जामाते दशम ग्रहः म्हणजेच जावई हा दहावा ग्रह!... मात्र, ह्याच जावयाची चक्क गाढवावरून धिंड?

dhind.jpg
dhind.jpg
Updated on

नाशिक : (सिन्नर) ब्रिटिश राजवटीत सुरू झालेली व 100 वर्षांहून अधिक काळापासून सुरू असलेल्या जावयाच्या धिंडीच्या प्रथेसाठी वडांगळीकर सज्ज झाले आहेत. धूलिवंदन ते रंगपंचमीदरम्यान वडांगळीकर जावयाची गाढवावरून धिंड काढतात. शुक्रवारी (ता.13) रंगपंचमीचा दिवस आला तरी अद्याप जावयाचा शोध संपलेला नाही. मात्र एनवेळी कोणत्याही परिस्थितीत जावयाचा शोध घेऊन रंगपंचमीला धिंड काढायचीच, असा चंग येथील युवकांनी बांधला असल्याने वडांगळीत जावयाची गाढवावरून धिंड काढली जाणार आहे. 

प्रथा-परंपरा या वर्षीही जपण्यासाठी जावयाबरोबरच गाढवाचाही शोध

ज्या गावातून नवरदेव होऊन सजून, वाजतगाजत घोड्यावरून ऐटीत मिरवले जाते, त्याच गावात जावयाला गाढवावरून मिरविण्याची वडांगळीकरांची फार जुनी प्रथा आहे. चेहरा काळा करून लसणा-मिरचीची मुंडावळी बांधून कांदे, बटाटे, टायर, चप्पल बुटाचे हार घालून जावईबापूंना गाढवावर बसविण्यात येते. गावात वाद्याच्या गजरात या स्वारीला गाढवावर बसून फिरवले जाते. सारे त्यांची टिंगलटवाळी करतात, टर उडवतात. रंगरूपी अक्षतांचा त्यांच्यावर गल्लोगल्ली वर्षाव करतात. नंतर त्याच जावयाला आंघोळ घालून (नवरदेवासारखे) सुवासिनींच्या हस्ते नवी वस्त्रे परिधान करून आदराने चहापान, नाष्टा, सुग्रास भोजन देऊन निरोप दिला जातो. ग्रामस्थ विशेष करून तरुणवर्ग आपली ही प्रथा-परंपरा या वर्षीही जपण्यासाठी जावयाबरोबरच गाढवाचाही शोध घेत आहेत. 

स्थायिक झालेल्यांनाही जावयाचा मान देत त्यांची धिंड काढण्याची परंपरा

रंगपंचमीला निश्‍चित जावई सापडेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. गावात समृद्धी यावी, आरोग्य चांगले राहावे, दुष्काळ पडू नये व जावयाचीही भरभराट व्हावी, अशी भावना धिंड काढण्यामागे आहे. जावई न मिळाल्यास नोकरी- व्यवसायानिमित्त वडांगळीत स्थायिक झालेल्यांनाही जावयाचा मान देत त्यांची धिंड काढण्याची परंपरा ग्रामस्थांनी जोपासली आहे. इंग्रज अधिकारी, शिक्षक, व्यापारी आदींनाही जावयाप्रमाणे धिंडीचा मान मिळाला आहे. 

जावयांनी फिरवली वडांगळीकडे पाठ... 

नुकताच वडांगळीत आपला व्यवसाय सुरू करणारे जावई धिंडीसाठी आयतेच सावज सापडल्याचे वडांगळीकरांना वाटत असतानाचा या धिंडीची कुणकूण या जावईबापूंना लागली आणि त्यांनी धूलिवंदनपासून वडांगळीकडे पाठ फिरवली असून, रंगपंचमी होईपर्यंत वडांगळीत पाय न ठेवण्याची शपथ घेतली आहे. 

बाहेरगावाहून बिदागीने गाढव आणण्याचे निश्‍चित केले असून, सर्व तरुण जावयाच्या शोधात आहेत. रंगपंचमीला दुपारपर्यंत जावयाचा शोध निश्‍चित संपेल. महाराष्ट्रात आगळीवेगळी असलेली ही प्रथा वडांगळीकर निश्‍चित यंदाही जोपासतील. - विक्रम खुळे, ग्रामस्थ, वडांगळी  


 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.