Ram Mandir Ayodhya : राम मंदिरावरून वाजपेयी यांना हिणवणाऱ्यांच्या छाताडावर बसवून राम मंदिर बनविले - देवेंद्र फडणवीस

'भाजप सरकार आल्यास राम मंदिर बनविण्याबरोबरच ३७० कलम हटविण्याचे स्वप्न अटल बिहारी वाजपेयी यांनी पाहिले होते, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ते स्वप्न पूर्ण केले.
Devendra Fadnavis
Devendra Fadnavissakal
Updated on

पुणे - 'भाजप सरकार आल्यास राम मंदिर बनविण्याबरोबरच ३७० कलम हटविण्याचे स्वप्न अटल बिहारी वाजपेयी यांनी पाहिले होते, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ते स्वप्न पूर्ण केले. पंतप्रधान मोदी यांनी मांडलेल्या नवभरताच्या संकल्पनेची सुरवात वाजपेयी यांनी केली होती.

तेव्हा, विरोधक वाजपेयी यांना 'मंदिर वहीं बनाऐंगे, तारीख नही बताऐंगे' असे हिणवायचे, आता त्यांच्या छाताडावर बसवून मंदिर बनविले, २२ जानेवारीला या तुम्हाला राम मंदिर दाखवू' अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राम मंदिर निर्मितीला विरोध करणाऱ्या विरोधकांना डिवचले.

संस्कृती प्रतिष्ठानच्यावतीने किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे व 'प्राज इंडस्ट्रीज'चे प्रमुख डॉ. प्रमोद चौधरी यांना उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते "अटल संस्कृती गौरव पुरस्कार' प्रदान करण्यात आला.

यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सिंबायोसिसचे अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर, माजी केंद्रीय मंत्री व खासदार प्रकाश जावडेकर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर, अभिनेते मनोज जोशी, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष व माजी महापौर मुरलीधर मोहोळ आदी उपस्थित होते.

'वाजपेयी यांनी जगाचा विरोध झुगारून अणुचाचणी घडवून आणली. त्यामुळे अमेरिकेसह अनेक देशांनी भारतावर निर्बंध लादले. मात्र वाजपेयी झुकले नाहीत. अखेर जगाने निर्बंध मागे घेतले. वाजपेयी अर्थतज्ञ नव्हते, परंतु त्यांनी गावोगावी रस्त्यांचे जाळे निर्माण करून अर्थव्यवस्थेला बळकटी दिली.' असे सांगत फडणवीस यांनी वाजपेयी यांच्या आठवणींना उजाळा दिला.

डॉ. प्रभा अत्रे यांच्या कार्याचा गौरव करून फडणवीस म्हणाले, 'डॉ. अत्रे यांनी भारतीय शास्त्रीय गायन प्रेक्षकांपर्यंत फक्त पोचविले नाही, तर आपल्या गायनातून श्रोत्यांना गाण्याची अनुभूती घडविली. अनेक गायक घडविले. त्यामुळे त्यांना देशाने सर्वोच्च पुरस्कार देऊन सन्मानित केले. त्यांना हा पुरस्कार दिल्याने पुरस्काराची उंची वाढली आहे.'

डॉ. अत्रे म्हणाल्या, 'माझ्या हाताला दुखापत झाल्याने सवाई गंधर्व महोत्सवाला जाता आले नाही, मात्र अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने पुरस्कार दिला जातो, तेव्हा त्याचे मूल्य वेगळेच असते. वाजपेयी उत्तम वक्ते, संवेदनशील माणूस व राजकारणात राहूनही टोकाची नैतिकता जोपासण्याचे काम त्यांनी केले. माझ्या पुस्तकाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते झाले. माझ्या पुस्तक प्रकाशनावेळी त्यांनी पुस्तकावर दिलेली स्वाक्षरी आजही मला त्यांच्या चेहऱ्यावरील स्मित आठवते.'

डॉ. चौधरी म्हणाले, 'इथेनॉल हे स्वदेशी इंधन असल्याने वाजपेयी यांनी या इंधनाला प्रोत्साहन दिले. त्यांच्या नावाने मला पुरस्कार मिळाला. हा माझ्यासाठी चांगला योग आहे. हा पुरस्कार माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे.' कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोहोळ यांनी केले. तर आभार सुनील महाजन यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांनी केले.

इथेनॉल क्रांतीचे जनक डॉ. प्रमोद चौधरी

इथेनॉलचे महत्त्व वाजपेयी यांनी ओळखले. त्यांनी पहिल्यांदा इथेनॉल व बायोफ्युएल धोरण बनविले. इथेनॉलचा जैव इंधन म्हणून वापर व्हावा, म्हणून जैव इंधन पॉलिसी तयार केली. त्या धोरणाची प्रत्यक्ष अंमलबजावणी डॉ. चौधरी यांनी केली. साखर कारखान्यांमधून इथेनॉल व अन्य उत्पादने तयार होऊ लागले, त्याचे श्रेय प्राज इंडस्ट्रीज व डॉ. चौधरी यांच्या रूपाने मराठी माणसाला जाते, याचा अभिमान वाटतो, अशा शब्दात फडणवीस यांनी डॉ. चौधरी यांच्याबद्दल गौरवोद्‌गार काढले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.