Nashik Political News: अकार्यक्षम नेतृत्वामुळे बागलाण दुष्काळी यादीतून बाहेर : केशव मांडवडे

माजी आमदारांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार
Drought
Drought esakal
Updated on

सटाणा : बागलाण तालुक्यात यंदा सरासरीच्या पन्नास टक्केही पाऊस झालेला नाही. शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाल्याने बळीराजा उद्धवस्त झाला आहे. अनेक गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

मात्र तालुक्यातील अकार्यक्षम नेतृत्वामुळे तालुका दुष्काळी जाहीर झालेला नाही, हे बागलाणच्या जनतेचे दुर्दैव असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष केशव मांडवडे, तालुका कार्याध्यक्ष संजय पवार व शहराध्यक्ष साहेबराव सोनवणे यांनी करीत तालुका दुष्काळी जाहीर व्हावा यासाठी लवकरच माजी आमदार दीपिका चव्हाण, संजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले. (Keshav Mandwade statement Baglan out of drought list due to ineffective leadership Nashik Political News)

श्री.मांडवडे म्हणाले, जिल्ह्यात बागलाणसह जवळपास सर्वच तालुक्यात यंदा अत्यल्प पाऊस असताना विद्यमान शिंदे सरकारने राज्यात भाजप, शिंदे आण अजित पवार गटाच्याच ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करून दुष्काळग्रस्त जनतेच्या जखमेवर मीठ चोळले आहे.

जिल्ह्यात मालेगाव (पालकमंत्री दादा भुसे, शिंदे गट), येवला (मंत्री छगन भूजबळ, अजित पवार गट) व सिन्नर (माणिकराव कोकाटे, अजित पवार गट) हे तीन तालुकेच दुष्काळी जाहीर झाले आहेत.

त्यामुळे जिल्ह्यात फक्त मंत्र्यांच्याच तालुक्यात दुष्काळ आहे का? बागलाण तालुका नेहमीच अवर्षण प्रवण क्षेत्रात मोडणारा तालुका असून यंदा अत्यल्प पावसामुळे शेती व्यवसायाचे नुकसान झाले आहे.

शेती उत्पादनात ५० टक्के घट झाली आहे. भीषण पाणीटंचाईमुळे तालुक्यातील श्रीपुरवडे, सारदे, रातीर व बहिराणे गावात टँकरने पाणीपुरवठा सुरू असून वरचे टेंभे, टिंघरी, बोढरी, आखतवाडे व चौगाव या गावांनी टँकरचे प्रस्ताव दिले आहेत.

अशा भीषण परिस्थितीत राज्य सरकारने दुष्काळी जाहीर करताना दुजाभाव केला असून पालकमंत्री भुसे व मंत्री भूजबळ यांना जिल्ह्यातील इतर दुष्काळग्रस्त तालुक्यांचा विसर का पडला किंवा हे मंत्री फक्त त्यांच्याच मतदारसंघाचे आहेत का ? असे प्रश्न जनतेमधून उपस्थित केले जात आहेत.

बागलाण तालुक्यातील अनेक गावांमध्ये २१ दिवसांपेक्षा जास्त दिवस पावसाचा खंड पडूनही दुष्काळी ४० तालुक्यांमध्ये तालुक्याचा समावेश नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.

Drought
Karnataka Politics : कर्नाटकातील काँग्रेस सरकार कोसळणार? मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले, पाच वर्षे मीच..

तालुक्यात दुष्काळी उपाययोजना व्हाव्यात, यासाठी लवकरच माजी आमदार दीपिका चव्हाण व संजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आम्ही शिष्टमंडळासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आग्रही मागणी करणार असल्याचेही तालुकाध्यक्ष श्री.मांडवडे यांनी स्पष्ट केले.

यावेळी तालुका कार्याध्यक्ष संजय पवार, शहराध्यक्ष साहेबराव सोनवणे, शहर कार्याध्यक्ष छोटू सोनवणे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष टोनी मोरे आदी उपस्थित होते.

निष्क्रीय नेतृत्व

राज्यात भाजपची सत्ता असताना तालुक्यातील भाजपच्या विद्यमान आमदारांना तालुका दुष्काळी जाहीर करून घेता आला असता. मात्र प्रशासकीय कामांचा अभ्यास नसलेले निष्क्रिय लोकप्रतिनिधी निवडून दिल्यामुळे तालुक्याचे अतोनात नुकसान होत आहे.

माजी आमदार संजय चव्हाण, माजी आमदार दीपिका चव्हाण यांनी त्यांच्या कार्यकाळात आपले राजकीय वजन वापरून तालुका दोन वेळा दुष्काळी जाहीर घेतल्याने त्यावेळी शेतकऱ्‍यांसह जनतेला दिलासा मिळाला होता.

मात्र विद्यमान लोकप्रतिनिधी तालुक्यातील जनतेचे प्रश्न व समस्या सोडविण्यास सातत्याने अपयशी ठरत असून त्यांचा ताबा ठेकेदारांनी घेतला असल्याचे आरोप यांनी करण्यात आला.

Drought
Konkan Politics : सर्वस्व पणाला लावून भाजपसाठी काम करा; माजी खासदार नीलेश राणेंचं कार्यकर्त्यांना आवाहन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.