Nagpur Monsoon : परतीच्या पावसाचा दणका,शहरात दिवसभर सरींवर सरी; आणखी तीन दिवस यलो अलर्ट

Nagpur Monsoon : परतीच्या पावसाने नागपूर शहरात जोरदार सरी कोसळल्या. हवामान विभागाने पुढील तीन दिवसांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.
Nagpur Monsoon
Nagpur Monsoonsakal
Updated on

नागपूर : देशातून नैऋत्य मोसमी वारे अर्थात मॉन्सूनची परतीच्या दिशेने वाटचाल सुरू असतानाच मंगळवारी पावसाने शहरात दमदार हजेरी लावली. सकाळी सरींवर सरी कोसल्यानंतर दुपारी जोरदार बरसला.

त्यामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी तुंबून नागपूरकरांची तारांबळ उडाली. पावसामुळे तापमानात घट होऊन वातावरणही आल्हाददायक झाले. प्रादेशिक हवामान विभागाने आणखी दोन-तीन दिवस यलो अलर्ट जारी केल्याने नागपूरसह विदर्भात ‘वीकेंड’पर्यंत पाऊस व ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.

मध्य भारतातील विदर्भ, महाराष्ट्र व मध्यप्रदेशसह आजूबाजूच्या परिसरात कमी दाबाचे क्षेत्र (चक्रीय स्थिती) तयार झाल्याने मॉन्सून पुन्हा सक्रीय झाला आहे. हवामान विभागाने वर्तविलेला अंदाज खरा ठरवत आज वरुणराजाने अपेक्षेप्रमाणे उपराजधानीत सर्वत्र दमदार हजेरी लावली. सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली.

सकाळी हलक्या सरी बरसल्यानंतर दुपारी दोनच्या सुमारास अर्धा ते पाऊण तास बहुतांश भागांत जोरधारा कोसळल्या. पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. अनेकांना आडोशाचा आधार घ्यावा लागला. रस्त्यांवरून पाण्याचे लोट वाहिले. ठिकठिकाणी सखल भागांमध्ये डबके साचले होते. बऱ्याच दिवसांनंतर छत्र्या व रेनकोटही बाहेर पडले.

वातावरण झाले गारेगार

पावसामुळे नागपूरच्या कमाल तापमानात ८.२ अंशांची घसरण होऊन पारा ३४.८ वरून २६.६ अंशांवर आला. त्यामुळे वातावरणही गारेगार व आल्हाददायक होऊन नागपूरकरांना उकाड्यापासून सुखद दिलासा मिळाला. इतरही जिल्ह्यांतील पाऱ्यात लक्षणीय घट झाल्याचे दिसून आले.

एक हजार मिमीच्या वर पाऊस

शहरात सायंकाळी साडेपाचपर्यंत २३ मिमी.पावसाची नोंद झाली. नागपुरात १ जूनपासून आतापर्यंत १०२९ मिमी पाऊस झाला आहे. हवामान विभागाचा आणखी दोन-तीन दिवस यलो अलर्टमुळे वरुणराजाचा मुक्काम आणखी काही दिवस अपेक्षित आहे. विदर्भात भंडारा (३९ मिमी), ब्रह्मपुरी (३५.६ मिमी) व वर्धा (३० मिमी)येथेही जोरदार पाऊस झाल्याचे वृत्त आहे.

पावसाळ्यातील शेवटचा पाऊस

मॉन्सूनने राजस्थानसह गुजरात व महाराष्ट्राच्या काही भागांतून निरोप घेतला असून, हळूहळू इतरही राज्यातून ‘एक्झिट’ घेत आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यातील हा शेवटचा पाऊस मानला जात आहे. चंद्रपूरचे हवामानतज्ज्ञ प्रा. सुरेश चोपणे यांनीही हा परतीचा पाऊस असल्याचे स्पष्ट केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.