Nandurbar News : सायंकाळची वेळ, अथांग सागरात ढगांचा गडगडाट व विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळत आहे आणि त्यात वाहणारा जोरदार वारा व उसळणाऱ्या लाटांमुळे परिस्थिती आणखीनच बिकट झाली आहे आणि अशा परिस्थितीला ३० मिनिटे तोंड देऊन बार्जमधील सर्व नागरिक जिवंत राहतात. हा एखाद्या सिनेमाचा क्लायमॅक्स नसून मतदान केंद्रावरून परतणाऱ्या कर्मचाऱ्यांसंदर्भात घडलेली घटना आहे. हा अनुभव नर्मदेच्या काठावरील मुखडी (ता. अक्कलकुवा) मतदान केंद्रावरून परतणाऱ्या कर्मचाऱ्यांना आला. ( Thrilling experience of employees returning from polling station by barge )
नंदुरबार लोकसभेसाठी १३ मेस मतदान झाले. नर्मदेच्या काठावरील नागरिकांनादेखील मतदान करता यावे यासाठी मुखडी येथे तात्पुरत्या स्वरूपात मतदान केंद्र उभारण्यात आले होते. दरम्यान, मुखडी येथे येण्या-जाण्यासाठी बार्जचा (बोटीचा) वापर करण्यात येतो. मतदानाचा दिवशी मुखडीत दिवसभर ढगाळ वातावरण होते. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बूथवरील मतदान अधिकारी, कर्मचारी परत जाण्यासाठी सायंकाळी सव्वासहाला मतदानाच्या सर्व साहित्यासह बार्जमध्ये बसले.
पाऊस पडत असल्याने कर्मचाऱ्यांनी सर्व मतदान साहित्य सुरक्षित ठेवले आणि स्वतः भिजत प्रवासाला सुरवात केली. काही वेळानंतर पावसासोबतच ढगांचा गडगडाट व विजेच्या कडकडाट सुरू झाला आणि वेगाने वारा वाहायला सुरवात झाली. तसेच नर्मदेच्या लाटादेखील खवळू लागल्या. बार्जमधील चालक प्रवीण याला परिस्थितीचा अंदाज आल्याने त्याने स्वतः लाइईफ सेव्हिंग जॅकेट घालत सर्वांना ते घालण्यासाठी दिले. वाहणारा वेगवान वारा, उसळणाऱ्या लाटा यामुळे बार्ज अनेकदा जागचा जागी फिरली, तर कधी या बाजूला, तर कधी त्या बाजूला झाली.
एव्हाना परिस्थिती हाताबाहेर गेली असून, आपले काही खरे नाही अशी धारणा सर्व कर्मचाऱ्यांची झाली होती. बिकट परिस्थिती पाहून कर्मचारी रडू लागले आणि जीव वाचविण्यासाठी देवाचा धावा करू लागले. दरम्यान, सातला बार्ज दोन डोंगरांच्या किनारी लागली. कर्मचारी त्या ठिकाणी अर्धा तास थांबले आणि वाऱ्याचा वेग कमी झाल्यानंतर पुढे जाण्याचा निर्णय घेतला. रात्री आठला कर्मचारी डनेल येथे पोचले आणि परिस्थिती लक्षात घेता तेथेच मुक्काम करण्याचा निर्णय घेतला.
तेथील रेशन दुकानदाराने सर्वांना जेवण देत, आपल्या झोपडी वजा घरात राहण्याची सोय केली. मंगळवारी सकाळी सहाला डनेलवरून कर्मचारी पुढे जाण्यासाठी निघाले आणि नऊला केवडिया येथे पोचले. तेथून सर्व जण बसने अक्कलकुव्याकडे निघाले. शेवटी तीनला नंदुरबारला पोचत कर्मचाऱ्यांनी आपले मतदान साहित्य जमा केले आणि सुटकेचा निःश्वास सोडला.
''ती तीस मिनिटे आयुष्यभर लक्षात राहतील. साक्षात मृत्यू समोर असताना बार्जचालकाने मोठ्या धाडसाने पडणारा पाऊस, वाहणारा वेगवान वारा व खवळणाऱ्या लाटा अशा बिकट परिस्थितीत बार्ज चालवली आणि डनेल गावाच्या काठापर्यंत नेली. त्याचा प्रयत्न, अनुभव व देवाच्या कृपेनेच आम्ही सर्व जण वाचलो.''-गौरव टवाळे, मुखडी मतदान कर्मचारी
कर्मचाऱ्यांची नाराजी
मतदान काळात बहुसंख्य मतदान अधिकारी, कर्मचारी प्रामाणिकपणे आपली सेवा देतात. त्याप्रमाणे मुखडी येथील येथील कर्मचाऱ्यांनीदेखील प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावले. अक्षरशः मृत्यूच्या दाढेतून वाचून ते चौथ्या दिवशी सुखरूप परतले. मात्र कुठल्याही अधिकाऱ्याने कौतुक सोडा, साधी त्यांची विचारपूसदेखील न केल्याने, त्यांनी नाराजी व्यक्त केली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.