Satara Water Crisis : एकीकडे पाऊस, तर दुसरीकडे टँकरच्या फेऱ्या

माण तालुक्यातील स्थिती; २३ गावे आणि १६५ वाड्यांवर पाणीपुरवठा सुरू
Satara Water Crisis
Satara Water CrisisSakal
Updated on

दहिवडी : माण तालुक्यात एकीकडे मुसळधार पावसाने सर्वत्र पाणीच पाणी केले असून, दुसरीकडे मात्र पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू आहेत. तालुक्यातील काही गावांमध्ये पुरेसा पाऊस न झाल्याने ही परिस्थिती ओढवली आहे. आजही माण तालुक्यातील २३ गावे आणि १६५ वाड्यांवर टँकर सुरू असल्याचे चित्र आहे.

भीषण दुष्काळाला सामोरे गेलेल्या माण तालुक्यात ऐन उन्हाळ्यात सत्तरपेक्षा जास्त गावे व चारशेपेक्षा जास्त वाड्यावस्त्यांवर ८५ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. बाधित लोकसंख्या सव्वालाखाच्या आसपास होती, तर तेवढेच पशुधन सुद्धा बाधित होते.

पिण्याच्या पाण्यासोबतच काही प्रमाणात चाऱ्याची टंचाई सुद्धा होती. अपवाद वगळता प्रशासनाने नेटके नियोजन करून जनतेला वेळेवर पाणी पोचविण्याचा प्रयत्न केला, तसेच चाऱ्याची उपलब्धता करून दिली.

जून महिन्यात माणमध्ये ५ जूनपासून सुरू झालेल्या पावसाने सर्व चित्रच बदलून टाकले. माण तालुक्यातील बहुतांशी भागात मुसळधार पाऊस झाला. या पावसाने पाणीच पाणी केले. अनेक ठिकाणी काही दिवसांपूर्वीच येथे प्यायला हंडाभर सुद्धा पाणी नव्हते हे खोटे वाटेल इतके पाणी उपलब्ध झाले. अक्षरशः शेत शिवारात पाय सुद्धा ठेवता येणार नाही एवढे पाणी साठलेले आहे.

एकीकडे अशी परिस्थिती असताना माण तालुक्यातीलच पूर्वोत्तर भागातील अनेक गावांत अजूनही पिण्यासाठी पाण्याचे टँकर सुरू आहेत. या भागात म्हणावा असा पाऊस पडला नसल्याचे चित्र आहे.

मंडलनिहाय पाहिले तर पडलेला पाऊस व पावसाची टक्केवारी खूपच आहे; पण संबंधित मंडळातील काही गावांमध्ये अजूनही पुरेसा पाऊस पडला नसल्याचा अहवाल प्रशासनाला देण्यात आला आहे.

त्यामुळे या गावांमध्ये आणि वाड्यावस्त्यांवर टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र, सध्या सुरू असलेल्या पावसाचे प्रमाण पाहता आगामी काळात माणमधील टँकरची संख्या शून्यावर येईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

दहा लाख लिटर पाणी

माण तालुक्यातील २३ गावे १६५ वाड्यावस्त्यांवर ५३,१०० बाधित लोकसंख्या आहे. तालुक्यातील काही गावांमध्ये पुरेसा पाऊस न झाल्याने ही परिस्थिती ओढवली आहे. आजही माण तालुक्यातील २३ गावे आणि १६५ वाड्यांवर टँकर सुरू असल्याचे चित्र आहे. या लोकसंख्येला १६ खासगी टँकरच्या साहाय्याने ४६ खेपांच्या माध्यमातून साधारण दहा लाख लिटर पाणी पुरविण्यात येत आहे.

वस्तुस्थिती पाहण्याची गरज

खरंच ज्या ठिकाणी पाण्याची गरज आहे तिथे प्रशासनाने पाणी पुरविलेच पाहिजे. मात्र, पाऊस पडून पाण्याची उपलब्धता झालेली असताना जर कोणाच्या तरी आर्थिक फायद्यासाठी संबंधित ठिकाणी टँकर सुरू असले, तर त्याच्यावर कारवाई करण्याची आवश्यकता आहे. यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी टँकर सुरू असलेल्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन पाहणी करण्याची मागणी होत आहे.

या गावात सुरू आहे टँकर

राणंद, डंगिरेवाडी, मार्डी, पिंपरी, पळशी, मोही, इंजबाव, कारखेल, भालवडी, हिंगणी, वरकुटे-म्हसवड, हवालदारवाडी, संभूखेड, पर्यंती, वाकी, जाशी, खडकी, भाटकी, रांजणी, शेवरी, पांगरी, परकंदी, वडगाव ही गावे व त्याअंतर्गत येणाऱ्या वाड्यावस्त्यांवर पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.