ST Mahamandal : एसटीतर्फे आता प्रवासी राजा दिन; दर सोमवार, शुक्रवारी होणार तक्रारींचे निवारण

प्रवाशांच्या समस्या, तक्रारीवजा सूचना यांचे स्थानिक पातळीवर जलद गतीने निराकरण होण्याच्या उद्देशाने प्रत्येक आगारात दर सोमवारी व शुक्रवारी प्रवासी राजा दिन आयोजित करण्यात येणार आहे.
ST
STsakal
Updated on

कऱ्हाड - प्रवाशांच्या समस्या, तक्रारीवजा सूचना यांचे स्थानिक पातळीवर जलद गतीने निराकरण होण्याच्या उद्देशाने प्रत्येक आगारात दर सोमवारी व शुक्रवारी प्रवासी राजा दिन आयोजित करण्यात येणार आहे. या दिवशी एसटीचे जिल्हा प्रमुख म्हणजे विभाग नियंत्रक एका आगारात जाऊन प्रवाशांच्या समस्या, तक्रारी, सूचना ऐकून घेतील. त्या तातडीने सोडविण्याच्या दृष्टीने उपाययोजना करतील. त्यामुळे प्रवाशांचे समाधान होऊन प्रवासी सेवेचा दर्जा व गुणवत्ता वाढण्यास मदत होणार आहे.

एसटीच्या विविध बसमधून दररोज सुमारे ५४ ते ५५ लाख प्रवाशांची सुरक्षित वाहतूक केली जाते. प्रवाशांना एसटी बस स्थानक, बस स्थानकांवरील प्रसाधनगृहे ही स्वच्छ, निर्जंतुक ‍आणि टापटीप असावीत, असे वाटते, तसेच एसटी बस स्वच्छ व वेळापत्रकानुसार वेळेत मार्गस्थ व्हाव्यात, ठरलेले थांबे घ्यावेत, चालक-वाहक यांनी त्यांच्याशी सौजन्याने वागावे, अशी किमान अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त केली जाते.

यासंबंधित प्रवासी तक्रारींचे निराकरण वेळेत न झाल्याने प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागतो. या समस्यांचे निराकरण स्थानिक पातळीवर तातडीने होऊ शकते. प्रवासी सेवेचा दर्जा आणि गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रवाशांच्या समस्यांचे वेळीच निराकरण होणे अत्यंत आवश्यक असते. तसे झाल्यास प्रवाशांना समाधानकारक सेवा देणे एसटी महामंडळाला शक्य होणार आहे.

एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांच्या संकल्पनेतून राज्यातील सर्व बस स्थानकात ही योजना १५ जुलैपासून सुरू करण्यात येणार आहे. प्रवासी, प्रवासी संघटना, शाळा, महाविद्यालये यांनी आपल्या समस्या-तक्रारी, सूचना लेखी स्वरूपात दर सोमवारी व शुक्रवारी संबंधित आगारात सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत मांडू शकणार आहेत. त्यावर विभाग नियंत्रक तातडीने कार्यवाही करतील.

प्रवासी राजा दिन कोणत्या दिवशी कोणत्या आगारात होणार आहे, याचे वेळापत्रक विभाग नियंत्रक त्या, त्या वेळी जाहीर करतील. विशेष म्हणजे प्रत्येक लेखी तक्रारीची नोंद ठेवण्यात येणार असून, याबाबत काय कार्यवाही केली आहे, यावर मध्यवर्ती कार्यालय लक्ष ठेवणार आहे.

प्रवाशांच्या सोयीसाठी राज्यातील प्रत्येक बस स्थानकावर दर सोमवारी व शुक्रवारी प्रवासी राजा दिन सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत १५ जुलैपासून सुरू होईल. सर्व प्रवासी बंधू- भगिनींनी या योजनेचा लाभ घेऊन आपल्या समस्यांचे निराकरण करून घ्यावे.

- डॉ. माधव कुसेकर, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक एसटी महामंडळ, मुंबई

गावापासून बस स्थानकापर्यंत येण्यासाठी अनेकदा वेळेत बस मिळत नाही. त्यामुळे शैक्षणिक नुकसान होते. त्यासाठी आम्ही आगार प्रमुखांना निवेदन दिले. जादा बसची मागणी केली. मात्र, त्यांच्याकडून बसच नसल्याचे सांगण्यात येते. मग आम्ही काय करायचे ?

- महेश देशमुख, प्रवासी विद्यार्थी

विद्यार्थ्यांच्या या गैरसोयी दूर होतील?

  • शाळा, कॉलेजच्या वेळेत बसच्या जादा फेऱ्या नसतात.

  • ग्रामीण भागातील अनेक फेऱ्या उत्पन्नाअभावी बंद केल्या जातात.

  • बस स्थानकापासून कॉलेजपर्यंत अर्ध्या तासाला बस उपलब्ध कराव्यात.

  • पासला अगोदर पैसे भरूनही कॉलेजच्या वेळेसाठी बसअभावी रिक्षाने जावे लागते.

  • उन्हाळी, दिवाळी सुटीत एसटी पास बंद केले जातात.

  • अनेक एसटी बसचे कंडक्टर पासवाले विद्यार्थी बसमध्ये घेत नाहीत.

  • काहीवेळेला पासचे आयकार्ड नसल्यावर वाहकांकडून नाहक त्रास दिला जातो.

  • विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी पूर्वीप्रमाणे सिटीबस सुरू कराव्यात.

  • अनेकदा मार्गावर विद्यार्थी दिसले, की बस मोकळी असूनही थांबवली जात नाही.

प्रवाशांच्या तक्रारींचा व्हावा निपटारा

  • सिझनवेळी ग्रामीण भागातील बसफेऱ्या बंद केल्या जातात.

  • बस स्थानकात महिलांकडूनही स्वच्छतागृसाठी पैसे घेतले जातात.

  • एसटीचे बोर्ड न लावताच अनेकदा बस स्थानकातून नेल्या जातात.

  • प्रवासात काही एसटी बस पावसाळ्यात गळतात.

  • रात्रीच्यावेळी एसटी बसची लाइट मोठी पडत नाही.

  • महिलांसाठीचे हिरकणी कक्ष अनेकदा बंदच असतात.

  • एसटी बस ब्रेकफेल होण्याचे प्रमाण वाढले आहे.

  • महामंडळाने एसटी बसची संख्या वाढवण्याची गरज

  • अचानकपणे रात्रीच्या मुक्कामी बस रद्द केल्या जातात.

महिलांना ५० टक्के प्रवास सवलत एसटीने दिली आहे. त्यामुळे महिला प्रवाशांची संख्या वाढली आहे. मात्र, एसटी बस त्या तुलनेत वाढलेल्या नाही. प्रवाशांची संख्या वाढल्याने प्रत्येक बस फुल्ल होते. त्यामुळे महिलांची अनेकदा गैरसोय होते. त्याचबरोबर अनेकदा एसटी बस या रस्त्यातच बंद पडत आहेत. त्यामुळे रात्री, पावसात, उन्हात रस्त्यावर उभे राहून दुसऱ्या बसची वाट पाहायला लागते. त्याकडे कोणीही बघायला तयार नाही.

- सुजाता जाधव, प्रवासी महिला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.