Nana Patole : महाविकास आघाडी एकत्रित निवडणूक लढणार- नाना पटोले

कॉँग्रेस पक्ष संघटनेतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत प्रत्येक ठिकाणी संघटनात्मक चर्चा केली आहे.
Nana Patole
Nana PatoleSakal
Updated on

Nagpur News : कॉँग्रेस पक्ष संघटनेतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत प्रत्येक ठिकाणी संघटनात्मक चर्चा केली आहे. ज्या जागा कॉँग्रेसला सुटतील त्यावर आम्ही ताकदीने लढणार आहोत, असे सांगून काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी महाविकास आघाडीच्या नावावर विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

शिवसेना खासदार रवींद्र वायकर यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असताना मुंबई पोलिसांनी त्यांना क्लिनचीट देणे म्हणजे भाजपच्या वॉशिंग मशीनमधून आणखी एकाला स्वच्छ करून घेतल्याने आणखी एक उदाहरण आहे.

मोदी सरकार हे ‘ईडी’ व ‘सीबीआय’ या दोन कार्यकर्त्यांच्या मार्फत राजकारण कसे करते हे देशाने पाहिले आहे. अपवादात्मक स्थितीत अशी एखादीच घटना आपण समजू शकतो, पण अशी अनेक उदाहरणे घडत आहेत, वायकर त्यातीलच एक प्रकरण आहे.

लोकसभा निवडणुकीआधी पक्ष बदलून ते सत्ताधारी पक्षाबरोबर गेले तेव्हाच त्यांनी सांगितले होते. त्यामुळे मुंबई पोलिसांनी त्यांना क्लिनचीट देऊन फाइल बंद केली. यात नवल वाटण्यासारखे काही नाही, असे पटोले म्हणाले.

एकनाथ शिंदे हे मुठभर लोकांना मदत करणारे मुख्यमंत्री आहेत. खरी मॅच आता सुरु होणार असून त्यात जनता उत्तर देणार आहे. मुख्यमंत्र्यांचा हा आनंद क्षणभंगूर आहे. त्यांचा झेल जनताच घेणार आहे, असे नाना पटोले म्हणाले.

पुण्यात महिला वाहतूक पोलिसावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याच्या घटनेवर संताप व्यक्त करत पटोले म्हणाले की, राज्यात कायदा सुव्यवस्था कुठे राहिली आहे? महाराष्ट्र पोलिसच सुरक्षित नाहीत ही परिस्थिती आहे.

राज्याचे गृहमंत्री हे फक्त घोषणा करतात कृती मात्र काहीच नाही. जेलमधील आरोपींना व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते, ससून रुग्णालयात उपचाराच्या नावाखाली आरोपींना पंचतारांकित सुविधा दिली जाते.

नागपूरमध्येही मद्यधुंद महिला कारचालकाने दोन तरुणांना कारखाली चिरडले. ती केस कमजोर करण्यासाठी पोलिसांवर दबाव होता. त्यामुळे आरोपींना जामीन मिळाला. धनाढ्य घरातील आरोपींना कसलीच भीती राहिली नाही म्हणूनच महिला पोलिसाला जाळण्याच्या प्रयत्न करण्याची हिंमत होते, असे पटोले म्हणाले.

दीक्षाभूमीशी लोकांच्या भावना जुळलेल्या

दीक्षाभूमीशी कोट्यवधी लोकांच्या भावना जुळलेल्या आहेत. सरकार काही बांधकाम करत असेल आणि आस्था व जनभावनेला धक्का लागत असेल तर विरोध होणारच. जनभावना व आस्था यांचा ताळमेळ ठेवून काम करावे, पण सरकार आस्था व जनभावनेला किंमत देत नाही.

संसद परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिसूर्य महात्मा फुले यांचे पुतळे या सरकारने हटवून एका कोपऱ्यात बसवले. हे सरकार दीक्षाभूमीत काही चांगले करेल यावर लोकांचा विश्वासच नाही, म्हणून तो जनक्षोभ दिसून आला, असेही पटोले म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.