Ratan Tata Nano Plant: पश्चिम बंगालमधील सिंगूरमध्ये टाटा मोटर्सच्या नॅनो प्लांटला ममता बॅनर्जींच्या आधीच्या डाव्या सरकारने परवानगी दिली होती. या परवानगीनुसार बंगालमधील या जमिनीवर रतन टाटा यांच्या ड्रीम प्रोजेक्ट नॅनोच्या उत्पादनासाठी कारखाना उभारला जाणार होता. तेव्हा ममता बॅनर्जी विरोधी पक्षात होत्या आणि डाव्या सरकारच्या धोरणांच्या विरोधात होत्या आणि या प्रकल्पाला विरोध करत होत्या. यानंतर ममला बॅनर्जी यांचे सरकार स्थापन झाल्यावर सत्तेवर येताच त्यांनी टाटा समूहाला मोठा धक्का दिला.
ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होताच सिंगूरची सुमारे 1000 एकर जमीन त्या 13 हजार शेतकऱ्यांना परत करण्यासाठी कायदा करण्याचा निर्णय घेतला. ही तीच जमीन होती जी टाटा मोटर्सने नॅनो प्लांट उभारण्यासाठी अधिग्रहित केली होती. या संपूर्ण घटनेनंतर टाटा मोटर्सला आपला नॅनो प्लांट पश्चिम बंगालमधून गुजरातला कसा हलवावा लागला तो कसा? याचा एक मजेशीर किस्सा आहे.
या घटनेनंतर आपल्या नेहमीच्या सौजन्यशीलतेला बाजूला ठेवत रतन टाटांनी ममताबाईंच्या आडमुठेपणावर सडकून टीका केली आणि त्यांच्यामुळं राज्याचं कसं आणि किती नुकसान होतंय, हे सांगत सिंगूरमधून लवकरात लवकर निघून जाण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला होता.
आता या प्रकल्पाचं पुढं काय करायचं? या प्रश्नाचं उत्तर रतन टाटांनापण माहीत नव्हतं. तेही विवंचनेत होते. समस्त 'टाटा मोटर्स' परिवार चिंतेत होता. या अस्वस्थतेत असताना रतन टाटांचा मोबाइल फोन वाजला. एसएमएस होता. त्यामुळं मोबाइल फोन वाजल्यावर त्यांनी त्याकडे पाहिलं, एका शब्दाचा मेसेज होता. 'सुस्वागतम्.' हा मेसेज पाठवणाऱ्याचा नंबर काही त्यांच्या फोनमध्ये नव्हता. म्हणून एका क्षणात काही त्यांच्या लक्षात आलं नाही, कोणाचा मेसेज आहे ते.
त्यामुळे त्यांनी नीट पाहिलं, मेसेज कोणाचा आहे ते. तो पाठवणाऱ्याच्या नावापर्यंत ते आले आणि थबकले. 'सुस्वागतम' नरेंद्र मोदी. इतकंच काय ते त्या मोबाइल फोनच्या मेसेजमध्ये होतं. त्यांना त्याचा अर्थ अर्थातच लक्षात आला. गुजरातमध्ये या. तुमचं स्वागत आहे. 'रतन टाटा कामाला लागले.
गुजरातची राजधानी गांधीनगरपासून 22 किलोमीटरवर असलेल्या साणंद इथं हा कारखाना स्थापन करता येईल, हे नक्की झालं. रतन टाटांनी घोषणा केली होती, 'सिंगूर कारखाना बंद करणार.' चारच दिवसांनी त्यांनी नवी घोषणा केली. "सिंगूरमधला कारखाना गुजरातेतल्या साणंद इथं हलवण्यात येईल." याच्या बरोबर रतन टाटांनी आणखी एक गोष्ट जाहीर केली. "मार्च 2009 पासून ही गाडी बाजारात उपलब्ध असेल."