esakal
esakal

Chhaya Kadam: 'बारदोवी' चित्रपटाची निर्मिती करणार छाया कदम , पण बारदोवी म्हणजे काय ठाऊक आहे? अर्थ वाचून चकीत व्हाल

Chhaya Kadam Talked On Bardovi: अभिनेत्री छाया कदम यांनी नुकतंच निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. त्या 'बारदोवी' चित्रपटाची निर्मिती करणार आहेत.
Published on

Chhaya Kadam: रंगभूमीपासून करिअरला सुरुवात करणाऱ्या अभिनेत्री छाया कदमने आता चित्रपटसृष्टीमध्ये चांगलीच भरारी घेतली आहे. मराठी चित्रपटांबरोबरच हिंदीतही त्यांनी दमदार कामगिरी केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या कान चित्रपट महोत्सवातील त्यांची कामगिरी सगळ्यांच्या कायम स्मरणात राहील अशीच आहे. अभिनय क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करता करता आता त्या 'बारदोवी' या हिंदी चित्रपटाच्या सहनिर्मात्या झाल्या आहेत. मानवी नातेसंबंध, रहस्यमय आणि अतर्क्य घटना असलेला हा चित्रपट आता प्रदर्शित होत आहे. त्यानिमित्त छाया कदम यांच्याशी साधलेला संवाद...

Q

तुम्ही वेगवेगळ्या भूमिकांतून नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन करत आला आहात. आता चित्रपट निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले आहे. चित्रपटाची निर्मिती करावी असा नेमका विचार तुमच्या मनात कसा आणि केव्हा आला?

A

आपण कधीकधी काही गोष्टी ठरवतो; पण काही कारणास्तव त्या गोष्टी योग्य वेळी पूर्ण होत नाहीत. कधीकधी न ठरवता काही गोष्टी जमून जातात. 'बारदोवी'बाबत तसंच झालं. एक चांगली टीम आणि चांगलं कथानक. मला आतापर्यंत या दोन गोष्टींसाठीच योग्य माणसं सापडली नाहीत. मात्र या दोन्ही गोष्टी या वेळेस जुळून आल्या म्हणून मी सहनिर्माती झाली आहे.

Q

कलाकार निवडणं दिग्दर्शकाचं काम असतं. 'बारदोवी'ची एक निर्माती म्हणून कलाकार निवडीमध्ये तुमचा कितपत सहभाग होता?

A

हे काम पूर्णतः चित्रपटाचा दिग्दर्शक करण चव्हाण आणि त्याच्या टीमने केलं आहे. त्यात मी कुठेही ढवळाढवळ केली नाही. ती खूप हुशार मुलं आहेत म्हणून मला ढवळाढवळ करायची गरजच वाटली नाही.

Q

'बारदोवी' चित्रपटाचा नेमका विषय काय आहे?

A

एक तर चित्रपटाचं नाव 'बारदोवी' असं आहे. मृत्यूनंतर आणि पुनर्जन्मच्या मधला काळ जो असतो त्याला 'बारदोवी' म्हणतात. यामध्ये तुम्हाला रोमांचक गोष्टी पाहायला मिळणार आहेत. आता काय होईल, मग पुढे काय होईल असे प्रश्न मनात उद्भवतील. मी पहिल्यांदाच या धाटणीचा चित्रपट करते आहे. एक कलाकार म्हणून मला नेहमी वेगवेगळं काही तरी करायला आवडतं. लोकांना माहीत आहे की रडायचे सीन्स असतील तर मी लगेच करू शकेन. पण त्यापेक्षा वेगळ्या भूमिका मी करू शकेन का?जेव्हा ‘नाही’ असं 'उत्तर' येतं, तर तशा भूमिका मला करून बघायच्या आहेत. त्याचाच हा प्रयत्न आहे. मी यामध्ये अक्का नावाची भूमिका साकारत आहे. ती अतिमहत्त्वाकांक्षी वृत्तीची बाई आहे. एखादी गोष्ट करायला ती कोणत्याही थराला जाऊ शकते. माझ्यासोबत चित्तरंजन गिरी होते. चित्तरंजन गिरीला दिग्दर्शक करणने घेतलं, तिथेच मला त्याने जिंकलं होतं. चित्तरंजन काय किंवा विराट मडके काय, या कलाकारांची फळी या चित्रपटामध्ये आहे. अक्का आणि या दोन कलाकारांभोवती या चित्रपटाचं कथानक फिरणारं आहे.

Q

महिलाप्रधान चित्रपटांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. महिला कलाकारांचेदेखील चित्रपट शंभर-दोनशे कोटी रुपयांचा व्यवसाय करीत आहेत. लेखकही उत्तम लिहीत आहेत. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?

A

मी खूप खुश आहे. असे चित्रपट यायला हवेत आणि आता आपल्याकडील अभिनेत्रींमध्ये ती ताकद आहे. तुम्ही कोणतीही व्यक्तिरेखा लिहा त्याला तेवढ्याच ताकदीने करणाऱ्या अभिनेत्री आपल्याकडे आहेत. असे अनेक चित्रपट लिहिले पाहिजेत असं मला वाटतं. आधी नायकच मुख्य भूमिकेत असायचे. हिरो आणि हिरोईनचे चित्रपट अधिक बनायचे. तो काळही चांगला होता; पण आता तो काळ गेला आणि आता हिरो ही महिलासुद्धा असते. जेव्हापासून नवीन पिढी चित्रपट लिहायला लागली आहे, तेव्हापासून सगळं बदलत चाललं आहे. कॉमन मॅनचे चित्रपट बनायला लागले आहेत. त्यामुळे माझ्यासारख्या कलाकारांना अधिक वाव मिळायला लागला आहे.

Q

एक काळ असा होता की समांतर सिनेमा आणि कमर्शिअल सिनेमा वेगळा होता. पण आता समांतर सिनेमा आणि कमर्शिअल सिनेमा एक झाला आहे. तुम्हाला हा बदल जाणवतो आहे का?

A

होय... नक्कीच. आता सिनेमा थिएटरमध्ये किती चालतोय किंवा लोकांना किती आवडतोय या सगळ्या गोष्टी बघून लेखक व दिग्दर्शक सिनेमे लिहीत आहेत. त्यांना वेगळा विषयही मांडायचा आहे; पण अन्य गणितेही जुळली पाहिजेत असंही त्यांना वाटत आहे आणि हे करावंच लागतं. काऱण एखाद्यानं आर्ट फिल्म बनवली आणि तो निर्मात्याकडे गेला की तो म्हणणार.. अरे यामध्ये एखादं गाणं आवश्यक आहे. त्याकरिता सगळ्या गोष्टींचा विचार करूनच आता चित्रपट बनवावा लागतो. आजकाल सगळे जण तद्दन व्यावसायिक झाले आहेत आणि ते चुकीचं आहे असं मला वाटत नाही.

Q

भूमिका छोटी असो वा मोठी तुम्ही त्या भूमिकेला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवता. हे तुम्हाला कसे काय जमते. ही लेखकाची, दिग्दर्शकाची कमाल असते की तुमची?

A

चित्रपटामध्ये काम करताना एक टीमवर्क म्हणून काम करायचं असतं. मुळात लेखकाने ते लिहिलेले असते. मग त्यावर मी माझ्या पद्धतीने काम करते. त्यानंतर दिग्दर्शकाच्या काही सूचना असतात. त्यामुळे हे सगळे टीमवर्कचं काम असतं.

Q

चित्रपटांमध्ये काम करत असताना कधी कधी एखाद्या भूमिकेला संकलनाच्या टेबलवर कात्री लावली जाते. त्यामुळे नाराज व्हायला होतं. तुमच्या बाबतीत असं काही झालं आहे?

A

माझ्या बाबतीत असं काही झालं नाही; परंतु माझे कित्येक चित्रपट आहेत ते अजूनही प्रदर्शित झाले नाहीत. माझा पहिला चित्रपट 'बाईमाणूस' अजूनही चित्रपटगृहात आला नाही. नाच तुझंच लग्न आहे, भिडू असे काही चित्रपट माझे आहेत; पण ते प्रदर्शित झालेले नाहीत. त्याचे वाईट वाटते. काऱण सगळ्यांची त्या मागे मेहनत असते. आपण त्या भूमिकेसाठी खूप मेहनत घेतलेली असते. ती भूमिका जणू काही आपली मैत्रीणच झालेली असते. मी झोपेतही माझ्या व्यक्तिरेखेशी गप्पा मारीत असते. म्हणजे ही व्यक्तिरेखा कशी बोलेल... ती कशी वागेल.. वगैरे बाबींचा सातत्याने विचार मनात असतो. कोणतेही प्रोजेक्ट जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत मी त्या भूमिकेचा पिच्छा सोडत नाही. मग एवढं सगळं केल्यानंतरही एखादा चित्रपट प्रदर्शित झाला नाही तर त्याचं वाईट वाटणारच.

Q

हिंदी-मराठी चित्रपटांबरोबरच रंगभूमीवरही तुम्ही काम केलं आहे. आतापर्यंत वेगवेगळ्या धाटणाच्या भूमिका साकारल्या आहेत. अशी कोणती भूमिका आहे ती तुमच्या हृदयाच्या अधिक जवळ आहे?

A

माझ्या सगळ्याच भूमिका मला खूप आवडतात. त्यामुळे एकाच भूमिकेचे मला नाव घेता येणार नाही. मी माझ्या प्रत्येक भूमिकेला तेवढाच जीव लावलेला आहे. फॅण्ड्री, न्यूड, रेडू, लापता लेडीज अशा सगळ्याच चित्रपटांतील माझ्या भूमिकांनी मला खूप शिकविलं आहे आणि घडवलं आहे.

Q

कान चित्रपट महोत्सवातील तुमची कामगिरी सगळ्यांच्या लक्षात आहे. आता पुढील लक्ष्य ऑस्कर असणार आहे?

A

आतापर्यंत माझ्या चाहत्यांना जे काही वाटलं आहे ते घडलेलं आहे. माझ्या चाहत्यांचे माझ्यावर खूप प्रेम आहे. त्यांनी माझ्या कलाकृतींवर प्रेम केलं आहे. त्यामुळे तो दिवसही येईल असं मला वाटतं. मी कान महोत्सवाला गेले होते तेव्हा मला एका मित्राचा फोन आला आणि तो मला म्हणाला, की ताई तू कानला गेली आहेस ना... तिथंच पुढे जाऊन उजवीकडे वळ.. मी म्हटलं अरे का... तो म्हणाला, की तिथंच ऑस्कर आहे. मी त्यावेळी काही उजवीकडे वळले नाही; पण आता मात्र वळण्याचा नक्कीच विचार आहे.

Q

आता तुम्ही निर्मात्या झाला आहात. मग अन्य निर्माते तुम्हाला त्यांच्या चित्रपटामध्ये घेताना विचार करतील असे वाटत नाही?

A

असे मला वाटत नाही. कारण मी आधी सांगितलं आहे की मी ठरवून काही निर्माती झाली नाही. त्यामुळे माझ्या यापुढील कामावर त्याचा कोणताही परिणाम होईल, असं वाटत नाही. कारण माझं पहिलं प्राधान्य अभिनयाला आहे. अभिनय हा माझा ध्यास आणि श्वास आहे. तो शेवटपर्यंत राहणार आहे.

esakal
Riteish Deshmukh Fees: 'बिग बॉस मराठीसाठी रितेश देशमुख किती घेतोय फी? वाचा प्रत्येक भागाचं मानधन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.