साक्री : एप्रिल महिन्यात उष्णतेच्या लाटेने कहरच केला. यादरम्यान एप्रिलमध्ये तापमानाचा पारा ४० अंशांपेक्षा वरती गेला. नागरिकांच्या आरोग्याला आणि भाजीपाला पिकांनासुद्धा उष्ण तापमान व गरम झळांचा फटका बसला. खोलवर जाऊ न शकलेल्या भाजीपाल्याच्या मुळ्या जमीन तापल्यावर कोरड्या पडू लागल्या.
त्याचा फटका झाडाच्या वाढीवर व फुलोऱ्यावर झाला. परिणामी भाजीपाला पिकाची फळधारण क्षमता कमी झाली आणि मिरची, टोमॅटो, वांगी यांसारखे फळवर्गीय भाजीपाल्याचे झाड मुदतीपूर्वीच थकले. (Dhule Vegetable crops hit by heat wave)
एक किंवा दोन वेळेस फळाची तोडणी केल्यानंतर झाड कोमेजू लागले. गड्डा कोबी, फुलकोबी, कोथिंबीर यासहच गवार, वालपापडी अशा शेंगवर्गीय व वेलवर्गीय पिकांना विविध रोगांनी ग्रासले. शेतकऱ्यांनी झाडाचा जोम टिकून राहावा यासाठी अनेकविध प्रयत्न केले. खते दिली, फवारण्या केल्या, झाडांना कापडाच्या सहाय्याने सावली देण्याचा प्रयत्न केला; परंतु उष्ण झळांनीयुक्त हवा अनेक दिवस अखंडपणे वाहत राहिल्यामुळे व जमीनही बेसुमार तापल्याने झाड दिवसेंदिवस कमकुवत होत गेले. झाड बहारदार होण्यापूर्वीच उजाड झाले.
उन्हाळ्यात भाजीपाला पिकातून आर्थिक कमाई करता येईल या उद्देशाने अनेक शेतकऱ्यांनी फेब्रुवारी व मार्चमध्ये अनेक प्रकारच्या भाजीपाल्याची लागवड केली होती. त्यानंतर झाड एक-दीड महिन्याचे होऊन नेमके फूल व फळधारणा होत असतानाच एप्रिलमध्येच तीव्र उष्णतेची लाट आली.
या लाटेतच भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे भांडवलही बुडाले. मिरचीवर अळीचा प्रादुर्भाव वाढून मिरची झाडावरच सडू लागली. टोमॅटोवर ‘तुटा’ अळीचा प्रादुर्भाव वाढतच गेला. त्यात फळमाशीच्या डंखाने चांगल्या प्रतीचा बाहेरून दर्जेदार वाटणारा टोमॅटोही मधून खराब होऊ लागला. फुलकोबीही अतिउष्णता झेलू शकली नाही.
त्यामुळे फळाची वाढ झाली नाही व फुलकोबीचे फळ अत्यंत पिवळे पडले. याव्यतिरिक्त इतर भाजीपाल्यांचीही स्थिती अशीच दयनीय झाली. लाटेदरम्यान वाहणाऱ्या उष्ण हवेमुळे फळांचा रस शोषला जाऊन भाजीपाल्याची फळे वजनाने हलकी झाली व त्यामुळे मालाची प्रत खराब होऊन बाजारपेठांमध्ये मनाजोगता दर मिळेनासा झाला. (latest marathi news)
उष्णतेच्या रूपाने नैसर्गिक मार, रोगांचा प्रादुर्भाव आणि बाजारपेठेत मिळणारे कवडीमोल यामुळे टोमॅटो, कोबी, फुलकोबी अशा भाजीपाल्यांमध्ये शेतकऱ्यांनी नाइलाजाने जनावरे चरण्यासाठी सोडून दिली. तीव्र उन्हामुळे व उष्णतेच्या लाटेमुळे काही शेतकऱ्यांची कोथिंबीर विरळ झाली व वाढ खुंटली.
म्हणून अपेक्षित उत्पादन मिळाले नाही. शेतातून काढलेली कोथिंबीर बाजारपेठेत पाठविल्यानंतर वाहतुकीचा खर्चही त्यातून निघाला नाही. काही शेतकऱ्यांना बाजारपेठेत कोथिंबिरीच्या वाहतुकीसाठी झालेला खर्च खिशातून भरावा लागला. सामान्यांना किरकोळ बाजारात भाजीपाला खरेदीसाठी सामान्यतः पावशेर (पाव किलो) भाजीपाल्यासाठी वीस रुपये मोजावे लागतात.
प्रत्यक्ष मात्र शेतकऱ्याकडून व्यापारी दहा रुपयांपेक्षा कमी दराने भाजीपाला खरेदी करतात. यामुळे आधीच भांडवलाच्या कर्जापायी वाकलेला शेतकरी अस्मानी आणि सुलतानी संकटात बाजारपेठेत मिळणाऱ्या मातीमोलाने अधिकच हवालदिल झालेला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.