दृष्टीकोन : कर्तृत्त्ववान पिढीसाठी ''प्री स्कूलींग'' हवे सक्षम

Rajaram Pangavane
Rajaram Pangavaneesakal
Updated on

लेखक : राजाराम पानगव्हाणे

जगात आपला देश सर्वांत 'तरुण' आहे. कार्यक्षम मनुष्यबळाचे प्रमाण जगात आपल्याकडे सर्वाधिक आहे. तरुणाईकडून होणारे काम अधिक म्हणजे देशाचा विकास आणि प्रगती.

'डेमोग्राफिक डिव्हिडंड' म्हणून ओळखला जाणारा हा लाभ आणखी काही वर्षे आपल्या देशाला मिळणार आहे. प्रत्यक्षात हा लाभ मिळण्यासाठी जी क्षमता अंगी हवी, तिचा पाया लहानपणी तयार होणे गरजेचे असते.

तरच पुढील आयुष्यात विविध क्षेत्रात चांगलं आणि भरपूर नाव कमावता येऊ शकते. यासाठी बालपणात योग्य पोषण आणि योग्य शिक्षण मिळणे फार गरजेचे असते. त्यात ''प्री स्कूलींग''ची भूमिका सर्वांत महत्त्वाची ठरते.  (Saptarang latest marathi article by rajram pangavane Enabling Pre schooling for generation of achievers nashik)

देशातील पुढील पिढी घडविण्यात पूर्वीच्या अंगणवाड्या व सध्याच्या नवीन शिक्षण प्रणालीत विकसित झालेले प्ले ग्रुप, प्री प्रायमरी या संस्थांचा मोलाचा वाटा आहे.

बालकांच्या आरोग्य व शिक्षणासाठी केलेली ही गुंतवणूक आहे. बालकांचा शारीरिक आणि मानसिक विकासाचा पाया मजबूत करण्याचे काम प्ले ग्रुप प्री-प्रायमरीमध्ये होत असते.

बालपण, मानवी जीवनातील सर्वांत महत्त्वाचा टप्पा मानला जातो. हा काळ जलद वाढीचा आणि विकासाचा असतो. ज्यामुळे मुलांना त्यांच्या कुटुंबांकडून पुरेसा पाठिंबा, तसेच योग्य शिक्षण आणि आरोग्यसेवा मिळणे महत्त्वाचे ठरते.

मुलांच्या आयुष्यातील पहिल्या पाच वर्षांमध्ये त्यांच्यामध्ये उल्लेखनीय वाढ दिसून येते. या काळात त्यांच्या मेंदूमध्ये गुंतागुंतीचे तंत्रिका मार्ग विकसित होतात. जे त्यांच्या संज्ञानात्मक विकासासाठी महत्त्वाचे ठरतात.

हा काळ शारीरिक विकासासाठी देखील महत्त्वाचा असतो. पोषणासह मुलांचे मानसिक, भावनिक आणि सामाजिक अनुभव मुलांच्या भविष्यातील वाढ, आरोग्य, कल्याण आणि एकूणच जगण्याचा पाया घालतात.

बालपणात जशा अनेक संधी असतात, तशी काही मुले ही असुरक्षित देखील असतात. अपुरे पोषण, पर्यावरणातील विष, अस्थिर मानसिक स्थिती आणि बालपणापासून तणावासारख्या नकारात्मक गोष्टींचा देखील मुलांच्या जीवनावर कायमस्वरूपी परिणाम होत असतो.

त्यामुळे जीवनातील ही वर्षे सर्वाधिक वळण देणारी असतात. या वयोगटाकडे संवेदनशीलतेने बघण्याची आवश्यकता आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Rajaram Pangavane
मटकासुराची वरात!

लहान वयात ऐकणे, बघणे यातून मुले अनुकरण करत असतात. त्यामुळे हे वय अनुकरणशील असल्याचे म्हटले जाते. या वयोगटातील मुलांना काही बोलण्यास सांगितले तरी ते लगेच बोलतात किंवा त्यांना प्रश्न विचारले तरी ते त्यांच्या आकलनाप्रमाणे त्याची उत्तरेही देतात.

पण अनेकदा त्यांना बोलते करावे लागते, ते एक तंत्र आहे. त्यासाठी मुलांची मानसिकता समजून घेणे महत्त्वाचे असते. 

लहान मुले जेव्हा प्री प्रायमरी, प्ले ग्रुपमध्ये जातात, तेव्हा त्यांना पौष्टिक आहाराबरोबर बालगीते, गोष्टी, भिंतीवरच्या चित्रातून- पक्षी, प्राणी, संख्या ओळख, रंग ओळख, शरीर ओळख या गोष्टी हळुहळू शिकायला मिळतात.

थोडक्यात संस्कारांची मुलांची शिदोरी भरु लागते. लहान मूल म्हणजे मातीचा गोळा असतो. जसे त्यास घडवले जाईल तसा तो घडत जातो. छोट्या छोट्या बाबींच्या निरीक्षणातून कुतूहल मुलांमध्ये निर्माण करणे हे मोठेच आव्हान असते.

सर्वसाधारणपणे जी मुले या काळात अधिक चुणचुणीपणे प्रतिसाद देतात, त्यांची प्रगती व अन्य मुलांच्या प्रगतीत निश्चितच फरक दिसून येतो. हा फरक भविष्यातील सर्व शिक्षणात ठळकपणे टिपता येतो.

लहान मुलांना शिकविणे हे सर्वांत अवघड काम आहे. मुलांचा कल ओळखून त्यांना आनंद वाटेल, अशा पद्धतीने हसत खेळत शिकविले तर निश्चितच ते प्रतिसाद देतात.

बालकांच्या जडणघडणीत सर्वांत महत्त्वाचा हिस्सा बालगीत, कविता, गोष्टी आणि चित्रांमध्ये रंग भरणे इत्यादींचा असतो. सध्या आजूबाजुला पाहता अंगणवाडीत आणि प्ले ग्रुप्समध्ये तीच ती बालगीते शिकवली जातात.

सध्याच्या मुलांच्या आई-वडिलांनी जे  लहानपणी ऐकले-म्हटलेले असते, तीच गीते आजची बालकेही ऐकतात-शिकतात. उदा-नाच रे मोरा, मामाच्या गावाला जाऊ, ट्विंकल लिटिल स्टार. वास्तविक पिढीनुसार यामध्ये काही बदल घडणे अपेक्षित आहे.

काही प्रमाणात बदल घडत देखील आहेत. पण पाश्चात्त्य देशातील म्हणजे विकसित देशातील प्री प्रायमरी शिक्षण जर आपण जर बघितले तर ते आपल्या अनेक वर्ष पुढे आहेत. विकसित देशांशी स्पर्धा करणारी भावी पिढी तयार करायची असेल तर लहान वयातच बालगीतांना आधुनिकतेची जोड द्यायला हवी.

विज्ञान, इतिहास, गणित, भूमितीशी निगडित गीते अथवा कविता असायला हव्यात. यामुळे प्राथमिक शिक्षणात अधिक रुची निर्माण होईल. लहानपणी आई वडीलांनी किंवा आजी-आजोबांनी सांगितलेल्या गोष्टी या आजही आपल्या स्मरणात आहेत.

पूर्वी जे होते ते ठीक आहे. पण काळानुसार त्यात बदल होणे गरजेचे आहे. आजच्या पिढीत गोष्टी सांगण्याचे प्रमाण कमी आहे. मुलांना शांत करायचे झाल्यास त्यांच्या हातामध्ये मोबाईल गेम अथवा कार्टून व्हीडिओ दिले जातात.

पूर्वी गोष्टी अथवा पौराणिक कथा अधिक असायच्या. महापुरुषांच्या कर्तृत्त्व कथा, विज्ञान कथांना फार स्थान नव्हते. मात्र ते असायला हवे. बदलत्या काळानुसार बालगीते, गोष्टींत बदल म्हणजे नक्की काय करायचं, तर सध्या पाण्याची समस्या सर्वत्र आहे.

पाण्याचे महत्त्व सांगणाऱ्या गोष्टी, आपल्या अवतीभवतीचा परिसर स्वच्छ ठेवण्याशी संबंधित बालगीते या मुलांच्या कानी पडायला हवीत. प्ले ग्रुप, प्री प्रायमरी किंवा पालकांनी घरांत कोरे पेपर, कलर बॉक्स नेहमी ठेवायला हवे.

ते ठेवल्याने मुले हवे तसे कागदापासून फुले, पक्षी, वस्तू बनवणे, कागदावर रेघा ओढणे, ओबडधोबड चित्रे काढणे अशा बाबी करु लागतात. यामुळे त्यांच्या बुद्धीला चालना मिळत जाते. 

Rajaram Pangavane
जंगल पाहावं वाचून

शाळेत प्रवेशापूर्वी अंगणवाड्यांमध्ये मिळणाऱ्या शिक्षणामुळे मुले शाळेत जाण्यासाठी केवळ तयारच होतात असे नाही तर त्यांना समूहात कसे वागावे आणि भावना कशा प्रगट कराव्यात याचेही आपसूक शिक्षण मिळू लागते.

मुलांना अंगणवाड्यांमध्ये पोषणयुक्त आहारही मिळतो आणि त्याचबरोबर भाषा व आकलन विकासाला चालना देखील मिळते. घर वा परिसरात बोलल्या न जाणाऱ्या भाषेऐवजी तिथे बोलल्या जाणाऱ्या भाषेतून म्हणजेच मातृभाषेतून शिकणे आणि शिकवणे प्री प्रायमरी, प्ले ग्रुपमध्ये होत असते. 

लहान मुलाला जसा आकार द्यावा तसे ते घडते, अशी आपल्याकडे म्हण आहे. यामुळेच मुलांना लहान वयातच चांगल्या सवयी लावायला हव्यात. लहान मुलांना घडवत असताना पालकांच्याही काही जबाबदारी आहेत.

याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, मोठ्यांच्या कृतीतून लहान मुले शिकतात. मोठ्यांनीच वागणे, बोलणे, ''टेक रिस्पेक्ट-गिव रिस्पेक्ट'' हे सर्व केले पाहिजे. प्रत्येक गोष्ट वेळेवर करावी. ‘मग करू’ म्हटले की, पुन्हा ती गोष्ट केली जात नाही.

त्यासाठी शरीरापेक्षा मनाला शिस्त लावायला पाहिजे. लहानपणापासून मुलांचे ऐकत राहिले की, मुले पुढे ऐकेनाशी होतात. त्यामुळे त्यांचे अतीलाड करू नये.

(लेखक ब्रम्हा व्हॅली ग्रृप ऑफ एज्युकेशन इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक अध्यक्ष आहेत.)

Rajaram Pangavane
श्‍वानांची व्हिलचेअर!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.