विधानसभेच्या आगामी निवडणुकीत तिसरी आघाडी वगैरे काही नाही. परंतु निवडणूक लढवायची वेळच आली तर सर्व उमेदवार अपक्ष म्हणून उभे करू. हेही नाही ठरले तर राज्यभर पाडापाडी करणार असल्याचे विधान मराठा आरक्षणासाठी उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी केले.
शहरातील खासगी रुग्णालयात जररांगेंवर उपचार सुरू आहेत. त्यांनी बुधवारी माध्यमांशी संवाद साधला. तिसऱ्या आघाडीचे मुख्यमंत्री जरांगे पाटील असतील, असे वक्तव्य राजरत्न आंबेडकर यांनी केले होते. त्यावर जरांगे यांनी ही भूमिका स्पष्ट केली.
मला राजकारणात जायचे नसल्याचे स्पष्ट करत 'मी स्वार्थी नाही, पण समाजाच्या स्वार्थासाठी आपण काम करत आहे, अशी पुष्टीही त्यांनी जोडली. सध्या तब्येत बरी असून नारायण गडावर होणाऱ्या दसरा मेळाव्याच्या नियोजनासाठी गुरुवारी (ता.२) दुपारी बाराला अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे जाणार आहे. गडावर अठरापगड जातीच्या लोकांचा उत्सव असून तिथे मार्गदर्शनासाठी नाही तर भक्त म्हणून जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नारायण गडावर होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी सुमारे ५२ हजार स्वयंसेवक तयारीला लागले आहेत. गडाच्या ७१३ एकरचा परिसर असून १५ ते २० जेसीबीद्वारे साफसफाईची कामे अंतिम टप्प्यात आहे.
जेवण, पाणी, वैद्यकीय सुविधा, स्वच्छतागृह आदींची व्यवस्था तेथे असतील. "राज्यातील मराठ्यांनी पुन्हा एकदा एकत्र यावे. नेत्यांच्या मागे लागू नका. त्यांच्या प्रचाराला, सभेला पळू नका. अशा सामाजिक मेळाव्यात या," असे आवाहन जरांगे यांनी केले.
"आरक्षणाबाबत सरकारला आचारसंहितेपूर्वी सर्व निर्णय घ्यावेच लागतील, अन्यथा सगळे बिघडेल. सरकार 'आम्ही मोट बांधली' असा आव आणतेय. परंतु मराठ्यांनी डाव टाकला की, सरकारचा खेळ 'खल्लास' होईल," असा इशारा जरांगे यांनी दिला.
"भाजपमधील मराठा नेत्यांनो, तुमचे नेते देवेंद्र फडणवीस यांना समजून सांगा, तुम्ही आरक्षण द्या. मग मी राजकारणाचा एक शब्दही काढणार नाही. मला महायुती व महाआघाडीशी काही देणे-घेणे नाही," असेही ते म्हणाले.