महाराष्ट्रात विकास करणारे सरकार निरंतर हवे

महाराष्ट्रात विकास करणारे सरकार निरंतर हवे

Published on

पुणे, ता. २९ ः ‘‘महाराष्ट्रात अन्य पक्षांचे सरकार असताना मेट्रो, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन, बिडकीन औद्योगिक क्षेत्र, सिंचन यांसह अनेक प्रकल्प रखडले होते. पूर्वीच्या काळातील सरकारचे जुने विचार आणि दूरदृष्टीच्या अभावामुळे शहरांच्या विकासाचे नियोजन झाले नाही. या सरकारला मेट्रोचा एकही खांब उभारता आला नाही. त्याचा फटका महाराष्ट्राला आणि पुण्याला बसला आहे. एकनाथ शिंदे यांच्या डबल इंजिन सरकारमुळे प्रकल्पांची गती वाढली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात विकासाला प्राधान्य देणारे सरकार निरंतर सत्तेत असणे आवश्‍यक आहे, अशा शब्दांत काँग्रेसवर टीका करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला पुन्हा सत्तेत आणण्याचे आवाहन केले.
जिल्हा न्यायालय ते स्वारगेट मेट्रो स्टेशन, बिडकीन औद्योगिक प्रकल्पाचे उद्‍घाटन, स्वारगेट ते कात्रज भुयारी मेट्रो, भिडे वाडा स्मारकाचे भूमिपूजन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन झाले. त्यावेळी ते बोलत होते. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल ऑनलाइन उपस्थित होते. तर स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार श्रीरंग बारणे, मेधा कुलकर्णी, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, सुनील कांबळे, योगेश टिळेकर, श्रीकांत भारतीय, उमा खापरे, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे उपस्थित होते. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मोदी यांचे स्वागत केले. वसुंधरा काशिकर यांनी सूत्रसंचालन केले.
नरेंद्र मोदी म्हणाले, ‘‘पुणे हे शहरी विकासाचे केंद्र बनणे गरजेचे आहे. पुण्याची लोकसंख्या वेगाने वाढत आहे. यामुळे शहराच्या विकासाची गती कमी न करता उलट वाढली पाहिजे. शहराचा विस्तार झाला तरी सर्व भाग सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेने जोडले गेले पाहिजेत. याच विचाराने महायुती सरकार दिवस-रात्र काम करत आहे. पुण्याची गरज लक्षात घेऊन मेट्रोसेवा खूप आधी सुरू होण्याची गरज होती. पण गेल्या काही दशकांत शहरी विकासामध्ये नियोजन आणि दूरदृष्टी नसल्याने प्रकल्पांच्या फाइल मंजूर होत नसत. मंजूर झाल्या तरी प्रकल्प अनेक वर्षे पूर्ण होत नसत. त्यामुळे देशाचे, महाराष्ट्राचे आणि पुण्याचे मोठे नुकसान झाले आहे.’’

मोदी म्हणाले...
- २००८ पासून पुणे मेट्रोची केवळ चर्चा. पण आमच्या सरकारने २०१६ मध्ये मेट्रोचे भूमिपूजन केले व आज उद्‍घाटन
- आज पुणे अत्याधुनिक मेट्रोचा वेग आणि विस्तार वाढला आहे
- आजच्या कार्यक्रमात जुन्या कामाचे उद्‍घाटन केलेच, पण सोबतच नव्या कामाचे भूमिपूजनही केले आहे
- जुने विचार व कार्यपद्धती असती तर यातील एकही काम पूर्ण झाले नसते
- सोलापूरला विमानतळ झाल्याने पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी थेट विमानाने जाता येईल. शेती, व्यापारवाढीस मदत होईल
- आम्ही विकासासोबत वारसाही जनत करत आहोत

स्मारक नव्या पिढीला प्रेरणा देणारे असेल
‘‘विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करताना आपल्याला परंपरांना सोबत घेऊन जायचे आहे. महाराष्ट्रात पायाभूत सुविधा निर्माण करताना त्याचा लाभ प्रत्येक वर्गास, समाजाला मिळाला पाहिजे. समाजात बदल घडविण्याची जबाबदारी जेव्हा महिला घेते, तेव्हा काय क्रांती घडते हे सावित्रीबाई फुले यांच्या कार्यातून महाराष्ट्राने बघितले आहे. त्यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केलेल्या भिडे वाड्याचे संवर्धन करणे आपले कर्तव्य असून, हे स्मारक नव्या पिढीला प्रेरणा देणारे असेल,’’ असे मोदी यांनी सांगितले.

सर्व क्षेत्रांत महिलांना संधी
‘‘स्वातंत्र्यपूर्व काळात महिलांना शिक्षण घेता येत नव्हते. त्या काळात सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी शिक्षणाचे दरवाजे खुले केले. स्वातंत्र्यानंतरही महिलांना संधी न देण्याच्या मानसिकतेतून देश स्वतंत्र झाला नाही. पूर्वीच्या सरकारच्या काळात शाळेत स्वच्छतागृह नसल्याने मुलींना शिक्षण सोडावे लागत होते. सैनिकी शाळा, लष्करात महिलांना प्रवेश नव्हता, गरोदरपणाची सुट्टी मिळत नसल्याने नोकरी सोडावी लागत होती. पण आमच्या सरकारने जुनी मानसिकता व व्यवस्था बदलून टाकली. या सर्व क्षेत्रांत महिलांना संधी दिली. नारीशक्ती अधिनियमातून महिलांना सुरक्षेची गॅरंटी दिली. महिलांना सर्व क्षेत्रांत संधी दिल्याने देशाच्या विकासाचे दरवाजे उघडले आहेत,’’ असे मोदी म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.