हौस ऑफ बांबू : अभिजाताचे श्रेय कुणाला..?

नअस्कार! ‘‘ज्याला आपण महाराष्ट्र म्हणतो, त्या देशात ज्याला आपण मराठी म्हणतो ती भाषा बोलतात. आता मराठी बोलण्याचे मुख्य कारण, इथल्या लोकांना एवढी एकच भाषा बोलता येते हे!’
Marathi Language
Marathi Languagesakal
Updated on

नअस्कार! ‘‘ज्याला आपण महाराष्ट्र म्हणतो, त्या देशात ज्याला आपण मराठी म्हणतो ती भाषा बोलतात. आता मराठी बोलण्याचे मुख्य कारण, इथल्या लोकांना एवढी एकच भाषा बोलता येते हे!’ ख्यातनाम इतिहासकार आणि भाषातज्ज्ञ श्री. रा. पु. ल. देशपांडे यांनी मौलिक संशोधनानंतर काढलेला हा निष्कर्ष. (संदर्भ : मराठी साहित्याचा गाळीव इतिहास) तथापि, मराठी लोकांना फक्त मराठी हीच भाषा बोलता येते, ही बाब समजून घेणे काहीसे कठीण जावे. कां की, मराठी माणूस बव्हंशी हिंदी अथवा इंग्रजी भाषेतच बोलतो किंवा ऐकतो…पाहतोदेखील!

मराठी माणसाने मराठी भाषेचे इतके वाटोळे करुनही ती भाषा अभिजात ठरली, याचा अर्थ त्या भाषेतच जबरदस्त जीजिवेच्छा आहे, या निष्कर्षाप्रत सहज येता येते. महाराष्ट्री प्राकृत या भाषेसोबतच प्राकृत आणि पाली या भाषांनाही अभिजात दर्जा मिळाला. मला दोन्ही येतात. पण हल्ली त्या बोलायलाच कोणीही नाही. पाली भाषा तशी सोपी आहे, अशी काहींची समजूत असते.

‘काय कसं काय?’ असे विचारायचे असेल तर नुसते ‘चुक चुक’ केले तरी चालते, ‘अभिजात दर्जा मिळाल्याबद्दल अभिनंदन’ असे म्हणायचे असेल तर तीनदा ‘चुक चुक चुक’ असे म्हणावे लागते, अशी भ्रामक समजूत असते. हे मात्र अगदीच चूक चूक आहे!

मराठी भाषेला या दर्जाप्रत आणण्याच्या कामात अनेकांचे साह्य झाले आहे. त्या सर्वांचे आभार मानायलाच हवेत. गेली सुमारे बावीसशे वर्ष हे साह्य सुरु होते, हे लक्षात घेतले तर आभार तरी कोणाकोणाचे मानायचे असा प्रश्न पडतो.

सर्वप्रथम आम्ही विवेकसिंधू हा ग्रंथ (वाचायचा राहून गेला आहे. यथावकाश वाचीन!) लिहिणाऱ्या मुकुंदराजाचे आभार मानू. मग लीळाचरित्र वगैरे.

ज्ञानोबामाऊलीचे तर मानावेच लागतील. त्यानंतर थेट मराठी भाषेच्या अभिजाततेचे पुरावे गोळा करणाऱ्या समितीचे अध्यक्ष प्रा. रंगनाथ पठारे येतात. आम्ही समिती आणि प्रापठारे यांचेही आभार मानू. पण शेवटी महाराष्ट्र साहित्य परिषदेला मैदानात उतरावंच लागलं. ‘मराठीला अभिजात दर्जा द्या ना’ अशी मागणी करणारी लाखो पोस्टकार्ड एकट्या शाहुपुरीतून पंतप्रधान मोदींना गेली, तेव्हा हे प्रकरण वाटतं त्यापेक्षा गंभीर आहे, हे पंतप्रधान कार्यालयाच्या लक्षात आलं. हा मराठीचा अभिजात इंगा!!

दरम्यान, महाराष्ट्र सरकारनंही ज्ञानेश्वर मुळे नावाचे अग्रगण्य असे अधिकारी निवडून पाठपुरावा समिती नेमली. ही बोलून चालून पाठपुरावा समिती असल्याने केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय हैराण झाले. बघावं तिथं मराठी माणसं उभी!! कधी देताय दर्जा? अशी सतत विचारणा!!

तथापि, सर्वात बुलंद आवाज होता, ते आमचे परममित्र श्रीपाद भालचंद्र जोशी यांचा. या गृहस्थांनी मराठीची बाजू अशी काही लढवली की त्याला तोड नाही. श्रीपाद भालचंद्रांनी मनावर घेतलं तर ते झारखंडी, हिमाचली, गुजराथी अशा कुठल्याही भाषेला अभिजात दर्जा मिळवून देऊ शकतील, असा लौकिक पसरला आहे. या सर्वांचेच आभार मानाल तेवढे कमी आहेत.

सरतेशेवटी आम्ही महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचे जनक श्री. रा. राजसाहेब ठाकरे यांचेही आभार मानतो. साक्षात मोदीजींसमोर बिनशर्त पाठिंबा देऊन त्यांनी मराठीच्या अभिजात दर्जाची शर्त ठेवली. हे म्हंजे ‘पैसे नकोत सर, जरा एकटेपणा वाटला’ असे सांगून वर ‘शंभर रुपये उसने देता का,’ असे विचारण्यापैकी होते, हे खरं! पण काही का असेना, काम फत्ते झाले.

आणि आता तुम्ही मराठी वाचक! तुम्हालाही बिग थँक्यू और बहोत बहोत धन्यवाद. आप अपना खयाल रखियेगा!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.