माणमधील दोघांच्या खूनप्रकरणी ७ जणांना जन्मठेप

माणमधील दोघांच्या खूनप्रकरणी ७ जणांना जन्मठेप

Published on

राजगुरुनगर/ चाकण, ता. २७ : माण (ता. मुळशी) येथील जमिनीच्या वादातून दोघांना पळवून आणून खेड तालुक्यातील पिंपरी खुर्द गावाच्या हद्दीतील आडरानात लाकडी दांडक्याने आणि दगडाने ठेचून खून करणाऱ्या ७ आरोपींना खेड जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए. एस. सय्यद यांनी शुक्रवारी (ता. २७) जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.
पिंपरी खुर्द गावाच्या हद्दीत ११ जुलै २००९ रोजी ही दुहेरी खुनाची घटना घडली होती. या घटनेत पंढरीनाथ सदाशिव पारखी (वय ६०) आणि चंद्रकांत ऊर्फ पप्पू ज्ञानोबा पारखी (वय ३७) या दोघांचा खून झाला होता. रोहिदास ऊर्फ गणपत ऊर्फ बाळू जयसिंग ठाकर (वय ३९, मयत), राजू जयसिंग ठाकर (वय ३६), संतोष जयसिंग ठाकर (वय २४), प्रीतम ऊर्फ रोड्या पंडित ठाकर (वय १९), जगदीश ऊर्फ गोट्या शिवाजी ठाकर (वय २१), चंद्रशेखर शिवाजी ठाकर (वय १९), तुषार प्रल्हाद ठाकर (वय १९), रघुनाथ दामू पारखी (वय ५७), (सर्व रा. माण), अशी जन्मठेप झालेल्या आरोपींची नावे आहेत.
या प्रकरणातील ठाकर आणि पारखी ही दोन कुटुंबे माण गावातील आहेत. खून झालेले चंद्रकांत ऊर्फ पप्पू पारखी यांनी त्यांच्या ७३ गुंठे जमिनीचे साठेखत मृत आरोपी रोहिदास ठाकर याला करून दिले होते. मात्र, रोहिदास याला साठेखतात दिलेल्या मुदतीत खरेदीचा व्यवहार पूर्ण करता आला नाही. त्यावरुन पुणे येथील दिवाणी न्यायालयात त्यांच्यात दावा सुरू होता. या दाव्यात पुणे न्यायालयाने पारखी यांच्या बाजूने निकाल दिला होता. त्याचा राग ठाकर परिवाराला होता.
दरम्यान, ११ जुलै २००९ रोजी चंद्रकांत पारखी आणि त्यांचे चुलते पंढरीनाथ चाकण येथील जनावरांच्या बाजारात चारचाकी वाहनाने शेळ्या विक्रीसाठी घेऊन आले होते. त्यांच्या सोबत त्यांचे भाऊबंद रघुनाथ पारखी हेही होते. शेळ्या विक्री झाल्यानंतर चाकण ते रोहकल रस्त्यावर असलेल्या पंढरीनाथ पारखी यांच्या मुलीकडे हे तिघेजण काहीवेळ थांबले. मुलीकडून ते पुन्हा आपल्या गावाकडे जाण्यासाठी निघाले असता थोड्याच अंतरावर ९ आरोपींनी त्यांना गाठले आणि बळजबरीने पिंपरी खुर्द गावाच्या हद्दीतील आडरानात नेले. सर्वांनी या दोघांना लाकडी दांडकी आणि दगडांनी ठेचून मारले. त्यानंतर पुरावे नष्ट केले.
याप्रकरणी मृत पंढरीनाथ यांचा मुलगा संदीप पारखी याने चाकण पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात सुरुवातीला निराळ्याच आरोपींना अटक झाली होती. मात्र, पुढे तपास सीआयडीकडे देण्यात आला. सीआयडीच्या पोलिस निरीक्षक दीपाली घाडगे यांच्या पथकाने खरे आरोपी शोधून काढले. घटनेच्या दिवशी मृतांबरोबर असलेल्या रघुनाथ पारखी यानेच कट रचल्याचे निष्पन्न झाले. सर्व आरोपींना अटक केली.
खेड न्यायालयात सन २०१४ पासून हा खटला सुरू होता. सरकारी वकील ॲड. विजय सावंत यांनी एकूण २० साक्षीदार तपासले. दरम्यान, एक आरोपी वारला, तर एक आरोपी अल्पवयीन होता. उर्वरित ७ आरोपींना न्यायाधीश ए. एस. सय्यद यांनी खुनाच्या आरोपाखाली जन्मठेप आणि अपहरण व कटकारस्थानाच्या आरोपाखाली ५ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.