छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अनेक शूर मावळ्यांनी जीवाची बाजी लावत इतिहास घडवला. शिवकाळातील नररत्नांपैकी एक, रणझुंजार मुरारबाजी देशपांडे. पुरंदरच्या वेढ्याप्रसंगी झालेल्या धुमश्चक्रीत महान पराक्रम गाजवून शेकडों गनिमांना यमसदनी धाडणाऱ्या स्वामीनिष्ठ मुरारबाजी देशपांडे यांचा पराक्रमी इतिहास आजही प्रत्येकाला प्रेरणा देणारा आहे. स्वराज्याच्या इतिहासात पुरंदरचे ‘काळभैरव’ म्हणून ओळख असणारे मुरारबाजी देशपांडे यांची यशोगाथा ‘वीर मुरारबाजी...पुरंदरची युद्धगाथा’ या चित्रपटातून रुपेरी पडदयावर येण्यासाठी सज्ज होत आहे. आता या चित्रपटातील छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचा पहिला लूक समोर आला आहे.
मालिका विश्वात ‘श्रीकृष्ण’ आणि ‘महादेव’ यांची तसेच 'ओम नमो व्यंकटेशाय' या दाक्षिणात्य चित्रपटात 'तिरुपती बालाजी' यांची भूमिका साकारत प्रचंड लोकप्रियता मिळवणारा अभिनेता सौरभ राज जैन या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत आहे. छत्रपतींच्या भूमिकेतील सौरभ जैनचं पहिलं पोस्टर प्रदर्शित करत चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. 'फत्तेशिकस्त’ आणि ‘पावनखिंड’ चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर आलमंड्स क्रिएशन्स व ए.ए.फिल्म्स यांनी ‘वीर मुरारबाजी...पुरंदरची युद्धगाथा’ चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाची निर्मिती अजय आरेकर, अनिरूद्ध आरेकर, भाऊसाहेब आरेकर यांची आहे.
या भूमिकेबद्दल बोलताना सौरभ जैन म्हणाला, 'सगळ्या देवतांच्या भूमिका तसेच आपलं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका करायला मिळणे हे मी भाग्यचं समजतो.‘छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका पडद्यावर साकारण्याची संधी मिळणे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे. माझ्या आजवरच्या पौराणिक भूमिकांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. आपलं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची मी साकारत असलेल्या भूमिकेला ही प्रेक्षकांचं हेच प्रेम मिळेल.'
१६६५ च्या आषाढात मिर्झाराजे जयसिंग आणि सरदार दिलेरखान यांनी पुरंदर किल्ल्याला वेढा घातला. त्यावेळी पुरंदरचे किल्लेदार मुरारबाजी देशपांडे निवडक सातशे मावळ्यांसह दिलेरखानाच्या फौजेवर चालून गेले. आणि ‘न भूतो न भविष्यती’ असा पराक्रम केला. पुरंदरच्या लढाईतल्या पराक्रमाने मुघलांना भयभीत करुन सोडणाऱ्या मुरारबाजी देशपांडे यांची ही यशोगाथा आजच्या पिढीला चित्रपटाच्या माध्यमातून समजावी यासाठी ‘वीर मुरारबाजी...पुरंदरकी युद्धगाथा’ हा चित्रपट आम्ही घेऊन येत असल्याचे निर्माते अजय आरेकर यांनी सांगितले. अधिकाधिक तरुणांपर्यंत स्वराज्याचा प्रेरणादायी इतिहास पोहचवायचा आहे’ त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. येत्या १४ फेब्रुवारीला हिंदीत आणि मराठीत हा चित्रपट देशभरात प्रदर्शित होणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.