Crop Damage : डोळ्यांतून कोसळतो आता परतीचा पाऊस ...खरीप पिकांचे नुकसान; जलालखेडा परिसरात पावसाचे थैमान

Crop Damage : जलालखेडा परिसरात परतीच्या पावसाने खरिप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीन, उडीद, मुंग यांसारख्या पिकांचे ८०-१००% नुकसान झाले आहे, तर कापसाचे बोंडे सडत आहेत.
Crop Damage
Crop Damagesakal
Updated on

जलालखेडा : नरखेड तालुक्यात या पावसळ्यात पाऊस जरी सरासरी एवढाच पडला असला तरी मोठ्या प्रमाणात झडीचे व ढगाळ वातावरण राहिल्यामुळे सर्वच प्रकारच्या पिकांचे नुकसान झाले. यात सोयाबीन, मुंग, उडीद या पिकाचे, तर संत्रा व मोसंबी फळपिकांचे देखील नुकसान झाले. याचा फटका कापसाला देखील बसला. पण यातून सावरत शेतकऱ्यांनी कापूस वाचविण्यासाठी बराच खर्च देखील केला.

पण आता परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. एकीकडे या पाण्याने रब्बी पिकला व विहिरींना लाभ होणार असला तरी मात्र दुसरीकडे खरिप हंगामाच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे चित्र आहे.

नरखेड तालुक्यात यंदा पावसाळ्यात पावसाने उशीरा आगमन केले. त्याचबरोबर यंदा पाऊस चांगल्या प्रमाणात, पण अंतराने पडला. आधीच्या पावसाने पिकाचे नुकसान होऊन सोयाबीनचे १०० टक्के नुकसान झाले आहे. रविवारी(ता.१३) परतीच्या पावसाने जोरदार आगमन केले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्येत वाढ पडली. सद्या सुरू असलेला पाऊस हा खरिपातील पिकासाठी पोषक नव्हे तर मारक ठरत आहे.

परतीच्या पावसाने चांगलाच जोर धरला आहे. खरिपातील कोरडवाहू शेतीतील कापूस फुटत आहे व आता तो ओला झाला आहे. बोंडे काळी पडत आहेत. आधीच या पावसामुळे कापसाचा दर्जा घसरला असताना पुन्हा या पावसामुळे कापसाचे नुकसान होत असल्याने हा कापूस शेतकऱ्यांना मातीमोल भावात विक्री करावी लागणार आहे. त्यामुळे बाजारभावात नुकसान सोसावे लागणार असल्याचे चित्र आहे.

सोयाबीन तर होणे नाही, पण त्याची कापणी करून काही तरी होईल व गुरांना कुटार तरी या आशेने शेतकऱ्यांनी सोयाबीनची कापणी केली आहे, तर काही वाळून उभ्या आहेत. कुठे गंजी देखील लागली आहे. पण मागील सहा दिवसांपासून होत असलेल्या अधून मधून पावसामुळे कापणीचा खर्चही शेतकऱ्यांवर बसणार आहे. तसेच सोयबीनच्या काढणीच्या कामात व्यस्त असल्याने ट्रॅक्टर मळणीयंत्र शेतात नेणे कठीण झाले आहे.

पाण्‍याचा निचरा होणे गरजेचे

खरिपांच्या काढणीबरोबर काही रब्बीच्या हंगामाच्या मशागतीच्या तयारीला लागला आहे. परंतु पावसामुळे मशागत लांबणीवर पडल्याने गहू, हरभरा या पिकांची पेरणी लाबणीवर पडणार असल्याचे चित्र आहे. नरखेड तालुक्यात कपाशी हे मुख्य पीक असल्याने परतीच्या पावसाचा जोर अधिक आहे. यामुळे कपाशीला लागलेली बोंडे झडत आहे. काही ठिकाणी बोंडे फुटून त्यावरील कापूस ओला झाल्याने कपाशीचेही नुकसान झाले आहे.

अद्यापही अनेक शेतांमध्ये पावसाचे पाणी साचले आहे. सद्या सुरू असलेला पाऊस धोकादायक आहे. त्यावर उपाय म्हणजे शेतकऱ्यांनी शेतात पाणी साचू न देता त्याचा निचरा लागलीच होणे गरजेचे असल्याचे कृषी विभागाने सांगितले. पाऊस अति होत असल्याने शेतातील पिकांचे नुकसान होत आहे. पावसाची उघडीप पडली तर पिके परिपक्व होतील.

कृषी विभागाचे आवाहन

नरखेड तालुक्यात खरिपाचा पेरा ४७ हजार हेक्‍टरवर झाला आहे. मात्र, पाऊस विविध रोगांमुळे १३ हजार हेक्‍टरवरील सोयाबीन पिकांचे ८० ते १०० टक्‍क्‍यांवर नुकसान झाले आहे. उडीद, मूग हातचे गेले आहे. कपाशीला चांगली बोंडे फुटली आहेत. मात्र, अति पावसाने बोंडे सडत आहेत. या परिस्थितीत कपाशीचे उत्पादन अधिक येण्याची शक्‍यता कमीच आहे. बोंडे सडू नयेत, यासाठी शेतकऱ्यांनी शेतात साचलेले पाणी काढून टाकण्यासाठी उपाययोजना केल्या तरच कपाशीचे पिके टिकतील असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.