Rahul Gadpale writes about balasaheb thackeray mumbai g20 politics
Rahul Gadpale writes about balasaheb thackeray mumbai g20 politicsesakal

बाळासाहेब कुणाचे?

अ वघ्या देशाला आपल्या कवेत सामावून घेणारे मुंबई शहर नेहमीच चर्चांच्या केंद्रस्थानी असते.
Published on
Summary

अ वघ्या देशाला आपल्या कवेत सामावून घेणारे मुंबई शहर नेहमीच चर्चांच्या केंद्रस्थानी असते.

अ वघ्या देशाला आपल्या कवेत सामावून घेणारे मुंबई शहर नेहमीच चर्चांच्या केंद्रस्थानी असते. कधी कुणी मुंबईला शांघाय बनवू पाहते, तर कधी कुणाला या स्वप्ननगरीत सिंगापूरचे रूप दिसते; पण खरे पाहिले तर हे शहर सर्वसामान्यांचे आहे. या शहरात येणाऱ्या प्रत्येकाला काम मिळते.

त्याच्या पोटापाण्याची सोय होते. अडचण असते ती त्याच्या राहण्याची आणि त्या अनुषंगाने लागणाऱ्या पायाभूत सुविधांची. या पायाभूत सुविधांमध्ये रेल्वे नेहमीच केंद्रस्थानी असते. रेल्वे व्यतिरिक्त मुंबईवरचा ताण हा रस्ते वाहतुकीवर पडतो. रोज या शहरात लाखोंच्या संख्येने लोक येतात.

साहजिकच इथल्या सोयी-सुविधा आता त्यांना अपुऱ्या पडायला लागल्या आहेत. शिवाय, पायाभूत सुविधांच्या उभारणीकरीता मोठ्या प्रमाणावर प्रकल्पांचे नियोजन केले जात असल्यामुळे हे शहर आता कोंडीने ग्रासले आहे.

जी-२० परिषदेच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठ्या प्रमाणात रंगरंगोटी करण्यात आली आहे. लख्ख प्रकाशामुळे मुंबई उजळून निघाली आहे. निदान बाहेरून तरी मुंबई चकाकते आहे. मुंबईची कोंडी फोडण्यासाठी संपूर्ण मुंबई आणि महानगर प्रदेशातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचा सरकारने घाट घातला आहे.

या काँक्रिटीकरणावरून शिवसेनेच्या दोन गटांमध्ये बरीच धुसफुस सुरू आहे. त्याचा फटका या प्रकल्पांना बसू शकतो. अनेक वर्षे शिवसेनेकडे महापालिकेची सत्ता आहे; मात्र इतक्या वर्षांमध्ये तो पक्ष मुंबईला खड्ड्यांच्या कोंडीतून सोडवू शकला नाही.

एरवी वायुवेगाने धावणाऱ्या या शहराचा वेग मंदावतो तो केवळ इथल्या खड्ड्यांच्या समस्येमुळे; पण त्याकडे कुणालाही लक्ष द्यावेसे वाटले नाही. आगामी महापालिका निवडणुकांचा अंदाज घेत शिंदे गटाने उद्धव ठाकरेंच्या नेमक्या याच अडचणीच्या मुद्द्याला हात घातला.

आता त्यावरूनच आदित्य ठाकरे गेल्या तीन-चार दिवसांपासून नियमितपणे या विषयावर तावातावाने बोलताना दिसतात. त्यातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईतील विकासकामांचे भूमिपूजन होणार आहे.

त्यात दोन मेट्रो मार्गांचे लोकार्पण आणि इतरही बऱ्याच महत्त्वाच्या प्रकल्पांचा समावेश आहे. ठाकरेंना बोचणारी बाब म्हणजे बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या २० नव्या ‘आपला दवाखाना’ प्रकल्पांचेही पंतप्रधान लोकार्पण करणार आहेत; तर दुसरीकडे विधानभवन येथे बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र लावण्याची तयारीदेखील शिंदे गटाने चालवली आहे.

त्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी उद्धव ठाकरेंना निमंत्रण मिळेल की नाही याबाबत संभ्रम आहे. त्यामुळे मुंबईच्या प्रकल्पांसोबत बाळासाहेबांवरील हक्क सांगण्यातही शिंदे गट बाजी मारताना दिसत आहे. त्यामुळे ठाकरेंसाठी हे अवघड जागेचे दुखणे होऊन बसले आहे.

एकीकडे भाजपसोबत गेलेल्या शिंदे गटामुळे मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले आणि दुसरीकडे आता ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव लोकमानसात रुजवण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न सुरू आहे. तिकडे भाजपने मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी जोरदार कंबर कसली आहे. ठाकरे गटामध्ये आता केवळ हाताच्या बोटावर मोजण्याइतके नेते शिल्लक राहिले आहेत.

जे आहेत त्यापैकी अनेकांवर ईडीची टांगती तलवार आहे. महापालिका निवडणुकीची तयारी सुरू करण्याच्या टप्प्यावरच हे घडते आहे. अशा वेळी बाळासाहेब ही ठाकरे गटाची एकमेव आशा आहे. त्यामुळे बाळासाहेब म्हणजे शिवसेना असे समीकरण मानणाऱ्या मतदारांना आपल्याजवळ घेण्याशिवाय ठाकरे गटाला पर्याय नाही.

शिंदे गट मात्र सातत्याने त्यांच्या या आशेवरही पाणी फिरवण्याच्या बेतात दिसतो. शिंदे गटाच्या वतीने दररोज बाळासाहेबांच्या नावाने नवनवीन प्रकल्पांच्या घोषणा केल्या जातात. एकंदरीतच सगळीकडे प्रकल्पांची जाहिरातबाजी दिसत असली, तरी प्रत्यक्षात दोन पक्षांमध्ये चढाओढ आहे ती बाळासाहेबांचा वारसाहक्क मिळवण्याची. त्यात सरशी कुणाचीही झाली तरी चालेल, पण मुंबईकरांच्या पारड्यात दोन-चार बरे प्रकल्प पडले तर मुंबईकरांना हायसे वाटेल...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.