Rainy Tour : पावसाळी भटकंती करताना... अशी घ्या काळजी

पावसाळा सुरू झाल्यावर सर्वांना वेध लागतात, ते म्हणजे वर्षाविहार आणि भटकतींचे.
Rainy Tour
Rainy Toursakal
Updated on

पुणे - पावसाळा सुरू झाल्यावर सर्वांना वेध लागतात, ते म्हणजे वर्षाविहार आणि भटकतींचे. पावसाच्या आगमनाने खुललेले निसर्गाचे रूप पाहण्याचा मोह साऱ्यांनाच होतो; पण भटकंतीवेळी अचानक पावसाचा जोर वाढणे, दरड कोसळणे यांसह विविध कारणांनी अपघाताच्या शक्यताही वाढतात. या पार्श्‍वभूमीवर पावसाळ्यात भटकंतीसाठी बाहेर पडताना नागरिकांनी संपूर्ण काळजी घ्यावी, धोकादायक ठिकाणे टाळावीत, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.

अशी घ्या काळजी

  • ओळखीच्या आणि अनुभवी ग्रुपबरोबरच बाहेर पडा

  • कोठे व किती दिवस जात आहोत, याची माहिती कुटुंबीयांना द्या

  • जेथे जाणार आहात, तेथील संपूर्ण माहिती व पावसाचा अंदाज घ्या

  • पाण्याच्या प्रवाहात उतरायचे धाडस करू नका

  • धुक्याचे प्रमाण अधिक असल्यास जाऊ नका

  • गरज पडल्यास स्थानिकांची अथवा वाटाड्यांची मदत घ्या

  • मोबाईल चार्ज ठेवा, बॅटरी टिकावी यासाठी कमीत कमी वापर करा

  • अवघड ठिकाणी फोटो किंवा सेल्फी घेणे टाळा

‘रील्स’चा मोह टाळा

भटकंतीला गेल्यानंतर सेल्फी काढून अथवा रील्स तयार करून सोशल मीडियावर टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. यासाठी काहीजण धोकादायक ठिकाणी जातात किंवा जिवावर बेतू शकणारे धाडस करतात. त्यातून काहींना जीवही गमवावा लागू शकतो. मानवी चुकांमुळे घडणारे अपघात टाळण्यासाठी सेल्फी आणि ‘रील्स’चा मोह टाळलेलाच बरा.

मदतीसाठी संपर्क :

अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ आणि गार्डियन गिरीप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनियरिंग यांच्यातर्फे अडचणीत सापडलेल्या पर्यटकांसाठी आणि गिर्यारोहकांसाठी बचावाचे काम केले जाते. डोंगराळ व दुर्गम भागातील आपत्कालीन मदतीसाठी ७६२०-२३०-२३१ या २४ तास सुरू असलेल्या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

ट्रेकला जाताना...

  • अनुभवी लोकांबरोबरच ट्रेक करा

  • ‘फर्स्ट मॅन’ व ‘लास्ट मॅन’ यांच्यामध्ये चाला

  • प्रथमोपचाराचे साहित्य बरोबर ठेवा

  • ट्रेक एक दिवसाचा असला, तरी टॉर्च जवळ ठेवा

  • किल्ल्यांवरील तट, दरवाजे, इतर पडीक अवशेष यावर चढण्याचा प्रयत्न करू नका

  • शेवाळलेल्या जागा व पायऱ्या येथे जपून चाला

नौकाविहार नियमांचे पालन करा

मावळ, मुळशी, खेड, जुन्नर, भोर, वेल्हा, आंबेगाव या पश्चिम घाटामध्ये वर्षा विहारासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी कंत्राटदारांनी जलाशयात नौकाविहार करताना नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले आहे.

कंत्राटदारांनी संबंधित पोलिस आयुक्त किंवा पोलिस अधीक्षक यांचे ‘ना-हरकत प्रमाणपत्र’ घ्यावे. पर्यटकांची तपासणी व्यवस्था कंत्राटदाराकडून उभारावी. कोणत्याही प्रकारचा अपघात झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी ठेका घेणारी संस्था किंवा व्यक्ती यांची असेल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

पावसाळा सुरू झाल्यावर डोंगर, धबधबे, गड-किल्ले अशा ठिकाणी लोकांची गर्दी पाहायला मिळत आहे. तेथील धोक्यांची माहिती करून घेणे आवश्यक आहेत. निसरड्या वाटा, दाट धुके, अचानक येणारा मोठा पाऊस आणि त्यामुळे वाढणारे ओढे-नाले, अशा परिस्थितीत कुठेही धाडस करू नये. अनेक वेळा मानवी चुकांमुळे जीव संकटात सापडतो. योग्य खबरदारी घेऊनच पावसाळ्यात भटकंती करावी.

- उमेश झिरपे, अध्यक्ष, अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.