Ajit Pawar
Ajit pawarsakal

Ajit Pawar : नेत्यांनी बोलताना भान ठेवावे; वाचाळवीरांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कानपिचक्या

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या बाबतीत शिवसेनेचे नेते आमदार संजय गायकवाड आणि भाजपचे नेते अनिल बोंडे यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानावरून राजकीय वाद सुरू झाला
Published on

बुलडाणा : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या बाबतीत शिवसेनेचे नेते आमदार संजय गायकवाड आणि भाजपचे नेते अनिल बोंडे यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानावरून राजकीय वाद सुरू झाला असतानाच येथे आयोजित महिला मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाचाळ नेत्यांना संयमाचा सल्ला दिला आहे.

‘‘आरोप करताना परिस्थितीचे भान ठेवावे. साध्या आणि सुसंस्कृत भाषेत उत्तर द्यावे. राग आम्हालाही येतो; परंतु तो व्यक्त करण्याची पद्धत चांगली असली पाहिजे. वरिष्ठ नेते किंवा सरकार अडचणीत येईल अशी भाषा टाळली पाहिजे,’’ असे पवार म्हणाले. ‘मुख्यमंत्री- लाडकी बहीण योजने’अंतर्गत महिलांचा मेळावा तसेच लाभार्थी सन्मानानिमित्त शारदा ज्ञानपीठ मैदानावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार संजय गायकवाड होते.

‘‘मुख्यमंत्री-लाडकी बहीण योजना अत्यंत चांगल्या पद्धतीने राबविली जात आहे. त्याचा ६० ते ७० टक्के महिलांना लाभही मिळाला आहे. ही लोकोपयोगी योजना सुरू ठेवायची असेल तर आम्हाला साथ द्या,’’ असे आवाहन उपमुख्यमंत्री पवार यांनी केले.

‘‘जनतेसाठी वीजबिल माफी, मोफत सिलिंडर अशा योजना सरकार आणत आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी तसेच त्यांची सुरक्षा व शिक्षणासाठी सरकार पुढाकार घेत आहे,’’ असेही ते म्हणाले. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,

पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यासह खासदार प्रतापराव जाधव, डॉ. राजेंद्र शिंगणे, किरण सरनाईक, आमदार डॉ. संजय कुटे, आमदार संजय रायमुलकर, आमदार श्वेता महाले, आमदार आकाश फुंडकर, चंद्रकांत पाटील, माजी आमदार चैनसुख संचेती आदी उपस्थित होते.

निधीसाठी दिल्लीला जातो ः मुख्यमंत्री शिंदे

‘‘तुम्ही लाडक्या बहिणी आम्हाला जेवढी ताकद द्याल, तेवढी योजनेची रक्कम वाढविली जाईल,’’ असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मेळाव्यात बोलताना दिले. महिलांशी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘मी दिल्लीला जातो तो निधी खेचून आणण्यासाठी.

मला मुख्यमंत्री करा असे लोटांगण घालण्यासाठी दिल्लीला जात नाही. जोपर्यंत सूर्य आणि चंद्र राहतील तोपर्यंत आरक्षण कायम राहील. येत्या निवडणुकीत सावित्रीच्या लेकी विरोधकांना योग्य धडा शिकवतील. शासनाच्या योजना राजकीय लाभासाठी नसून त्या जनतेच्या सेवा व सुविधेसाठी आहेत.’’

ज्या भावाच्या पाठीशी एवढ्या मोठ्या संख्येने भगिनी असतील, त्या भावाचे कुणीही काही वाकडे करू शकणार नाही. शासनाचा एक कोटी महिलांना ‘लखपती दीदी’ बनविण्याचा मानस आहे. लाडकी बहीण योजनेचे सर्व पैसे महिलांना मिळतील.

-देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.