन विभागाच्या अखत्यारीत हे कामे केले जाईल. या यंत्रणेमुळे अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.

सध्या पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर ‘आयटीएमएस’ प्रणाली कार्यान्वित करण्याचे काम वेगाने सुरू आहे, ती दोन महिन्यांत पूर्ण क्षमतेने सुरू होईल. या धर्तीवर आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अपघात रोखण्यासाठी देशातील व्यस्त मार्गांवर ‘आयटीएमएस’ बसविण्याचे निश्चित केले आहे. यामध्ये पुणे-सातारा मार्गाचाही समावेश आहे. पहिल्या टप्प्यात पुणे ते सातारादरम्यानचे काम केले जाईल, त्यानंतर त्याचा विस्तार करण्याचे नियोजन आहे.

...हे आहेत सात ब्लॅक स्पॉट

महामार्गावर सात ब्लॅक स्पॉट आहेत. यामध्ये खेड शिवापूर जवळचा दर्गा फाटा, चेलाडी, सारोळा पूल, शिंदेवाडी, पंढरपूर फाटा, पेपर मिल व खंडाळा येथे वारंवार अपघात होतात. अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी ‘आयटीएमएस’ची मोठी मदत होईल. सर्वेक्षणाला लवकरच सुरुवात होईल. यात परिवहन विभाग, महामार्ग पोलिस व ‘एनएचएआय’ यांचा समावेश असणार आहे.

सुमारे ५० हजार वाहनांची वाहतूक

पुणे-बंगळूर महामार्गावर दररोज सुमारे ५० हजार वाहनांची वाहतूक होते. त्यात शनिवार आणि रविवारी आणखी वाढ होते. मुंबईहून बंगळूरला जाणाऱ्या वाहनांमध्ये जड वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या अधिक आहे. त्यामुळे नवीन कात्रज बोगदा, नवले पूल येथे मोठ्या प्रमाणात अपघात होतात. पुणे-सातारादरम्यान वर्षाला ६० ते ६५ अपघात झाल्याची नोंद महामार्ग पोलिसांकडे आहे.

महामार्गावर लेन सांभाळणे गरजेचे

  • राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नियमानुसार रस्त्याच्या डावीकडून जाणारी लेन क्रमांक-१ अवजड माल वाहतुकीच्या वाहनांसाठी आहे, त्यांच्या वेगाची मर्यादा प्रतितास ८० किलोमीटर आहे.

  • उजवीकडची लेन क्रमांक-२ हलकी अर्थात चारचाकी वाहनांसाठी आहे, त्यांची वेगमर्यादा प्रतितास १०० किलोमीटर आहे.

  • ही लेन ओव्हरटेकची असून, पुढे जाऊन पुन्हा आपल्या निर्धारित लेनमधूनच प्रवास करायचा असतो, यावर तुम्हाला दीर्घकाळ वाहन चालविता येणार नाही.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून पुणे-सातारा मार्गावर ‘आयटीएमएस’चा प्रस्ताव आला आहे. त्यानुसार रस्त्याचे सर्वेक्षण केले जाईल. प्रस्तावाला मंजुरी मिळताच निविदा प्रक्रिया राबवून काम सुरू होईल.

- विवेक भीमनवार, परिवहन आयुक्त, मुंबई

‘आयटीएमएस’ म्हणजे काय?

‘आयटीएमएस’ म्हणजे इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम. याद्वारे वाहतुकीचे नियंत्रण सॅटेलाईटद्वारे होईल. यामध्ये ड्रोनचाही वापर केला जातो. मार्गावर प्रवेश करणाऱ्या प्रत्येक गाडीचा रेकॉर्ड ठेवण्यात येतो. प्रवास पूर्ण होईपर्यंत त्या गाडीवर नजर ठेवली जाते. अपघात झाल्यास गाडीपर्यंत तातडीने मदत पोहोचण्याची यंत्रणा उपलब्ध आहे. संपूर्ण रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे असून, लेन कटिंग करणाऱ्या वाहनांच्या नोंदी ठेवता येतात.

प्रणाली का महत्त्वाची?

वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर ‘आयटीएमएस’ प्रणाली खूप फायदेशीर ठरते. मार्गावर वाहतुकीची शिस्त पाळली जावी, अपघात टळावे, अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळावी, पथकर वसुली जलद, अचूक तसेच पारदर्शक पद्धतीने व्हावी, यासाठी आधुनिक यंत्रणा बसविली जाते.

मार्गावर ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे असते, त्यामुळे वाहनांवर लक्ष ठेवणे सोपे होते. वाहनांचा वेग तपासणारी ‘अ‍ॅव्हरेज स्पीड डिटेक्शन सिस्टीम’ व वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांचा शोध घेणारी ‘लेन डिसिप्लीन व्हायलेशन डिटेक्शन सिस्टीम’ असल्याने अपघात कमी होण्यास मदत होते. त्यामुळे ही प्रणाली महत्त्वाचे ठरते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.