Nandurbar News : बोरदच्या माजी उपसरपंच रंजनकोर प्रेमसिंग राजपूत यांनी आपल्या राजपूत समाजाचा पुनर्विवाह न करण्याच्या चालीरीतीला झुगारून आपल्या विधवा सुनेचा पुनर्विवाह लावून देत विधवा बनण्याच्या शापातून मुक्त केले आहे. बोरद येथील राजपूत समाजाचे युवा नेते तथा ग्रामपंचायत सदस्य अनिलसिंग प्रेमसिंग राजपूत यांचे लहान बंधू व माजी उपसरपंच रंजनकोर प्रेमसिंग राजपूत यांचा लहान मुलगा सुनील प्रेमसिंग राजपूत याचा विवाह २०१५ मध्ये सुरत येथील भरतसिंग राजपूत यांची कन्या माधुरी हिच्याशी झाला होता. ( ideal of mother in law in Rajput society by remarriage )
विवाहानंतर अवघ्या काही वर्षांतच सुनीलचा अचानक मृत्यू झाला. त्याच्या मागे पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार होता. मुलाचा मृत्यू झाल्यानंतर सुनेचे वय अवघे २६ असल्याने रंजनकोर सतत सुनेबाबत विचार करीत होत्या. त्यांच्या डोक्यात एक वेगळीच कल्पना आरूढ होती, ती म्हणजे, काहीही करून सुनेचा पुनर्विवाह लावून द्यावा. त्यात मोठी अडचण ठरत होता तो समाजाच्या चालीरीती.
कारण राजपूत समाजात पुनर्विवाह करण्यास मान्यता नाही किंवा कुठलाही परिवार घरातील सुनेचा पुनर्विवाह करत नाही अथवा करू देत नाही, अशी त्यांची प्रथा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आजतागायत ही प्रथा सुरू आहे. मात्र तरुण वयात मुलगा मरण पावल्याने सून माधुरी विधवा झाल्यामुळे त्यांच्या घरावर मोठे संकट आले होते.
या संकटातून मार्ग काढावा या दृष्टीने रंजनकोर तसेच अनिलसिंग यांनी आपल्या सर्व समाजातील वरिष्ठ नेत्यांशी याबाबत चर्चाविनिमय करून व नातलगांच्या सल्ल्याने तसेच माधुरीचे आई, वडील आणि त्यांच्या नातलगांच्या सहमतीने हा पुनर्विवाहाचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला. माधुरीचे कन्यादान त्यांच्या सासू रंजनकोर व सासरे प्रेमसिंग यांनी केले. ( latest marathi news)
त्याचबरोबर अनेक वर्षांपासून राजपूत समाजात पुनर्विवाह होत नव्हता तो त्यांनी सुरू केला. त्यांच्या या धाडसी निर्णयाने समाजात एक वेगळा आदर्श निर्माण करून दिला आहे. माधुरी व दिवंगत सुनील यांना एक मुलगी व मुलगा आहे. मुलगी असल्याने तिला होणारे वडील जितेंद्र रमेश राजपूत यांनी दत्तक घेतले व मुलगा तेजस यास आपले आजोबा व काका यांनी त्यांच्याकडे ठेवून त्याच्या पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारली.
या पुनर्विवाह सोहळ्यासाठी श्री राजपूत करणी सेना जिल्हाध्यक्ष श्याम राजपूत, सामाजिक कार्यकर्ता दिग्विजयसिंग राजपूत यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक माजी समाजकल्याण सभापती नरहर ठाकरे, ग्रामपंचायत सदस्य साजन शेवाळे यांच्यासह समाजातील व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
अशी मिळाली संकल्पनेला चालना
माधुरीचा विवाह नंदुरबार येथील रमेश अंबरसिंग राजपूत यांचे चिरंजीव जितेंद्र रमेश राजपूत यांच्याशी बुधवारी (ता. १) नंदुरबार येथे झाला. दुर्गा खांडसरीचे कर्मचारी तथा विश्व हिंदू परिषदेचे अर्चल विभाग यांच्यासह प्रमुख नरोत्तम लोटन पटेल यांनी या विवाहाला चालना दिली. त्यांनी आपले सहकारी अनिल राजपूत यांना वेळोवेळी माधुरीचा पुनर्विवाह होणे गरजेचे असल्याचे समजावून सांगितले आणि यातूनच या अप्रतिम संकल्पनेला चालना मिळाली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.