Narendra Modi Wardha: मराठीतून भाषणाला सुरुवात...काँग्रेसने SC,ST,OBC यांना पुढं जाऊ दिलं नाही, PM मोदी वर्ध्यात काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विदर्भातील वर्ध्यात आयोजित राष्ट्रीय पीएम विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्ती सोहळ्यात भाषण केले. मराठीतून भाषणाची सुरुवात करत त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला नमस्कार केला आणि महात्मा गांधी व विनोबा भावेंच्या भूमीची आठवण करून दिली, जिथून गांधीजींनी अस्पृश्यतेविरोधात लढा दिला होता. मोदींनी या पवित्र भूमीवरून विश्वकर्मा योजनेच्या यशस्वीतेचं कौतुक करत परंपरागत कौशल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांवर भर दिला.
काँग्रेसवर टीका
मोदींनी आपल्या भाषणात काँग्रेसवर जोरदार टीका करत एससी, एसटी आणि ओबीसी समाजाला पुढे जाऊ दिले नसल्याचा आरोप केला. ते म्हणाले, “काँग्रेसने दुर्लक्षित केलेल्या विश्वकर्मा कारागिरांना आमच्या सरकारने प्राधान्य दिलं आहे. या योजनेच्या माध्यमातून अनेक कारागिरांना नवीन मशिनरी आणि कर्जपुरवठा करण्यात आला आहे, ज्यामुळे त्यांचं उत्पन्न वाढलं आहे.”
पीएम मित्रा पार्क: आर्थिक क्रांतीचं पाऊल
अमरावतीतील पीएम मित्रा पार्कच्या उभारणीसंदर्भात मोदींनी सांगितलं की, हा प्रकल्प विकसीत भारताच्या संकल्पनेला गती देणार आहे. त्यांनी नमूद केलं की, या टेक्स्टाईल पार्कमुळे 8 ते 10 हजार कोटींची गुंतवणूक होईल आणि हजारो रोजगारांची निर्मिती होईल. यामुळे कापसाला चांगला भाव मिळेल आणि शेतकऱ्यांचं आर्थिक स्थितीत सुधारणा होईल.
विश्वकर्मा योजनेचं उद्दिष्ट: सन्मान, सशक्तीकरण, समृद्धी
पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केलं की, विश्वकर्मा योजनेचं उद्दिष्ट सन्मान, सशक्तीकरण आणि समृद्धी हे आहे. योजनेअंतर्गत देशातील 700 पेक्षा अधिक जिल्हे आणि अडीच लाखांहून अधिक ग्रामपंचायतींनी अभियानाला गती दिली आहे. वर्षभरात 20 लाख लोक या योजनेत सहभागी झाले असून 8 लाख कारागीरांना कौशल्य प्रशिक्षण देण्यात आलं आहे. विशेषतः महाराष्ट्रात 7 हजार कारागिरांना प्रशिक्षण देण्यात आलं आहे आणि साडेसहा लाखांहून अधिक लोकांना आधुनिक उपकरणे उपलब्ध करून दिली आहेत.
मागासवर्गीय समाजाचं सक्षमीकरण
मोदींनी आपल्या भाषणात एससी, एसटी आणि ओबीसी समाजाच्या सक्षमीकरणावर जोर दिला. ते म्हणाले, “आमच्या सरकारने विश्वकर्मा समाजाला प्रोत्साहन देण्यासाठी पाऊल उचललं आहे. या योजनेचा सर्वाधिक फायदा एससी, एसटी आणि ओबीसी समाजातील कारागिरांना झाला आहे.” ते पुढे म्हणाले की, या समाजातील मंडळी केवळ कारागीर न राहता आता उद्योजक बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत.
विकासाचा मंत्र
पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणाचा शेवट करताना सांगितलं की, “महाराष्ट्रातील टेक्स्टाईल उद्योगाचं भवितव्य उज्ज्वल आहे. महाविकास आघाडीने या उद्योगाला दुर्लक्षित केलं असलं तरी, आमच्या सरकारच्या प्रयत्नांमुळे हा क्षेत्र अधिक प्रगती करत आहे.”
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.