Forests Minister Mungantiwar : वाघांचे हल्ले रोखण्यासाठी ‘एआय’चा वापर करु : वनमंत्री मुनगंटीवार

Forests Minister Mungantiwar : रामटेक तालुक्यात वाघांच्या हल्ल्यांच्या वाढत्या घटनांवर उपाययोजना म्हणून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. हल्ले थांबवण्यासाठी 'एआय' तंत्रज्ञानाचा वापर करणे, प्राथमिक प्रतिसाद दल स्थापन करणे आणि स्थानिक समित्यांची भूमिका वाढवण्याचे निर्देश दिले.
Forests Minister Mungantiwar
Forests Minister Mungantiwar sakal
Updated on

रामटेक : रामटेक तालुक्यातील झिंझेरिया, वडंबा व पारशिवनी तालुक्यातील परसोडी, बिटोलीसारख्या वन क्षेत्राला लागून असलेल्या गावांतील स्थानिक लोकांवर व जनावरांवर वाघाने हल्ले केल्याच्या घटना मागील काही महिन्यात घडल्या आहेत.

यामध्ये काही नागरिकांना जीवसुद्धा गमवावा लागला. या घटना घडू नये, यावर उपाययोजना करण्यासाठी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात वन व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.

रामटेक व पारशिवनी तालुक्यात मागील एक वर्षापासून जंगलालगतच्या गावांमध्ये वाघाच्या हल्ल्यात अनेक नागरिक व जनावरे जखमी किंवा मृत्यू झाल्याची अनेक प्रकरणे घडली. जंगली प्राणी व मानव संघर्ष वाढीला लागला आहे.

संतप्त नागरिकांनी नुकताच वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर हल्ला चढवून जखमी केल्याची घटना ताजी आहे. त्यामुळे या समस्येवर तोडगा काढून उपाययोजना करण्याबाबत रामटेकचे आमदार ॲड.आशिष जयस्वाल यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी चर्चा केली. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वनविभागासह इतरही विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. याला आ.आशिष जयस्वाल प्रामुख्याने उपस्थित होते.

अलीकडच्या काळात जंगलाशेजारील गावात वाघांचा व जंगली प्राण्यांचा वावर वाढल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत. नागपूर जिल्ह्यातील रामटेक व इतर वनक्षेत्रात जंगलात चरायला गेलेल्या पाळीव जनावरांसह गुराखी, शेतकरी, आदिवासी यांच्यावर हल्ले झाले आहेत. हे लक्षात घेता जंगलाचे असलेले क्षेत्र व या क्षेत्रात असलेल्या वाघांची संख्या तपासून घेतली पाहिजे.

जर संख्या अधिक झाली असेल तर तेथील वाघांना इतर ठिकाणी स्थलांतरीत करण्याचे निर्देश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज दिले. वनक्षेत्रात मोडणारी गावे व वनक्षेत्राच्या शेजारी असलेली गावे यांच्या सुरक्षिततेसाठी वन विभागा समवेत स्थानिक लोकप्रतिनिधीचा सहभाग असलेल्या समित्यांची भूमिका अधिक महत्वाची आहे.

जी गावे वनक्षेत्रात आहेत, त्या गावांना ‘चेन लिंक फेन्सिंग’ कशा पध्दतीने करता येईल, हे तपासून पहावे, यासाठी जिल्हा वार्षिक योजना, आदिवासी विभाग, वन विभाग आणि सीएसआर फंडच्या माध्यमातून प्रायोगिक पातळीवर एखाद्या गावाची निवड करुन नियोजन करण्याचे निर्देश मंत्री महोदयांनी दिले.

वाघाच्या हल्ल्यात पाळीव गाई व जनावरांचे जे जीव जातात त्याचे पंचनामे करण्यासाठी वन कर्मचाऱ्यांनी जर कसूर केला तर त्यांच्याविरुध्द कठोर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. या बैठकीला आमदार आशिष जयस्वाल, प्रधान मुख्य वनसंरक्षक शोमिता बिस्वास, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, जिल्हा पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, वन विभागातील वरिष्ठ अधिकारी विवेक खांडेकर, डॉ. प्रभुनाथ शुक्ल यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.

वनमंत्र्यांनी केलेल्या सूचना

  • प्रत्येक गावांमध्ये युवकांची निवड करुन प्राथमिक प्रतिसाद दल स्थापन करावे.

  • स्वसंरक्षणासह आपात्कालिन परिस्थितीत गावकऱ्यांची मदत करण्याचे प्रशिक्षण द्यावे.

  • त्यांना शॉक स्टिक, टॉर्चसारखी अत्यावश्यक साधने पुरवावी.

  • युवकांना मानधन तत्वावर नियुक्त कसे करता येईल.

  • त्या संबंधीचा प्रस्ताव तातडीने सादर करावा.

  • ''एआय’च्या माध्यमाचा उपयोग करावा.

  • भारतीय सैन्यदल व पोलिस अधीक्षकांकडून तंत्रज्ञानाची उपयोगिता पडताळून घ्यावी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.