येवला : कांदा... आख्या महाराष्ट्राचे राजकारण हलवणारा हाच तो पठ्ठ्या! या व कांद्याशी संबंधित भन्नाट प्रतिक्रिया व्यक्त करून शेतकरी व शेतकरी पुत्रांनी दिंडोरीसह राज्याच्या निकालावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. दिंडोरी मतदारसंघातील तालुके कांदा उत्पादकांचे असल्याने शेतकऱ्यांच्या रोषाचा मोठा फटका भाजपला बसला आणि २० वर्षानंतर हा मतदारसंघ भाजपच्या हातून निसटला आहे. (Nashik Lok Sabha Election)
गेल्या दोन-तीन वर्षात केंद्र सरकारचे कांदा निर्यात धोरण शेतकऱ्यांच्या मुळावर उठत आहे. कांद्याला भाव वाढले की केंद्र सरकार निर्यात बंद करते किंवा निर्यात मूल्य वाढवते. परिणामी, भाव पडतात. यामुळे येवला, निफाड, चांदवड, दिंडोरी, नांदगाव, कळवण या भागातील शेतकऱ्यांना करोडो रुपयांचा फटका बसला आहे.
एवढेच नव्हे तर मागील तीन-चार महिन्यांत निर्यातबंदीचा सर्वाधिक फटका बसल्याने शेतकऱ्यांतून भाजपविषयी अगोदरच संताप व्यक्त होत होता, याची साक्ष निवडणुकीत दिसली. त्यातच नाफेडची कांदा खरेदी आणि निर्यातबंदीच्या निर्णयावर केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांनी कधी फोनवर तर कधी शेतकऱ्यांसमोर विरोधाच्या प्रतिक्रिया दिल्याने शेतकरी अधिकच दुखावला गेला होता. (latest marathi news)
म्हणूनच प्रचारात देखील सुरुवातीपासून भाजपला रोष व्यक्त करावा लागला. अनेक गावात तर शेतकऱ्यांनी सभा देखील होऊ दिल्या नाहीत. विशेष म्हणजे सोशल मीडियातून याची जोरदार चर्चा झाली होती.
या सर्व नाराजीचा फटका बसणार याची खात्री खुद्द भाजपवासीयांनाही झाल्याने अनेक जण खासगीत कांदा रडवणार हे मान्य करत होते आणि निकालाने ते सिद्धही केले आहे. याच निकालामुळे आज शेतकरी पुत्रांनी सोशल मीडियावर तसेच चर्चेतूनही भन्नाट प्रतिक्रिया व्यक्त करत शेतकऱ्यांच्या नादी लागणे सोपे नाही हा संदेश दिला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.