मुंबई : भारत २०२७ पर्यंत ग्राहकोपयोगी वस्तू व इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील तिसरी सर्वांत मोठी ग्राहक बाजारपेठ बनण्याची अपेक्षा आहे. हे उद्दिष्ट गाठण्यात या क्षेत्रातील कर्मचारीवर्ग महत्त्वाची भूमिका बजावणार असून, त्यासाठी कर्मचारी गळती (अॅट्रिशन) समस्या दूर करण्यावर भर देणे गरजेचे आहे, असे ‘टीमलीज सर्व्हिसेस’ने ‘कंझ्युमर ड्यूरेबल्स अँड इलेक्ट्रॉनिक्स -ए स्टाफिंग परस्पेक्टिव्ह रिपोर्ट’मध्ये म्हटले आहे.
या व्यवसायक्षेत्रातील कर्मचारीवर्ग विशेषतः तात्पुरता कर्मचारीवर्ग ग्राहकसेवा आणि क्षमतावाढीत अत्यंत महत्त्वाचा आहे, असेही टीमलीजने आपल्या अहवालात म्हटले आहे. किचन अप्लायन्सेस, एलईडी लाइट व इलेक्ट्रिक फॅन, एसी, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशिन, टीव्ही, मोबाइल, कम्प्युटिंग डिव्हाईसेस व डिजिटल कॅमेरे यांसारख्या ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची बाजारपेठ मोठी असून, तिथे तात्पुरत्या कर्मचारीवर्गाची गरज मोठी आहे.
देशातील एसीची बाजारपेठ १५ टक्के दराने २०२८ पर्यंत ५.८ अब्ज डॉलरवर जाण्याचा अंदाज आहे, तर मोबाइल फोनची बाजारपेठ ६.७ टक्क्यांच्या दराने २०२८ पर्यंत ६१.२ अब्ज डॉलरवर जाण्याचा अंदाज आहे. त्यामुळे या क्षेत्रातील कर्मचारी हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे.
या उद्योगाच्या विकासासाठी इन-स्टोअर प्रमोटर्स, सर्व्हिस टेक्निशियन, सुपरवायझर, सेल्स ट्रेनर, चॅनेल सेल्स एक्झिक्युटिव्ह, कस्टमर सपोर्ट एक्झिक्युटिव्ह, वेअरहाउस इन-चार्ज, टेलि-सपोर्ट एक्झिक्युटिव्ह आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर या पदांवरील कर्मचारी महत्त्वाचे आहेत.
या क्षेत्रात सरासरी वय ३१ वर्ष आणि कार्यकाल २.८ वर्ष असलेल्या पुरूष कर्मचाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक ९४ टक्के आहे. यापैकी पन्नास टक्क्यांहून अधिक कर्मचाऱ्यांचे शिक्षण १२वी पेक्षा कमी आहे, त्यामुळे उत्पादकता वाढवण्यासाठी विशिष्ट कौशल्ये विकसित करण्याकरिता त्यांना योग्य प्रशिक्षणाची गरज आहे, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
तात्पुरत्या कर्मचारीवर्गाचे सर्वाधिक प्रमाण प्रामुख्याने दक्षिण भागामध्ये आहे. तमिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, उत्तरप्रदेश व तेलंगणा ही तात्पुरत्या रोजगारांमध्ये सर्वोच्च वाढ निदर्शनास आलेली अव्वल पाच राज्ये आहेत. शहरी स्तरावर बंगळूर, हैदराबाद, चेन्नई, कोलकाता आणि मुंबई येथे तात्पुरत्या रोजगारांमध्ये वाढ दिसून आली आहे.
या क्षेत्रात नोकरी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे, हे या क्षेत्रासमोरील मोठी आव्हान आहे. नोकरी सोडणाऱ्यांमध्ये सुमारे २२ टक्के कर्मचारी हे उत्तम कामगिरी करणारे असतात, अशा कर्मचाऱ्यांचे वाढते प्रमाण (रिग्रेटेबल अॅट्रिशन) अडचणीत भर घालते, तर नोकरी सोडणाऱ्यांमध्ये इन्सेंटिव्ह न मिळवलेले ३१ टक्के कर्मचारी (नॉन-रिग्रेटेबल अॅट्रिशन) असतात.
त्यामुळे १००० कर्मचारी असलेल्या कंपनीसाठी अॅट्रिशन खर्च अंदाजे ३.६४ कोटी रुपये आहे. मध्यम आकाराच्या कंपनीला महसूलातील १०० कोटी रुपयांहून अधिक खर्च करावा लागू शकतो. त्यामुळे या समस्येचे सक्रियपणे निराकरण करण्याची गरज आहे.
अॅट्रिशन हे या क्षेत्रातील मोठे आव्हान आहे. चांगले कर्मचारी नोकरी सोडून गेल्याने कंपनीची क्षमता व विकासावर मोठा परिणाम होऊ शकतो. अॅट्रिशनचे निराकरण केल्यामुळे कंपन्यांचा खर्च वाचतोच पण त्याचबरोबर शाश्वत विकास आणि स्पर्धात्मकतेत प्रगती करणेदेखील शक्य होते.
त्यामुळे कंपन्यांनी तात्पुरत्या कर्मचारीवर्गाला कामावर टिकवून ठेवण्यासाठी धोरणांमध्ये बदल करणे गरजेचे आहे. या कर्मचारीवर्गाच्या गरजा जाणून घेणे या क्षेत्रातील शाश्वत विकासाला गती देण्यासाठी महत्त्वाचे आहे.
- बालसुब्रह्मण्यम ए., वरिष्ठ उपाध्यक्ष, टीमलीज सर्व्हिसेस
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.