Monsoon Tourism : पावसाळी पर्यटनाला जायचंय... पण जरा जपून!

खबरदारी आवश्‍यक; लाखमोलाच्या जिवाशी खेळ नको, हुल्लडबाजांवर नियंत्रण हवे.
Waterfall
Waterfallsakal
Updated on

नागठाणे - जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची रिमझिम सुरू झाली आहे. स्वाभाविकच पर्यटकांची खासकरून तरुणाईची पावले वर्षा पर्यटनासाठी आतुर झाली आहेत. धुक्यांची दुलई, हिरवाई पांघरलेले डोंगर, नागमोडी वळणांच्या वाटा, फेसाळत कोसळणारे धबधबे या गोष्टी साऱ्यांच्याच तनामनाला साद घालतात. अर्थात या सुंदर चित्राची अनुभूती घ्यायची असेल, तर प्रत्येकाने तितकीच काळजी घेणेही अगत्याचे ठरत आहे.

पावसाच्या आगमनाबरोबर पर्यटनाचीही चलती सुरू झाली आहे. अशातच काल पहिल्याच रविवारी केळवली धबधब्यात एक युवक बेपत्ता झाल्याची घटना घडली.

लोणावळ्यानजीकच्या भुशी डॅम परिसरात पुण्यातील एकाच कुटुंबातील पाचहून अधिक सदस्यांचा दुर्दैवी अंत झाला. त्यातून पावसाळी पर्यटन हा जसा आनंदाचा तसाच जिवाला घोर लावणारा विषयही बनला आहे. त्या दृष्टीने पर्यटनाला जाताना खबरदारी घेणेही तितकेच आवश्यक ठरत आहे.

काय काळजी घ्याल?

1) मोबाइलवरील सेल्फी, रिल्स, स्टेटस हा तरुणाईचा आवडता छंद. त्यापायी आपला जीव धोक्यात घालून फोटोग्राफीचा प्रयत्न सुरू असतो. त्यातून आजवर जिल्ह्यातील पर्यटनस्थळी अनेक दुर्घटना घडत आहेत. पर्यटनाला जाण्यापूर्वी याविषयी सतर्कता बाळगणे गरजेचे आहे.

2) बहुतेक ठिकाणी निसरडे रस्ते, जागोजागी खड्डे, साचलेले शेवाळ, खचणारे डोंगर अशा बाबी आहेत. त्यामुळे वाहने चालविताना दक्षता महत्त्वाची आहे. बहुतेकजण पर्यटनाला जाताना दुचाकीला प्राधान्य देतात. ती चालविताना विशेष काळजी हवी.

3) धबधबा परिसरातील पाण्याच्या प्रवाहाचा अनेकदा अंदाज येत नाही. अतिउत्साही युवक पाण्यात उतरतात. त्यामुळेही आजवर काही जीवघेण्या घटना घडल्या आहेत. याचाही विचार होणे आवश्यक आहे.

4) काही ठिकाणी वन्य प्राण्यांचा, जंगली श्वापदांचा, जळूसारख्या उपद्रवी कीटकांचा त्रास होतो. काही पर्यटनस्थळांच्या परिसरात मोबाईल रेंजचा अभाव आहे. जंगली भागात वाट चुकण्याची शक्यता असते. या गोष्टीही लक्षात ठेवाव्यात.

नाशिकच्या धर्तीवर पावले उचलल्यास बसेल चाप

नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्या जिल्ह्यातील वर्षा पर्यटनस्थळावर पर्यटकांसाठी ऑनलाइन प्रवेश पासची संकल्पना पुढे आणली आहे. सातारा जिल्ह्यात कासमध्ये फुलाच्या हंगामात ऑनलाइन प्रवेश पासची सोय असते. त्याचा गर्दी नियंत्रणासाठी फायदा होतो. धबधब्याच्या ठिकाणी ऑनलाइन प्रवेश पासची अंमलबजावणी सुरू केल्यास गर्दी आणि वाहतूक नियंत्रण करता येईल.

आश्वासक पाऊल उचलण्याची गरज

जिल्हा प्रशासन व पोलिस यंत्रणेने ऑनलाइन प्रवेश पास संकल्पनेचा अभ्यास व माहिती घेऊन स्थानिक समितीला तशी सुविधा निर्माण करण्यासाठी आश्वासक पाऊल उचलण्याची गरज अधोरेखित झाली आहे. त्यातून दररोज विशिष्ट संख्येने आणि निर्धारित वेळेसाठी पर्यटकांना ऑनलाइन प्रवेश मिळेल; जेणेकरून धबधबास्थळी एकाच वेळी होणारी प्रचंड गर्दी, संभाव्य दुर्घटनेचा धोका आणि वाहतूक कोंडी कमी होईल. हुल्लडबाज पर्यटकांवर कारवाई, वाहतूक व्यवस्था सुरळीत राखण्यास पोलिस यंत्रणेला मदत होईल.

दृष्टिक्षेपात

  • जुलै ते सप्टेंबरअखेर दररोज हजारो पर्यटक आणि त्यांच्या वाहनांचे धबधबास्थळी आगमन

  • रविवार आणि सुटी दिवशी पर्यटकांच्या संख्येत अधिकच पडते भर

  • गर्दी आणि वाहतूक कोंडीची वाढते तीव्रता

  • हुल्लडबाज पर्यटकांवर करडी नजर ठेवण्याबरोबरच वाहतूक व्यवस्था सुरळीत राखण्यासाठी पोलिस यंत्रणेची तारेवरची कसरत

वर्षा पर्यटनाची पसंती स्थाने

  • कास पठार परिसर

  • ठोसेघर धबधबा

  • वजराई धबधबा

  • एकीव धबधबा

  • केळवली धबधबा

  • ओझर्डे धबधबा

  • लिंगमळा धबधबा

  • सडावाघापूर पठार

  • परमाळे पठार

  • चाळकेवाडी पठार

  • वाल्मीकी पठार

  • पाचगणीचे पठार

  • जगमीनचा तलाव

  • विविध घळींचा परिसर

  • उरमोडी, धोम, कण्हेर

  • तारळी धरणाचा परिसर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.