पुणेः पुण्यातील गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेच्या कुलगुरु पदावरुन डॉ. अजित रानडे यांना हटवण्यात आले आहे. एवढ्या मोठ्या अनुभवाच्या व्यक्तीला यूजीसीने चुकीच्या पद्धतीने बाजूला केल्यामुळे संताप व्यक्त होतोय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही राज्य सरकार, केंद्र सरकार आणि यूजीसीला खडे बोल सुनावले आहेत.
राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. केंद्र सरकारने पुनर्विचार करुन चूक सुधारली पाहिजे, अशी अपेक्षा राज यांनी व्यक्त केलीय.
सस्नेह जय महाराष्ट्र,
गेले २ दिवस वर्तमानपत्रामंध्ये पुण्यातील गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेच्या कुलगुरू पदावरून डॉ. अजित रानडे यांना अतिशय चुकीच्या पद्धतीने हटवल्याची बातमी वाचनात येत आहे. डॉ. अजित रानडेंसारख्या एका उच्चविद्याविभूषित, खाजगी क्षेत्रात खूप मोठी कामगिरी केलेल्या व्यक्तीला, अशा पद्धतीने पदावरून हटवणं हे अत्यंत चुकीचं आहे. बरं, त्यासाठी रानडे यांना १० वर्षांचा अध्यापनाचा अनुभव नाही हे कारण पुढे केलं जात आहे. मग त्यांची नियुक्ती करताना, ही बाब लक्षात आली नव्हती का? अडीच वर्ष या पदावर राहून त्यांनी जी कामगिरी केली, त्यानंतर अचानक ही आठवण कशी होते ?