प्रवाळ परिसंस्था धोक्याच्या छायेत

कोरल रीफ म्हणजे प्रवाळ हे मांसाहारी अपृष्ठवंशी सागरी सजीव आहेत. खडकाळ क्षेत्रावर किंवा समुद्राच्या तळाशी चिकटून तिथे आपल्या वसाहती बनवितात. त्यांतून येणारे शैवाल आणि झूप्लँक्टन्स (एकपेशीय सजीव) हे त्यांचे खाद्य.
प्रवाळ परिसंस्था धोक्याच्या छायेत
प्रवाळ परिसंस्था धोक्याच्या छायेतsakal
Updated on

हवामान अवधान

डॉ. गुरुदास नूलकर

कोरल रीफ म्हणजे प्रवाळ हे मांसाहारी अपृष्ठवंशी सागरी सजीव आहेत. खडकाळ क्षेत्रावर किंवा समुद्राच्या तळाशी चिकटून तिथे आपल्या वसाहती बनवितात. त्यांतून येणारे शैवाल आणि झूप्लँक्टन्स (एकपेशीय सजीव) हे त्यांचे खाद्य. प्रवाळ ही अतिशय वैविध्यपूर्ण आणि उत्पादक परिसंस्था आहे. ही नेत्रदीपक परिसंस्था पृथ्वीवरील समुद्रतळाच्या फक्त काही अंश भागावर सापडते; पण त्यांच्यामुळे सागरातील अनेक सजीवांना अधिवास, अडोसे, अन्नस्रोत आणि प्रजननक्षेत्र मिळते. त्यांच्या गुंतागुंतीच्या परस्परसंबंधातून द्रव्य आणि ऊर्जेची देवाणघेवाण चालू असते आणि त्यातूनच त्यांना पर्यावरणीय उत्पादकता प्राप्त होते.

प्रवाळ फक्त दिसायलाच सुंदर असतात असे नाही, तर संपूर्ण सजीवसृष्टीला जीवनावश्यक सेवा पुरविण्यात ते कार्यरत असतात. या परिसंस्थेतून मानवी अर्थव्यअस्थेला अंदाजे २.७ ट्रिलियन डॉलरच्या वस्तू आणि सेवां प्राप्त होतात. जगातील पर्यटनास योग्य असलेले सर्वांत मोठे प्रवाळ क्षेत्र म्हणजे ऑस्ट्रेलियातील ग्रेट बॅरियर रीफ. इथल्या पर्यटनातून ऑस्ट्रेलियाला वर्षाला पाच अब्ज डॉलर उत्पन्न आहे. प्रवाळक्षेत्रातून आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या अनेक मास्यांच्या प्रजातींना अधिवास आणि सुरक्षित प्रजननक्षेत्र मिळते. यामुळे प्रवाळ व्यावसायिक मासेमारीला पुष्टी देतात. प्रवाळ वसाहतीत सागरी प्रजातींना चक्रीवादळ आणि तीव्र लाटांपासून संरक्षण मिळते. जिथे प्रवाळ आहेत तिथे चक्रीवादळाने किनारपट्टीच्या मालमत्तेचे कमी नुकसान झाल्याची नोंद आहे. त्यांच्यात औषधी गुण असतात आणि जैविक घटक मिळतात ज्यापासून फार्मास्युटिकल उद्योगाला कच्चा माल मिळतो. पृथ्वीवरील सर्वाधिक कार्यक्षमपणे कार्बन शोषण करणाऱ्या नैसर्गिक परिसंस्थेत यांची गणना होते.  

भारतात अनेक ठिकाणी प्रवाळ आहेत. महाराष्ट्रात मालवण आणि विजयदुर्ग, गोवा, लक्षद्वीप, खंबात आणि अंदमान निकोबार बेटांभोवती प्रवाळ आहेत. तथापि, ही नाजूक परिसंस्था आज मानवी क्रियाकलापांमुळे धोक्यात आली आहे. प्रदूषण, तापमान वाढ, महासागरातील आम्लीकरण, आणि अनियंत्रित मासेमारी अशा कारणांचा यात समावेश होतो. परिणामी, अलिकडच्या दशकांमध्ये प्रवाळांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. जागतिक स्तरावर हवामान बदलाचा प्रवाळ परिसंस्थेवर गंभीर आणि व्यापक आघात होत आहेत. त्यातील काही मुख्य परिणाम पाहू.

आज वातावरणातील कार्बन डायऑक्साईडच्या वाढलेल्या प्रमाणामुळे आणि नद्यांतून येणाऱ्या प्रदूषणामुळे समुद्राची रासायनिक रचना बदलली आहे. यामुळे पाणी अधिक आम्लयुक्त झाले आहे. प्रवाळांना कॅल्शियम कार्बोनेटपासून वसाहती बनविण्यासाठी हे बाधाकारक असते. पाण्याचे वाढते तापमान हे कोरल ब्लीचिंगचे (रंग जाणे) एक महत्त्वाचे कारण आहे. याच्यामुळे त्यांची पर्यावरणीय उत्पादकता कमी होते. प्रदीर्घ ब्लीचिंग झाले तर कोरल तग धरू शकत नाहीत. तापमानवाढीमुळे ध्रुवप्रदेशात बर्फ वितळण्याचा वेग वाढला आहे, आणि त्यामुळे समुद्राच्या पातळीत वाढ होत आहे. काही भागात प्रवाळवाढीच्या दरापेक्षा समुद्राची पातळी अधिक वेगाने वाढू शकते, ज्यामुळे वसाहती बुडून जाण्याचा धोका आहे. 

आज नैसर्गिक आपत्तीची वारंवारिता आणि तीव्रता वाढलेली स्पष्ट दिसत आहे. चक्रीवादळांमुळे प्रवाळाच्या संरचनेला धोका निर्माण होतो. वादळ येऊन गेल्यावर काही प्रवाळ क्षेत्रात घट झाल्याची नोंद आहे. हवामान बदलामुळे सागरी प्रवाह (करंट) बदलत आहेत. त्यांचा मार्ग बदलला की पोषणद्रव्यांचे वितरण बदलते, आणि यामुळे प्रवाळांच्या प्रजनन करण्याच्या क्षमतेत घट

होऊ शकते. आर्थिक वाढीच्या मार्गात प्रदूषण अटळ असते. वाडीवस्ती आणि शहरांतून वाहून येणारे प्रदूषण अखेर समुद्रात पोचते. दूषित पाण्यामुळे ‘कोरल ब्लीचिंग’ वाढत जात आहे. तापमानवाढीचा अजून एक मोठा धोका आहे, तो म्हणजे पाण्यात ऑक्सिजन विरघळण्याचे प्रमाण घटत चालले आहे. पाण्याचे तापमान वाढले की त्यात मिसळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते, हे प्रवाळांच्या वसाहतींसाठी धोकादायक असते.  

हवामानबदलाचे आणि मानवी हस्तक्षेपाचे घटक अनेकदा परस्परसंबंधी असतात. त्यामुळे प्रवाळांवर मोठे आणि विपरीत परिणाम होत जातात.  आज जगभरातील प्रवाळक्षेत्र, त्यांतील जैवविविधता आणि रीफच्या लवचिकतेत घट झालेली दिसते. काही वर्षांतच प्रवाळ परिसंस्था कमी होण्याचे प्रमाण धोकादायक पातळीवर येण्याची भीती शास्त्रज्ञांना वाटत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com