Ranji Trophy: नाशिकमध्ये 7 वर्षांनंतर होणार रणजीचे सामने! महाराष्ट्र-वडोदरामध्ये जानेवारीत लढत; नायडू करंडक स्पर्धा नोव्‍हेंबरमध्ये

Latest Cricket News : भारतीय नियामक मंडळ (बीसीसीआय) च्‍या रणजी स्‍पर्धेतील महाराष्ट्राचा वडोदराविरुद्ध सामना २३ ते २६ जानेवारी २०२५ दरम्‍यान हुतात्‍मा अनंत कान्‍हेरे मैदानावर खेळविला जाईल.
ranji trophy
ranji trophyesakal
Updated on

नाशिक : क्रिकेट स्‍पर्धेचा थरार अनुभवण्याची नाशिककर क्रीडाप्रेमींची प्रतीक्षा आता संपणार आहे. डिसेंबर २०१८ नंतर तब्‍बल सात वर्षांनी नाशिकमध्ये रणजी स्‍पर्धेतील सामना खेळविला जाणार आहे. भारतीय नियामक मंडळ (बीसीसीआय) च्‍या रणजी स्‍पर्धेतील महाराष्ट्राचा वडोदराविरुद्ध सामना २३ ते २६ जानेवारी २०२५ दरम्‍यान हुतात्‍मा अनंत कान्‍हेरे मैदानावर खेळविला जाईल. तत्‍पूर्वी सी. के. नायडू करंडक क्रिकेट स्‍पर्धेत महाराष्ट्र विरुद्ध केरळची लढत या मैदानावर होईल. (Ranji matches to held in city after 7 years)

दोन महत्त्वाच्‍या सामन्‍यांच्‍या आयोजनासाठी ‘बीसीसीआय’ने नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनवर जबाबदारी सोपविली आहे. त्‍यामुळे क्रीडाप्रेमींना सामन्‍यांचा थरार जवळून अनुभवण्याची संधी उपलब्‍ध होणार आहे. २३ वर्षांखालील वयोगटाचा सी. के. नायडू करंडक स्‍पर्धेचा महाराष्ट्र विरुद्ध केरळचा चारदिवसीय सामना ८ ते ११ नोव्‍हेंबरदरम्‍यान खेळविला जाईल.

तर रणजी स्‍पर्धेत महाराष्ट्र विरुद्ध वडोदराचा सामना २३ ते २६ जानेवारी २०२५ ला नूतनीकरण केलेल्‍या हुतात्‍मा अनंत कान्‍हेरे मैदानावर पार पडेल. अंशुमन गायकवाडपासून पांडुरंग साळगावकर, किरण मोरे, सुरेंद्र भावे, सुलक्षण कुलकर्णी यांसारख्या माजी खेळाडूंनी नाशिकमधील रणजी सामन्यांना संघ व्यवस्थापक ते प्रेक्षकाच्या भूमिकेत हजेरी लावली आहे.

महाराष्ट्र असोसिएशनचे माजी अध्यक्ष अजय शिर्के यांनी जवळजवळ सर्वच रणजी सामन्यांना हजेरी लावली. कर्नाटकचा माजी खेळाडू ए. व्ही. जयप्रकाशपासून पी. एस. गोडबोले, एस. रवी ते सध्याच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांत दिसणारे अनिल चौधरी, जे. मदनगोपाल यांच्यापर्यंत अनेक नामांकित क्रिकेट पंचांनी रणजी सामन्यात भूमिका बजावली आहे. जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष धनपाल शहा यांच्या नेतृत्वाखाली सचिव समीर रकटे, कार्यकारिणी सदस्‍य संयोजन करत आहेत.

१९५७ मध्ये पहिला रणजी सामना

नाशिकमध्ये बापू नाडकर्णींच्या नेतृत्वाखाली १९५७ मध्ये पहिला रणजी सामना खेळविला गेला. त्यानंतर १९८२ पर्यंत आणखी चार सामने झाले. हे पाचही सामने पोलिस कवायत मैदानावर खेळविले गेले. १९७४ च्या मॅटिंगच्या खेळपट्टीवर झालेल्या रणजी सामन्यात महाराष्ट्राचा जलदगती गोलंदाज पांडुरंग साळगावकर यांच्या गोलंदाजीवर दिग्‍गज भारतीय फलंदाज सुनील गावस्कर जायबंदी झाला होता.

यामुळे नंतरच्या कसोटी व पुढील जवळपास चार वर्षे त्यांची नेतृत्वाची संधी हुकली. त्यानंतर नाशिकला रणजी सामने आयोजनाची संधी मिळणेही बंद झाले. तब्बल २३ वर्षांच्या खंडानंतर धनपाल शहा यांच्या नेतृत्वाखाली हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर जिल्हा क्रिकेट संघटनेने तयार केलेल्या हिरवळीच्या खेळपट्टीवर रणजी सामन्याचे आयोजन होऊ लागले. डिसेंबर २००५ मध्ये महाराष्ट्र विरुद्ध तमिळनाडू ही लढत क्रीडाप्रेमींनी अनुभवली. डिसेंबर २०१८ पर्यंत एकूण दहा सामन्यांच्या नियोजनाचा धडाका जिल्‍हा संघटनेने लावला.

ranji trophy
Russell, Pooran, Hetmyer यांची श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेतून माघार; तर १७ वर्षीय खेळाडूला संघात स्थान

रोहित शर्मा, मुरली विजयला मैदानावर मिळाली ‘गुड न्‍यूज’

अलीकडील काळात अनेक दिग्गज खेळाडूंनी नाशिकला आपल्या कौशल्यांची चुणूक दाखविली. रोहित शर्मा, मुरली विजय या दोघांनाही भारतीय संघातील समावेशाची खूशखबर हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावरील सामना खेळत असताना मिळाली.

महाराष्ट्राच्या हृषीकेश कानिटकरपासून सौराष्ट्रच्या जयदेव उनाडकट तसेच दिनेश कार्तिक, मुनाफ पटेल, बालाजी, आकाश चोप्रा, कुलदीप यादव, नीलेश कुलकर्णी, पार्थिव पटेल, अभिनव मुकुंद, उमेश यादव, इरफान पठाण, एस. श्रीराम, सुरेश रैना, अजित आगरकर, केदार जाधव आदींनी हे मैदान गाजविले आहे.

हुतात्‍मा अनंत कान्‍हेरे मैदानावर झालेल्‍या लढती-

तारीख.. विरुद्ध संघ.. सामन्‍याचा निकाल

१७ ते २० डिसेंबर २००५ तमिळनाडू महाराष्ट्र ९ गडी राखून विजय

२ ते ५ जानेवारी २००७ गुजरात अनिर्णीत (महाराष्ट्र पहिल्या डावात आघाडीने विजयी)

१० ते १३ जानेवारी २००७ मुंबई १५४ धावा व एक डावाने मुंबई विजयी

३ ते ६ नोव्हेंबर २००८ तमिळनाडू अनिर्णीत (तमिळनाडू पहिल्या डावात आघाडीने विजयी)

१० ते १३ नोव्हेंबर २००८ आंध्रप्रदेश अनिर्णीत (महाराष्ट्र पहिल्या डावात आघाडीने विजयी)

१० ते १३ नोव्हेंबर २०१० विदर्भ महाराष्ट्र दहा गडी राखून विजयी

१५ ते १८ डिसेंबर २०१० राजस्थान अनिर्णीत (राजस्थान पहिल्या डावात आघाडीने विजयी)

१७ ते २० नोव्हेंबर २०११ झारखंड महाराष्ट्र नऊ गडी राखून विजयी

७ ते १० डिसेंबर २०१६ उत्तर प्रदेश अनिर्णीत (उत्तर प्रदेश पहिल्या डावात आघाडीने विजयी)

१४ ते १७ डिसेंबर २०१८ सौराष्ट्र सौराष्ट्र पाच गडी राखून विजयी

मैदानावर विक्रमांची नोंद..

- विजय झोलने नाबाद ४५१ ही भारतीय मैदानावरील सर्वोच्च वैयक्तिक विक्रमी धावसंख्या १९ वर्षांखालील कूचबिहारी करंडक स्‍पर्धेत ११ डिसेंबर २०१२ ला केली.

- गोलंदाजीत एकमेव हॅट्‍ट्रिक सौराष्ट्रच्या धर्मेंद्र जडेजा याने २०१८ मध्ये नोंदविली.

- कान्हेरे मैदानावर आकाश चोप्रा, अभिनव मुकुंद यांच्या नाबाद त्रिशतकांसह मुरली विजयचे द्विशतक

- विविध संघांच्या फलंदाजांनी एकूण १९ शतके मैदानावर झळकावली.

- नोव्हेंबर २००८ च्या सामन्यात तमिळनाडूतर्फे मुरली विजय, अभिनव मुकुंदने ४६२ धावांची सलामीची भागीदारी केली.

- गोलंदाजीत एका डावात पाच बळी घेण्याची कामगिरी महाराष्ट्राच्या समद फल्लाह, अनुपम संकलेचाने दोन दोनदा, नीलेश कुलकर्णी, धर्मेंद्र जडेजा, अजित आगरकरसह एकूण आठ गोलंदाजांनी दहावेळा केली.

ranji trophy
चलाख, Rishabh Pant! वर्ल्ड कप फायनलमध्ये लढवलेली शक्कल रोहित शर्माने सांगून टाकली Video

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.