Pune Water Crisis : पुणेकरांचा घसा काेरडा टँकर लॉबीकडे पैशाचा पूर

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण प्रकल्पात यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे अडीच टीएमसी पाणीसाठा कमी आहे.
Pune Water Crisis
Pune Water Crisis Sakal
Updated on

Pune News : एकीकडे उन्हाचा चटका वाढत असल्याने नागरिक हैराण आहेत, तर दुसऱ्या बाजूला अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे भर उन्हाळ्यात नागरिकांचे हाल होत आहेत. महापालिकेचा टँकर मागविला तरी पुरेसे पाणी मिळत नाही.

त्यामुळे नाइलाजास्तव हजार-बाराशे रुपये खर्च करून खासगी टँकर मागवावा लागत आहे. त्यामुळे मध्यवर्ती भागांसह उपनगरांमधील नागरिक हैराण झाले आहेत. धक्कादायक म्हणजे गेल्या वर्षीच्या एप्रिल महिन्याच्या तुलनेत यंदा महापालिकेच्या टँकरच्या फेऱ्या आठ हजारांनी वाढल्याने पाणीटंचाईची तीव्रता स्पष्ट होत आहे.

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण प्रकल्पात यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे अडीच टीएमसी पाणीसाठा कमी आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा काळजीपूर्वक वापर करणे आवश्‍यक आहे.

पाटबंधारे विभाग, महापालिकेची संयुक्त बैठक झाली, पत्रव्यवहारांमध्येही पाणी बचतीसंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पाण्यावरून आरडाओरड होऊ नये, यासाठी पाणी कपातीबाबत कोणताही निर्णय घेतला नाही. मात्र, असमान पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

या भागात कमी दाबाने पाणी

बाणेर, बालेवाडी, धायरी, आंबेगाव, नऱ्हे, किरकटवाडी, कात्रज, बिबवेवाडी, महंमदवाडी, एनआयबीएम, उंड्री, पिसोळी, मांगडेवाडी, येरवडा, कोथरूड, कर्वेनगर, वारजे, बावधन, पाषाण, औंध, बोपोडी,

वडगाव शेरी, टिंगरेनगर, डेक्कन जिमखाना, कोंढवा गोखलेनगर आदी भागांत पाणीटंचाई भासत आहे. कमी वेळ, कमी दाबाने पाणी येण्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. महापालिकेकडे तक्रार केल्यानंतर एक-दोन दिवस पाणी व्यवस्थित येते. मात्र, पुन्हा पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

महापालिकेकडून होणारा पाणीपुरवठा अपुरा

समाविष्ट झालेल्या ३४ गावांमध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेने टँकर पुरविण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी फुरसुंगी, उरुळी देवाची, बावधन, सूस, आंबेगाव, मांगडेवाडी, गुजर निंबाळकरवाडी आदी भागात टँकरने पाणीपुरवठा केला जातो. मात्र, हा पाणीपुरवठा अपुरा आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना पुन्हा खासगी टँकर मागवून तहान भागवावी लागत आहे.

पाणीपुरवठ्याबाबत तक्रारी

  • शहरात मीटर बदलल्यानंतर कमी दाबाने पाणी येते

  • पाणीपुरवठ्याची वेळ कमी झाली

  • पाण्याच्या टाक्या बांधून तयार असल्या तरी त्याचा नागरिकांना उपयोग नाही

  • टँकर माफियांसाठीच योजनेचे काम अर्धवट ठेवले

  • महापालिकेचा टँकर मागविल्यानंतर लगेच मिळत नाही, त्यासाठी पाठपुरावा करावा लागतो.

महापालिकेकडून जागोजागी ठेवण्यात आलेल्या बॅरलमध्ये टँकरद्वारे पाणी टाकण्यात येते. पण कमी पाणी टाकले जात असल्याने पाणी पुरत नाही. पाणी घेण्यासाठी गर्दी होते, त्यातून वाद होत आहेत. त्यामुळे आम्हाला आता पदरमोड करून खासगी टँकर मागवावे लागत आहेत. लोकसंख्येचा विचार करून महापालिकेने टँकरची संख्या वाढवली पाहिजे.

- शीतल गदळे, गृहिणी, गुजर निंबाळकरवाडी.

पेबल्स- १, पाटीलनगर, बावधन बुद्रुक

टँकरमुळे वाढलेला दरमहा मेंटेनन्स : १ हजार रुपये

पाणी विकत घ्यावे लागत असल्याने सोसायटीचे बजेट कोलमडले आहे. आम्हाला सोसायटी व्यवस्थापन खर्च दुप्पटीने द्यावा लागत आहे. पाणी व्यवस्थापनात आपण कुठे कमी पडतोय, यावर कारभारी मंडळींनी उपदेश करण्यापेक्षा आत्मपरीक्षण करावे.

- रेणुका आरगे

मेघमल्हार रागा, एलएमडी चौक, बावधन

टँकरमुळे वाढलेला दरमहा मेंटेनन्स : १ हजार रुपये

सोसायटीचा पाणी प्रश्न ‘सकाळ’ने उचलून धरल्यावर नवी जलवाहिनी बसविण्यात आली. त्यामुळे काही प्रमाणात पाणी प्रश्न सुटला होता. परंतु आता टंचाईच्या नावाखाली परत अपुरा पुरवठा सुरू झाला आहे.

- पंकज बादराणी

प्राइड पॅनोरमा को-ऑफ हाउसिंग सोसायटी, सेनापती बापट रस्ता, शिवाजीनगर

टँकरमुळे वाढलेला दरमहा मेंटेनन्स : ५०० रुपये

आशानगरमध्ये टाकीचे उद्घाटन झाल्यावर पाणी येईल, असे सांिगतले होते. ती आशा फोल ठरली. मीटरप्रमाणे पैसे द्यायलाही आम्ही तयार आहोत. तरीही पाणी मिळत नाही. गाड्या, बाल्कनी धुवू नये, असे सर्वांना सांगितले आहे.

- रोहिता आजगावकर, शीतल कराणी

अल्डिया एस्पॅनोला, महाळुंगे

टँकरमुळे वाढलेला दरमहा मेंटेनन्स : ५०० रुपये

आमच्याकडे महापालिकेचे पाणी येत नसल्याने आम्हाला पूर्णपणे टॅंकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्यावर मासिक खर्च होतो.

- केतकी रोहित सुरतवाला

मेट्रो जॅझ, महाळुंगे

टँकरमुळे वाढलेला दरमहा मेंटेनन्स : ६०० रुपये

आमच्या सोसायटीला अजूनही जलवाहिनी नाही. त्यातच बोअरचे पाणी आटले आहे. महापालिकेकडून पाणी देऊ, असे सांगितले गेले. परंतु त्याला दीड-दोन वर्षे लागतील असे सांगण्यात येते. रोज पाणी विकत घेणे आमच्या बजेटच्या बाहेर व असुविधाकारक आहे.

- डॉ. प्रीती काळे

ग्रीन झोन अपार्टमेंट, बाणेर

टँकरमुळे वाढलेला वार्षिक मेंटेनन्स : ३ हजार रुपये

पुणे महापालिकेकडून कोणत्याही सोयीसुविधा नाहीत. पाणी प्रश्न गंभीर आहे. आम्ही घरात खूप काटकसर करून पाणी वापरतो. बंगळुरुसारखी परिस्थिती आम्हाला नको. महापालिकेकडून मिळणारे पाणी पुरेसे नाही. बाहेरून टँकर मागवावे लागतात.

- भाग्यश्री मालपाठक

व्हेनिजिया सोसायटी, बाणेर

टँकरमुळे वाढलेला दरमहा मेंटेनन्स : नाही

आमची सोसायटी मोठी असल्याने महापालिकेकडून वापरासाठीचे पाणी तीन दिवसांतून एकदा येते. सोसायटीत एसटीपी प्लांट आहे. पण पाण्याला खूप दुर्गंधी येते. दुसरे पाणी नाही. त्यामुळे फ्लश किंवा बागेसाठी हे पाणी वापरावे लागते. त्यामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

- जयू जमाखंडे

नंदन स्पेक्ट्रा, बाणेर

टँकरमुळे वाढलेला दरमहा मेंटेनन्स : नाही

आमच्या सोसायटीला महापालिकेकडून पाणीपुरवठा केला जातो. पण तो पुरेसा नाही. आम्हाला बाहेरून टँकर आणावे लागतात.

- संपदा जोशी

मोरया स्पर्श सोसायटी, किरकटवाडी

टँकरमुळे वाढलेला दरमहा मेंटेनन्स : १०० रुपये

आमच्या सोसायटीत दिवसाआड पाणी येते. महापालिकेकडून जे पाणी सोडण्यात येते, ते एकच तास असते. ते आम्हाला पुरत नाही. त्यामुळे आमचे पाण्यासाठी खूप हाल होत आहेत. आम्हाला खासगी टँकरचे पाणी विकत घ्यावे लागते.

- नलिनी थोपटे

सिद्धांत शिवसृष्टी, मानाजीनगर, नऱ्हे

टँकरमुळे वाढलेला दरमहा मेंटेनन्स : १,२०० रुपये

महापालिकेत समाविष्ट होऊन तीन वर्षे झाली, पण महापालिका आम्हाला साधे पिण्याचे पाणीही देऊ शकली नाही.पाण्याच्या टँकरमुळे आमचे महिन्याचे आर्थिक गणितही कोलमडले असून, नियोजन करणे अवघड जात आहे.

- मंगल भानुदास साठे, रहिवासी

जुन्या हद्दीत समान पाणीपुरवठा योजनेचे काम चालू आहे. या योजनेचे काम पूर्णत्वास जात असून त्यानंतर पाण्याचे प्रश्‍न कमी होतील. समाविष्ट गावांमध्ये सूस, म्हाळुंगे, पाषाण आणि सासवड रोड येथे नवीन टँकर पॉइंट चालू करत आहोत. त्यामुळे टँकरच्या प्रवासाचा खर्च कमी होईल आणि खेपा वाढणार असल्याने जास्त पाणी मिळेल. मांजरी शेवाळवाडीतील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रकल्पाचे काम लवकरच पूर्ण होत आहे. तेथील काम पूर्ण झाल्यानंतर त्या भागातील टँकर कमी होतील आणि हे टँकर ज्या भागात पाणीटंचाई तीव्र असलेल्या ठिकाणी फिरवले जातील.

- नंदकिशोर जगताप, प्रमुख, पाणीपुरवठा विभाग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.