भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या नागपूरात आज (१६ एप्रिल) महाविकास आघाडीची 'वज्रमुठ'सभा होत आहे. यावेळी उद्धव ठाकरे गटाचे नेते नितीन देशमुख यांनी अनिल देशमुखांच्या चौकशीवरून थेट पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.
एका पोलिस अधिकाऱ्याच्या आरोपावरून माजी गृहमंत्र्यांना १४ महिने जेलमध्ये काढावे लागले होते. दरम्यान जम्मू काश्मिरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पंतप्रधान मोदींवर केलेल्या आरोपावरून नितीन देशमुखांनी भाजपला सवाल केला आहे.
नितीन देशमुख म्हणाले की, जेव्हा अनिल देशमुखांवर एका पोलिस अधिकाऱ्याने आरोप केले तेव्हा त्यांची ईडीमार्फत चौकशी करण्यात आली. आज माजी राज्यपालांनी देशाच्या मु्ख्यमंत्र्यांवर आरोप केले तुम्ही कोणती चौकशी लावता? हे फक्त महाराष्ट्र नाही तर संपूर्ण देश पाहतो आहे.
एका पोलिस अधिकाऱ्याच्या आरोपांवर तुम्हाी माजी गृहमंत्र्यांची ईडी चौकशी लावता, तर राज्यपालांनी जे आरोप केले त्याचं काय? हा प्रश्न सगळा महाराष्ट्र विचारतोय असेही नितीन देशमुख म्हणाले.
मलिकांनी मोदींवर काय आरोप केलेत?
फेब्रुवारी २०१९ मध्ये झालेल्या पुलवामा हल्ल्याच्यावेळी जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी नुकतेच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काश्मीरकडे दुर्लक्ष होते आणि येथील सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींकडे दुर्लक्ष केल्यानेच नंतर पूलवामा हल्ला झाला, असे जम्मू-काश्मीरचे अखेरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी ‘द वायर’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत केला . मोदींना भ्रष्टाचाराबाबत फारसा तिटकाराही नाही, असेही मलिक यांनी म्हटले आहे.
त्यांनी सांगितलं की, केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या ताफ्यावर झालेला हा हल्ला म्हणजे ‘सीआरपीएफ’ आणि केंद्रीय गृह मंत्रालय यांच्या ‘अकार्यक्षमता’ आणि ‘बेजबाबदारपणा’चा परिणाम होता. तसेच जवानांना हवाई मार्गाने नेण्याची ‘सीआरपीएफ’ने केलेली मागणी केंद्रीय गृह मंत्रालयाने फेटाळली होती, जवानांना नेण्याच्या मार्गावरही पुरेशी सुरक्षा तपासणी झाली नव्हती, असा दावा मलिक यांनी केला.
‘‘विशेष म्हणजे, पुलवामा हल्ल्यानंतर मोदी यांनी कॉर्बेट उद्यानाबाहेरून माझ्याशी संपर्क साधला त्यावेळी मी त्यांना त्रुटींची माहिती दिली होती. मात्र, त्यांनी मला याबाबत शांत बसण्यास सांगितले. नंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांनीही मला हेच सांगितले. सर्व खापर पाकिस्तानवर फोडण्याचा आणि घटनेचा राजकीय फायदा उठविण्याचा यामागील उद्देश असल्याचे मला समजून चुकले.’’ असेही मलिक म्हणाले होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.