आता भर नफावसुलीवर!

दीर्घकालीन गुंतवणूक व नफावसुली या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. शेअर बाजारात गुंतवणूक करताना दृष्टीकोन हा कायमच दीर्घकालीन ठेवला पाहिजे, त्यामुळे अल्पावधीत मन विचलित करणाऱ्या अनेक घडामोडींत आपला विश्वास ढळत नाही, असे शिकवले जाते.
आता भर नफावसुलीवर!
आता भर नफावसुलीवर!sakal

दीर्घकालीन गुंतवणूक व नफावसुली या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. शेअर बाजारात गुंतवणूक करताना दृष्टीकोन हा कायमच दीर्घकालीन ठेवला पाहिजे, त्यामुळे अल्पावधीत मन विचलित करणाऱ्या अनेक घडामोडींत आपला विश्वास ढळत नाही, असे शिकवले जाते. २०२० मधील कोविड महासाथीमुळे बाजारात झालेल्या पडझडीत अनेकांना तोटा सहन करावा लागला, तर बरेच नवगुंतवणूकदार या मंदीत बाजारात आले. त्यांना आज चांगला परतावा मिळाल्याचे दिसून येत आहे. २०२० च्या बाजारातील पडझडीत अनेकांना असे वाटले, की आधीच नफा काढून घेतला असता तर बरे झाले असते. मात्र, या बाजारात जर-तरला महत्त्व नसते. शेवटी, घरात येतो तोच खरा नफा! कागदोपत्री नफा जसा वाढताना दिसतो, तसाच तो बाजारातील नफेखोरीत निघूनही जातो.

शेअर बाजारात गेल्या चार वर्षांत प्रचंड वाढ झाली आहे. पण आपल्याला धक्का बसेल अशी नफेखोरी अजून तरी झालेली नाही. ज्या-ज्या वेळी नफेखोरी झाली, त्यातून बाहेर पडून बाजाराने प्रत्येक वेळेस नवा उच्चांक गाठून गुंतवणूकदारांना दिलासा दिला आहे. २०२० नंतर आलेल्या नवगुंतवणूकदारांनी फक्त एकतर्फी तेजीच अनुभवली आहे. खरी मंदी व बाजारातील पडझडीची एक झलक लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी थोडक्यात अनुभवली असेल. पण नंतर बाजार पुन्हा नव्या उच्चांकाकडे झेपावला असला तरी तो दगा देऊ शकतो, याची शक्यता गृहीत धरायला हवी.

आता पुढे काय करावे?

भारतात आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच नेतृत्वाखाली ‘एनडीए’चे सरकार स्थापन झाले आहे. बाजार एक मोठ्या अनिश्चिततेच्या फेऱ्यातून बाहेर पडला असला, तरी आम्हाला असे वाटते, की येथून पुढचे ६ ते ९ महिने हे सावधगिरीने पाऊल टाकण्याचे असतील आणि गुंतवणूकदारांनी नफावसुलीवर भर द्यायला हवा. याचा अर्थ असा नाही, की शेअर बाजारातील सर्व गुंतवणूक मोकळी करून बँकेत पैसे ठेवावेत. मात्र, येथून पुढे बाजार जसजसा वर जाईल, तसतसा किमान नफ्याचा हिस्सा बाहेर काढत राहावे. थोडक्यात, आपल्या १०० रुपयांच्या गुंतवणुकीच्या मूल्याचे ४० रुपये काढून घ्यावेत व बाजारात १० टक्क्यांपेक्षा जास्त पडझड झाल्यास पुन्हा हेच भांडवल म्हणून वापरावे.

थेट अथवा स्वतः गुंतवणूक करणारे

ज्या कंपन्यांच्या शेअरच्या भावामध्ये प्रचंड वाढ झाली असेल व त्यांचे निकाल हे या भावाला पूरक वाटत नसतील, तिथे नफावसुली करावी आणि आपला मोर्चा नव्या, परंतु न वाढलेल्या फंडामेंटली चांगल्या शेअरकडे वळवावा. मोठे गुंतवणूकदार, जे गुंतवणुकीसाठी शेअर तारण ठेवून कर्ज घेतात व गुंतवणूक करतात, त्यांनी आपले हे देणे ५० टक्क्यांनी कमी करावे. वायदे बाजारातील फ्युचर्समधून ट्रेडिंग करणाऱ्यांनीदेखील बाजारातील आपले ‘एक्स्पोजर’ कमी करून बाजारातील पडझडीत आपली ‘पोझिशन’ झेपेल एवढ्यावर आणून ठेवावी. ऑप्शन्स ट्रेडिंग करणाऱ्यांना तो एकप्रकारे जुगार आहे (हेजिंग करणारे सोडून), याची कल्पना असते. त्यांच्यासाठी एवढेच सांगू इच्छितो, की झेपेल तेवढेच खेळा; अन्यथा थांबा!

वर नमूद केलेल्या गोष्टी म्हणजेच शेअर बाजारात मोठी पडझड न झाल्यास आपले थोडेच नुकसान होईल. मात्र, बाजारात मोठे ‘करेक्शन’ आल्यास होणारा फायदा हा नक्कीच मोठा असेल. शेवटी या बाजारात जोखीम असतेच. त्यामुळे यासंदर्भात आपल्या तज्ज्ञ सल्लागारांशी चर्चा करूनच निर्णय घ्यावेत.

म्युच्युअल फंड ‘सही’ असला तरी...

जे गुंतवणूकदार बाजारातील अत्यंत प्रभावी ठरलेल्या म्युच्युअल फंडामध्ये ‘एसआयपी’च्या माध्यमातून गुंतवणूक करीत आहेत, त्यांनी ‘एसडब्ल्यूपी’द्वारे नफावसुली करावी; जेणेकरून बाजारातील प्रत्येक पातळीवर नफा बाहेर येत राहील. विशेषतः जिथे आपल्या गुंतवणुकीचा ‘कंपाउंडेड ॲन्युअल ग्रोथ रेट’ (सीएजीआर) हा १८ टक्क्यांपेक्षा जास्त आहे, तिथे हे सूत्र अवलंबावे व हे धोरण वर नमूद केल्याप्रमाणे पुढील ६ ते ९ महिने राबवावे, असे आम्हाला वाटते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com