नाशिक : राज्यात सध्या सत्तेवर असलेले महायुती तसेच विरोधक असलेले महाविकास आघाडीतील पक्षांबाबत जनतेमध्ये नाराजी आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आपण जनतेची अपेक्षापूर्ती करताना आगामी विधानसभा निवडणुकीत विजयाची संधी उपलब्ध आहे, असे म्हणत पक्ष प्रमुख राज ठाकरे यांनी पदाधिकारी, उमेदवारांना प्रोत्साहित केले. ( Raj Thackeray statement of People are upset with Maha Aghadi Mahayuti you have chance to win )
नाशिक जिल्हा दौऱ्यावर असलेल्या मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी (ता.६) हॉटेल एसएसके सॉलिटीअर येथे बैठक घेताना पदाधिकारी, व विधानसभा निवडणुकीस इच्छुक उमेदवारांसोबत संवाद साधला. याप्रसंगी माजी महापौर अशोक मुर्तडक, ॲड. रतनकुमार इचम, माजी नगरसेवक सलीम शेख, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, दिलीप दातीर, सुजाता डेरे, सत्यम खंडाळे आदी उपस्थित होते. (latest marathi news)
मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत दुपारी बारापासून बैठकीला सुरुवात झाली. उत्तर महाराष्ट्र स्तरावरील आढावा घेताना त्यांनी पदाधिकारी व इच्छुकांना आवश्यक सूचना केल्या. यावेळी विभागातून उमेदवार आलेले होते. टप्याटप्याने श्री.ठाकरे यांनी पदाधिकारी, इच्छूकांना बोलवून त्यांच्यासोबत संवाद साधला. प्रसाद सानप यांनी नाशिकच्या वेगवेगळ्या आठ समस्यांवर आधारित मोहिमेचा शुभारंभ श्री. ठाकरे यांच्या उपस्थितीत केला. मनसे प्रमुख राज ठाकरे यांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी झाली होती.
माध्यमांपासून दूर
नाशिक दौऱ्यावर राज ठाकरे माध्यमांसोबत संवाद साधतील अशी अपेक्षा होती. मात्र, संवाद कार्यक्रम संपल्यानंतर ते निघून गेल्याने त्यांनी माध्यमांपासून दूर राहाणेच पसंत केले. पदाधिकारी, इच्छूकांच्या बैठकीस छायाचित्र, चित्रीकरणासाठी काही मिनिटांसाठी प्रवेश दिला. मात्र, बैठकीला प्रतिनिधींना बसू दिले नाही.