Crop Damage : खिंडसी जलाशय ‘ओव्‍हरफ्‍लो’, शेकडो एकर शेती पाण्याखाली

Crop Damage : खिंडसी जलाशयाच्या ओव्हरफ्लोमुळे शेकडो एकर शेती पाण्याखाली गेल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी प्रशासनास दिली आहे, अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे.
Crop Damage
Crop Damage sakal
Updated on

रामटेक : खिंडसी जलाशय ‘ओव्हरफ्लो’ झाल्यामुळे व त्याच्या पाणी पातळीत सततच्या येव्यामुळे ‘बॅकवॉटर'' मध्ये वाढ झाली. यामुळे शेकडो एकर शेती पाण्याखाली आल्याने पिकांचे नुकसान, वैरणाची समस्या, रस्त्यांची समस्या, मासेमारी करण्यात येणारी समस्या व विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी येणारी अडचण यावर उपाययोजना करावी, अशा आशयाचे निवेदन शेतकरी बचाव संघर्ष समितीचे मुख्य संयोजक व कृषी उत्पन्न बाजार समिती रामटेकचे सभापती सचिन किरपान यांच्या नेतृत्वात पीडित शेतकऱ्यांनी मंगळवारी (ता.१७) उपविभागीय अधिकारी (महसूल) प्रियेश महाजन व तहसीलदार रमेश कोळपे यांना सादर केले.

गेल्या काही वर्षांपासून व यावर्षीसुध्दा पावसाळयात खिंडसी जलाशयाच्या ‘बॅक वॉटर’मध्ये झालेल्या वाढीमुळे जलाशयाच्या परिसरातील कवडक, मुसेवाडी, सोनपूर, पिंडकापार, मांगली, गुडेगांव, मांद्री, पंचाळा, लोहारा, घोटी इत्यादी १० ते १२ गावांच्या शिवारातील सुमारे दोन हजार एकर शेतीत पाणी शिरले व साचून राहिले. खोलगट भागातील शेतीत ८ ते १० फूट पाणी साचलेले आहे.

सिंचन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी खिंडसी तलाव परिसरातील शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता, जमिनीचे मोजमाप न करता शेतकऱ्यांच्या मालकीच्या जमिनीवर खिंङसी तलावाची सिमांकन कक्षा निश्चित करून मनमर्जीने दगड गाडलेले आहेत. याप्रकरणी तातडीने चौकशी करून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्याऱ्यांवर त्वरित कारवाई करण्यात यावी, अशी त्रस्त शेतकऱ्यांची मागणी आहे. या सर्व समस्यां व मागण्यांवर प्रशासनाने तातडीने व कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अन्यथा आंदोलनात्मक पवित्रा घ्यावा लागेल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

निवेदन देतेवेळी सभापती सचिन किरपान यांच्यासह नकुल बरबटे, शिवाजी रामकेळकर, राजू हिवरकर, जयेंद्र मेश्राम, ज्ञानेश्वर नवघरे, मनोज नरूले, उमराव देशभ्रतार, आशिष बदन, दादुराव चापले, नारायन बंधाटे, विष्णू मौतकार, गंगाधर बोरीकर, सुधाकर बधन, बालचंद चनेकार, संजय वाघ, गजानन चकोले, पृथ्वीराज भवते, जयदेव बिसनेपार, श्रीराम बघेले, विलास दाबडदुबके, शिवानी मनघटे, परसराम मौतकर, अनिल झाडे, सदानंद राऊत यांच्यासह पीडित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या उद्भवल्या समस्या

  • शेतात जाणाऱ्या रस्त्यांवर साचले पाणी.

  • मजुरांची ने-आण करणे कठीण

  • खते, इतर साहित्य नेण्यासाठी रस्ताच नसल्याने बोटींचा वापर.

  • विद्युत ट्रांसफार्मर लागलेला परिसरसुद्धा पाण्यात बुडाला.

  • खंडित विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी बोटीचा वापर.

  • त्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंडही बसतो.

  • ‘बॅकवॉटर’ मुळे मुसेवाडीपर्यंतचे मोठे शिवार पाण्याखाली.

  • मासेमारांचा उदरनिर्वाह ठप्प.

  • शिवारातील चारा सडल्याने वैरणाची टंचाई.

  • बॅक वॉटरमुळे विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान.

ही आहे उपाययोजना

जलाशयाच्या एकूण साठवणूक क्षमतेच्या ५ फूट कमी पाण्याची साठवणूक केली, तरच आजूबाजूच्या बुडीत क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या मालकीच्या शेतजमिनीवर पिकांचे उत्पादन घेता येईल. त्यामुळे रामटेक तालुक्यातील १५ ते २० गावातील शेकडो भूमिहीन शेतकरी, शेतमजुरांना काम मिळेल व तालुक्यातील शेतमालाचे उत्पादन क्षेत्रही वाढेल.

मागील तीन वर्षांपासून खिंडसी जलाशयातील शेती करण्यासाठी लिलावात घेतलेली जमीन पाण्याखाली बुडून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून शासनाने जमा केलेली अंदाजे एक कोटी असलेली रक्कम संबंधित शेतकऱ्यांना त्वरित परत देण्यात यावी. शेतकऱ्यांचे कैवारी असण्याचा ढोल बडवणाऱ्या या सरकारने शेतकऱ्यांना त्यांनी भरलेले पैसे तातडीने परत करावे, अन्यथा याविरुद्ध आंदोलन करु.

-सचिन किरपान, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, रामटेक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.