केरळचे ‘फिडेल कॅस्ट्रो’

नेत्याचा सभास्थळी प्रवेश होताच लोक घोषणांनी आसमंत दणाणून सोडत.
keral assembly election 2016 Oommen Chandy udf politics
keral assembly election 2016 Oommen Chandy udf politicsSakal
Updated on

- कौस्तुभ पटाईत

केरळ विधानसभेची २०१६ मध्ये निवडणूक होती. मुख्यमंत्री ओमान चंडी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसप्रणीत ‘यूडीएफ’ सरकारविरोधात डाव्या आघाडीच्या सभांनी गर्दीचा उच्चांक गाठला होता. डाव्या आघाडीचे नेतृत्व ९३ वर्षीय नेता करत होता. त्याच्या सभा तुफान गर्दी खेचत होत्या. या नेत्याचा सभास्थळी प्रवेश होताच लोक घोषणांनी आसमंत दणाणून सोडत.

त्याच्या प्रत्येक वाक्यावर हशा, टाळ्यांचा कडकडाट व्हायचा. त्या नेत्याचं नाव होतं वेलिक्ककतु संकरन अच्युतानंदन अर्थात कॉम्रेड व्हीएस अच्युतानंदन. केरळमध्ये ‘व्हीएस’ या नावाने प्रसिद्ध अच्युतानंदन यांनी २० ऑक्टोबर रोजी शंभरी पार केली.

केरळचे माजी मुख्यमंत्री, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते अशी त्यांची औपचारिक ओळख. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात जनमानसावर दीर्घकाळ प्रभाव पाडणाऱ्या भारतीय राजकारण्यांत त्यांचा समावेश होतो. स्वातंत्र्य व मजूर-कामगार चळवळ, विरोधी पक्षनेता आणि मुख्यमंत्री अशी त्यांची कारकीर्द होती.

‘व्हीएस’ यांचा जन्म पुन्नप्रा (जि.अलपुझा) गावी २० ऑक्टोबर १९२३ रोजी एळवा या मागास समूहात झाला. त्यांनी लहानपणीच आई-वडील गमावले. दारिद्र्यामुळे बाराव्या वर्षी शाळा सोडून थोरल्या भावासोबत टेलरिंगच्या दुकानात कामाला लागले. त्यानंतर स्वातंत्र्याच्या ध्येयाने प्रेरित होऊन काँग्रेसच्या नेतृत्वाखालील स्वातंत्र्य चळवळीत उतरले.

अलपुझा येथील कोईर फॅक्टरीत काम करताना कम्युनिस्ट नेते पी. कृष्ण पिल्लई यांच्याशी ओळख झाली. तेव्हाच्या संयुक्त भारतीय कम्युनिस्ट पक्षात सामील झाले. त्यावेळी कम्युनिस्ट पक्ष केरळमध्ये मूळ धरत होता. कम्युनिस्ट पक्षात आल्यावर अच्युतानंदन यांनी ताडी गोळा करणारे, मच्छीमार व नारळ तोडणाऱ्या मजुरांचे संघटन बांधले.

केरळमधील ‘पुन्नप्रा-वायलर संघर्ष’ १९४५-४६ दरम्यान झालेला असाच महत्त्वाचा जमीनदारीविरोधातला संघर्ष होता. याचे नेतृत्व ‘व्हीएसं’नी केले. त्यावेळी त्यांच्यावर जीवघेणे हल्लेही झाले. मार्क्सवादी नेते सीताराम येचुरी यांनी ‘व्हीएस’ केरळचे फिडेल कॅस्ट्रो आहेत, असे म्हटले होते. त्यांच्या संघर्षाकडे पाहिले तर ही उपाधी सार्थ ठरते.

केरळमध्ये १९५७मध्ये ईएमएस नंबुद्रीपाद यांच्या नेतृत्वाखाली कम्युनिस्ट पक्ष सत्तेत आला. हे भारतातील पहिले बिगरकाँग्रेसी; तर लोकशाही मार्गाने सत्तेत आलेले जगातील पहिलेच कम्युनिस्ट सरकार होते. त्याच वर्षी ‘व्हीएस’ यांची पक्षाच्या सचिव मंडळात निवड झाली.

१९६३-६४ मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षात धोरणत्मक मुद्दांवरून तीव्र मतभेद झाले. त्या वेळच्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय समितीतील ३२ सदस्यांनी पक्षत्याग केला. यात ‘व्हीएस’ही होते. या नेत्यांनी ‘माकप’ची स्थापना केली. माकपच्या स्थापनेत सहभागी पहिल्या फळीतील नेत्यांपैकी फक्त दोनच हयात आहेत.

एक तमिळनाडूतील स्वातंत्र्यसैनिक एन. संकरैय्या आणि दुसरे अच्युतानंदन. केरळ मानवी विकासाच्या दृष्टीने देशातील सर्वांत प्रगत राज्य आहे. याबाबत ते पाश्चिमात्य देशांशी स्पर्धा करते. जमीन सुधारणेसारखी धोरणे राबवल्यामुळे राज्यातील लोकांचा राहणीमानाचा स्तर उंचावला आहे. यात सामाजिक चळवळींसह कम्युनिस्ट चळवळीची भूमिका महत्त्वाची राहिली आहे.

त्या चळवळीचे सुरुवातीपासून आतापर्यंत ‘व्हीएस’ जोडले गेले आहेत. त्यांच्याविषयी केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन म्हणतात, ‘‘केरळला इथपर्यंत पोहोचवण्यात अच्युतानंदन यांनी महत्त्वाची भूमिका निभावली आहे. ते नेहमीच कष्टकऱ्यांच्या बाजूने आणि शोषणाविरोधात लढले.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.