भाजप म्हणजे वचनपूर्तीची गॅरंटी : मोहोळ
पुणे : ‘‘मेट्रोची चर्चा पुणेकर २० वर्षांपासून ऐकत होते. पण मेट्रोचे भूमिपूजन, उद्घाटन आणि मेट्रोतून पुणेकरांसोबत प्रवास करणारा एकमेव नेता पुणेकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रूपात पाहिला. जाहीरनाम्याची अंमलबजावणी करण्याचा पायंडा मोदी सरकारने पाडला. त्यामुळेच मतदारसंघ पातळीवरचा असो किंवा देशपातळीवरचा, भाजपाच्या ‘संकल्पपत्रा’ला विश्वासार्हता आहे’’, असा दावा महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी ‘सकाळ’शी बोलताना केला.
पुण्यासाठीचे ‘संकल्पपत्र’ मोहोळ यांनी जनतेसमोर मांडले. या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. मोहोळ म्हणाले, ‘‘भाजपचे ‘संकल्पपत्र’ म्हणजे वचननामाच असतो. पुणेकरांनी २०१४ मध्ये अनिल शिरोळे यांना निवडून दिले. त्यांनी पुण्यात मेट्रो आणण्याचे आश्वासन दिले होते. त्यांच्या काळात मेट्रोच्या कामाला प्रारंभ झाला. मेट्रो पूर्णत्वासही गेली. पुणेकरांनी २०१९ मध्ये गिरीश बापट यांच्यावर विश्वास दाखविला. दुर्दैवाने कोरोनाकाळ आणि आकस्मिक निधन यामुळे बापट यांना वेळ कमी मिळाला. पण त्या अल्पावधीतही बापट यांनी आश्वासन दिल्यानुसार पुणे विमानतळावरील नवे टर्मिनल आणि नदीसुधार योजनेचे काम मार्गी लावले. ही उदाहरणे लक्षात घेतली, तर भाजपचे ‘संकल्पपत्र’ म्हणजे अंमलबजावणीची गॅरंटीच असते, याची जनतेला खात्री आहे.’’
‘‘राष्ट्रीय पातळीवर भाजपने राम मंदिर, ३७० कलम हटविणे हे प्रलंबित विषय धडाक्यात मार्गी लावले. ‘नागरिकता संशोधन कायद्या’च्या (सीएए) अंमलबजावणीमुळे शेजारी देशांमधील हिंदू, शिख, जैन, बौद्ध, पारशी आणि ख्रिश्चन नागरिकांना भारतीय नागरिकत्व मिळू शकले. ‘तीन तलाक’च्या अमानुष प्रथेला पायबंद घातला गेला. ‘घरोघर शौचालया’चा मुद्दा लाल किल्ल्यावरून उपस्थित करणारे नरेंद्र मोदी हे पहिलेच पंतप्रधान होते. मोदी नुसते बोलून थांबले नाहीत, तर गेल्या १० वर्षांत १२ कोटी स्वच्छतागृहांची निर्मिती करून दाखविली’’, असे सांगत मोहोळ यांनी भाजपाच्या कृतिशीलतेची ग्वाही दिली. ‘‘पुण्यासाठीचे माझे ‘संकल्पपत्र’ही जनतेशी साधलेल्या संवादातून साकारले आहे. मेट्रोचा १५० किलोमीटरपर्यंत विस्तार, रिंगरोडची पूर्तता, पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाची उभारणी, पुण्याच्या पर्यावरणाचे जतन आणि संवर्धन असे अनेक मुद्दे आम्ही यात मांडले आहेत, ते पूर्णत्वास जातील, असा विश्वास पुणेकरांनाही आहे’’, असे मोहोळ म्हणाले.
संकल्प नव्हे वचन
- पुणेकरांसाठी माझे कार्यालय वर्षाचे ३६५ दिवस २४ तास उघडे असेल.
- नदीकाठ सुधारणा प्रकल्प पूर्ण करणार
- ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसच्या गाड्या पुण्यातून सुरू होण्यासाठी पाठपुरावा करणार
- शहरी पूरनियंत्रण आराखडा तयार करणार
- ‘आयआयटी’चा सॅटेलाईट कॅम्पस पुण्यात होण्यासाठी प्रयत्न करणार
- स्टार्टअप इकोसिस्टिमला प्रोत्साहन देणार
- पर्यावरण वाचविण्यासाठी शाश्वत विकासाचे धोरण अवलंबणार
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.